Monday, March 23, 2009

कैच्या कै संगीतिका

(टीपः- एका बंगल्यात दुपारच्या वेळी निवांत बसलेलो असताना अचानक मागच्या दारातून दोन पाली आणि पाठोपाठ एक सरडा प्रवेश करते झाले. त्यांनी क्षण दोन क्षण थांबून माझ्याकडे पाहीलं आणि लगेच पुढच्या दारातून पसार झाले. यावर आधारित बाकीचा हा कल्पना उल्हास आहे! )

एक आटपाट शेत होतं. शेताला खडबडित बांध होता. त्या बांधाच्या खबदाडीत 'देसरडा' नावाचं सरडा कुटुंब रहात असे. रणबीर हा देसरडांचा एकुलता एक मुलगा. बांधापलीकडे एक बंगला होता. त्याच्या भिंतींवर 'पाल' नावाचे पालींचे कुटुंब विहार करायचे. दीपिका ही पालांची एकुलती एक मुलगी.

लहानपणापासून रणबिरला पालींच्या चुक चुक आवाजाचं विलक्षण आकर्षण होतं. पालींचा चुक चुक आवाज आला की तो नेहमी आईच्या मागे लागायचा.

(चालः टप टप टप काय बाहेर वाजतंय)
चुक चुक चुक काय बाहेर वाजतंय ते पाहू
चल ग आई चल ग आई बंगल्यात जाऊ

पण आई, सरड्याची धाव कुंपणापर्यंत या सरडा नीतिनुसार, कधीही त्याला बंगल्यात घेऊन गेली नाही. तो हिरमुसला व्हायचा. लहान असल्यामुळे फारसं काही करूही शकत नव्हता बिचारा! पण मोठा झाल्यावर एकवार बंगल्यात घुसून त्या आवाजाचा शोध घ्यायचा या वेडानं त्याला झपाटलं होतं. आईबापाचं ऐकेल तर तो मुलगा कसला?

इकडे लहानगी दीपिका तिच्या सख्यांबरोबर दिवसभर हुंदडत भिंती कोळपत असे. तिला आईने बरीच गाणी शिकवली होती. त्यातलं हे गाणं तिला विशेष आवडायचं.

(चालः लकडीकी काठी )
लकडीकी काठी काठी पे सरडा
सरडेकी दुम पर जो मारा हातोडा
दौडा दौडा दौडा सरडा दुम दबाके दौडा

यथावकाश दोघे वयात आले. त्याला तारुण्य पीटिका यायला आणि दीपिका दिसायला एकच गाठ पडली. त्याचं असं झालं.. एकदा रणबीर नजर चुकवून बंगल्यात घुसला. दारावर चढून दरवाजाच्या फटीतून त्यानं आत पाहीलं. भिंतीवर दीपिका अन् तिच्या सख्या 'मै चली मै चली देखो प्यारकी गली' हे गाणं म्हणत कमरतोड नृत्य करीत होत्या. रणबीर भान हरपून बघतच राहीला. दीपिकानं क्षणात त्याचं चित्त हरण केलं. त्यानं एवढा अवखळपणा कधी पाहीलाच नव्हता. शेवटी व्हायचं तेच झालं. तो अक्षरशः तिच्या प्रेमात दारावरून पडला. तो पडताच दीपिकाचं लक्ष त्याच्याकडे गेलं. ती आपल्याकडेच बघते आहे हे समजताच रणबीर गोरामोरा झाला, मग लाजेनं लाल, मग लगेच घाबरून त्यानं टाईल्सचा करडा रंग धारण केला. इतक्या झपाट्यानं रंगबदल करणारा रंगीला रतन दीपिकानं कधी पाहिला नव्हता. तिचीही नजर त्याच्यावरून हटेना. तिच्या सख्यांनाही ती एकटक कुठे बघतेय ते प्रथम कळेना. नंतर तिचा चित्तचोर दिसताच त्यांनी दीपिकाला चिडवायला सुरुवात केली.

(चालः एक परदेसी मेरा दिल ले गया )
एक परदेसी तेरा दिल ले गया
जाते जाते दीपिकाको गम दे गया

ते ऐकताच रणबीरनं तिथून सूंबाल्या केला पण जाता जाता त्या गाण्यातून तिचं नाव दीपिका आहे हे कळलं मात्र! रणबीर मग बंगल्याच्या रोज वार्‍या करायला लागला. 'भींतिवरी दीsपिका असावी' अशी प्रार्थना, 'भींतिवरी कालनिर्णय असावे' च्या चालीवर, मनोमन करीत तो बंगल्यात शिरत असे. कधी ती दिसे तर कधी नाही. आपल्याला बघताच दीपिकाची नजर आपल्यावर खिळते हे लक्षात आल्यावर रणबीर थोडा जास्त धीट झाला आणि त्यानं खड्या सुरात हे गाणं गायलं.

(चालः ही चाल तुरुतुरु )
तुझी चाल तुरुतुरु
हल्ते शेपुट हळुहळु
डाव्या डोळ्यावर किडे फिरती
जशा मावळत्या दिव्यात
कचर्‍याच्या डब्यात
माश्या गं भणभणती

गाणं संपल्यावर रणबीर दीपिकाच्या जवळ गेला. त्यानं आपली ओळख करून दिली. दीपिकानंही आढेवेढे न घेता स्वतःचं नाव सांगीतल्यावर त्यांच्या गप्पा सुरु झाल्या. हळुहळू त्यांची उरली सुरली भीड चेपली.. नंतर ते प्राण्यांच्या नजरा चुकवून जोडीने कुठेही फिरू लागले. कधी दीपिका नटुन थटुन बांधावर त्याला भेटायला आली तर रणबीर 'इस रंग बदलती दुनियामे, सरडोंकी नीयत ठीक नहीं' हे गाणं म्हणायचा. कधी जास्त उन्हामुळे दीपिका सावलीत थांबली तर 'गोरे रंगपे ना इतना गुमान कर' हे म्हणायचा. एकदा बांधावर संधीप्रकाशात बसलेले असताना इस्टमनकलर रणबीरने धीटपणे दीपिकाची शेपूट धरली. त्यावर दीपिकाने लगेच असं म्हंटलं --

(चालः छोड दो आंचल जमाना क्या कहेगा )
दीपिका: हाS, छोड दो ना दुम, जमाना क्या कहेगा?
रणबीरः हां हां हां इन अदाओंका, जमाना भी है दीवाना
दीवाना क्या कहेगा?

दीपिकाचं रणबीरशी जमायच्या आधी पाल संप्रदायातल्या एका तरुणाशी, युवराज पालकरशी, जुळलं होतं. पण रणबीरच्या झंझावातामुळे युवराजबद्दल वाटणारं प्रेम पालापाचोळ्या सारखं उडून गेलं. युवराजबद्दलचं तिचं प्रेम आधी रणबीरला माहीत नव्हतं. जेव्हा ते त्याला कळलं तेव्हा युवराजचा पत्ता आधीच कट झालाय हेही माहीत नव्हतं. तो फार व्यथित झाला आणि दोन दिवस तिला भेटलाच नाही. तो न भेटल्यानं दीपिका सैरभैर झाली. एका संध्याकाळी तिनं बांधावर बसून 'सरड्या, का धरिला परदेस' असा आक्रोश केला. त्यातल्या भावनांची सच्चाई, जवळच्या खबदाडात बसून ऐकत असलेल्या, रणबीरच्या हृदयापर्यंत पोचली. त्वरित तो हे गाणं म्हणत म्हणत बाहेर आला.

(चालः परदा है परदा )
सरडा हूं सरडा हूं
सरडा हूं सरडा हूं

सरडा हूं सरडा, सरडेके पीछे, पाल पडी है, हो सरडा
सरडा हूं सरडा, सरडेके पीछे, पाल पडी है
ये दीपिकाको देsसरडा न कर दूँ
तो तो तो तो रणबिर मेरा नाम नही है

मावळत्या सूर्याच्या साक्षीनं त्यानी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या. सूर्याकडे बघत रणबीर म्हणाला --
रणबीर: "मावळत्या सूर्याचा केशरी गोळा बघ ना, काय छान दिसतोय"
दीपिका: "चुक चुक"
रणबीर: "रंग कसले सॉलिड दिसतायेत ना?"
दीपिका: "चुक चुक"
रणबीर(वैतागून): "हे चुक चुक म्हणजे नक्की काय? चूक की बरोबर?

इकडे दीपिकाच्या नकारामुळे युवराजचं डोकं भनकलं होतं. त्यानं दीपिकाच्या आणि रणबीरच्या वडीलांच्या कानात वीष ओतलं. बाबा पाल आणि आई पाल यांनी दीपिकाला खूप झापलं अन् वर हा सल्ला दिला.

(चालः डाव मांडुन भांडुन मोडु नको )
बांध कोळपत कोळपत हिंडु नको
भिंत सोडु नको, भिंत सोडु नको

तिकडे बाबा देसरडांनी आई देसरडाशी गंभीर चर्चा केली.
बाबा: "तुमचे चिरंजीव बाहेर काय रंग उधळताहेत, माहितीये?. घराण्याची अब्रू पार धुळीला मिळवलीय."
आई: "आता सरड्याची जात म्हंटल्यावर रंग उधळणार नाहीतर काय करणार?" आईचा निरागस प्रश्न.
बाबा: "तो एका पालीच्या प्रेमात पडलाय. त्याला मी ती पांढर्‍या पायाची पाल मुळीच घरात आणू देणार नाही. तुम्ही लाडावून ठेवलाय त्याला."
आई: "पण मी म्हणते, एवढी नगरपालीका गावात असताना एवढ्या पाली का?". आईला सगळा दोष पालींचाच वाटणं स्वाभाविक होतं.
बाबा: "तुम्ही उगीच फाटे फोडू नका हो! काय हे! लग्नाआधीच पांढरं फटफटीत कपाळ? छे! छे! सरडेश्वरा! हे दिवस दाखविण्यासाठीच जिवंत ठेवलंस का रे मला?" तेवढ्यात तिथे रणबीर उगवला. एकंदर रागरंग बघून त्याला पुढील परिणामांची कल्पना आलीच. त्याला पाहून आईनं मुद्याला हात घातला.
आई: "राणू! हे काय ऐकते आहे मी? सरड्यासारखा सरडा तू, एका पालीच्या प्रेमात पडलास?"
रणबीरः "हो आई! दीपिका तिचं नाव! ती एक छान गोड पाल आहे. आम्ही लग्न करणार आहोत."
बाबा: "(आईकडे बघून) बघा! ऐकलत! मी म्हणत नव्हतो? (रणबीरकडे बघून) अरे मूर्खा! असले आंतरप्राणीय विवाह आपल्या नि त्यांच्या, दोन्ही सांप्रदायात मान्य नाही हेही तुला माहीत नाही?"
रणबीरः "बाबा आता शास्त्र फार पुढे गेलंय. हल्ली भिन्नलिंगी, स्त्रीलिंगी पुल्लिंगी अशी सर्व प्रकारची लग्नं होतात."
बाबा: "मठ्ठ मुला! तुमचं लग्न यापैकी कशातच बसत नाही हे कळलंय का तुला? पिल्लं तरी कशी होणार रे तुम्हाला?
रणबीरः "तो विचार केलाय आम्ही बाबा! आम्ही दत्तक घेणार आहोत."
बाबा: "ते काही नाही. मी तिला या घरात पाऊल सुध्दा ठेऊ देणार नाही. आणि तू! तू तिला यापुढे अजिबात भेटायचं नाही". बाबांचं निर्वाणीचं वाक्य ऐकून रणबीर तणतणत बांधावर गेला. मावळत्या सूर्याकडे बघत त्यानं मनाची तगमग अशी बोलून दाखवली.

मजबूर ये हालात, इधर भी है उधर भी
तनहाई की एक रात, इधर भी है उधर भी
कहने को बहुत कुछ है, मगर किससे कहें हम
कब तक यूँही खामोश रहे और सहें हम
दिल कहता है दुनिया की हर एक रस्म उठा दे

(बंगल्याच्या भींतिकडे हताशपणे बघत)
दीवार जो हम दोनो में हैं, आज गिरा दे
क्यूँ दिल में सुलगते रहें, लोगोंको बता दे
हां हम को मोहब्बत है, मोहब्बत है, मोहब्बत
अब दिलमें यहीं बात, इधर भी है उधर भी

दरम्यान तिकडे युवराजनं दीपिकाच्या बापाला पटवून तिच्याबरोबर लग्नाचा घाट घातला. पण दीपिकानं आत्महत्या करायची धमकी दिल्यामुळे त्यानं तिला हिप्नोटाईज केलं. त्यामुळे तिला तो रणबीरच भासू लागला. युवराजनं तिला पळून जाऊन लग्न करायची आयडिया टाकली. प्रभावाखाली तिनं ती तात्काळ मान्य केली. ते दोघं पळायला लागले. रणबीरनं त्यांना पाहीलं आणि त्याला शंका आली. त्याला दीपिकाच्या प्रेमाची खात्री होती म्हणून तिला युवराजपासून सोडवायला तोही त्यांच्यामागून पळू लागला. युवराजने रणबीर दिसताच पळण्याचा वेग वाढवला. अंमलाखाली दीपिकानंही वेग वाढवला. पळत पळत ते दोघे बंगल्यात आले. थांबून तिथे बसलेल्या माणसाकडे क्षणभर पाहीलं. मागून रणबीर येत होताच. या माणसाची काही मदत होणार नाही हे लक्षात आल्यावर युवराज दीपिका ही जोडी पुढच्या दारातून सुसाट बाहेर गेली... त्यांच्या मागोमाग रणबीरही. पळणार्‍या पालींकडे वरून फिरणार्‍या घारीचं लक्ष गेलं.. तिचं लक्ष गेलंय हे रणबीरच्या लक्षात आलं. त्यानं वेग वाढवून स्वतःला दीपिकाच्या अंगावर झोकून बाजुच्या गवता-मातीचा रंग धारण केला. झपाट्यानं आलेल्या घारीला फक्त युवराज दिसला आणि तिनं त्याला अलगद पायात पकडून आकाशात झेप घेतली. अशारीतिनं युवराजचा काटा परस्पर निघाला. हे सगळं होईपर्यंत दोघांचे आईबाबा तिथे पोचले होते.. त्यांना त्या दोघांच्या दैवी प्रेमाचा साक्षात्कार होऊन गहिवरून आलं.

दीपिका अजूनही संमोहित अवस्थेत होती. कसंबसं मन घट्ट करून रणबीरनं तिच्या थोबाडीत लावली. जोरदार फटक्यामुळे दीपिका परत जागृतावस्थेत आली. रणबीरनं आपल्याला मारलं हे जाणवल्यामुळे ती चिडून म्हणाली.

दीपिका: "तुमने मुझे मारा?"
रणबीरः "मै तो तुम्हारे प्यारका मारा! मै तुम्हे कैसे मार सकता हूं? मैने तो तुम्हारे मनके शैतानको मारा". यावर सगळे उपस्थित हसले.

दीपिकाचं समाधान झालं आणि नंतर ते दोघे सुखासमाधानाने राहू लागले.

-- समाप्त --

(टीपः मावळत्या सूर्यासंबंधीची वाक्यं ललिताच्या 'गेला सूर्यास्त कुणीकडे' या लेखातून ढापली आहेत. त्यात कुठेही तिची किंवा त्या लेखाची टिंगल करण्याचा हेतू नाही. ती वाक्ये वापरण्यासाठी ललिताची परवानगी मिळवली आहे.)

4 comments:

Anonymous said...

kahichya kahi
mast ahe !!!!

Yawning Dog said...

Achaatt !

Unknown said...

great thinking boss

संकेत आपटे said...

हाहाहा... लय भारी. नुसत्या दारात आलेल्या दोन पालींवरून आणि एका सरड्यावरून तुम्हाला ही कथा सुचली? आणि नावं दीपिका, युवराज आणि रणबीर! वाह वा! क्या बात है! मस्तच...