Monday, November 12, 2012

ऑक्सफर्डचं विहंगावलोकन!

कालिदासाचं मेघदूत म्हणजे मान्सूनच्या ताज्या ताज्या ढगांच्या दक्षिणोत्तर प्रवासाचं वर्णन आहे म्हणून फार पूर्वी पुण्याच्या एका डॉक्टरांनी ते पडताळून पहायचं ठरवलं. त्यांचं स्वतःचं विमान होतं. मान्सून आल्या आल्या त्यांनी विमानातून ढगांबरोबर प्रवास केला आणि खाली जे काय दिसलं ते मेघदूताशी पडताळून पाहून मेघदूतावर ISI चा शिक्का मारला. हे सगळं मी ऐकल्यावर मला पण ऑक्सफर्डचा मेघदूत व्हायची हु़क्की आली.

ऑक्सफर्ड वरून कसं दिसतं ते कुण्या कालिदासाने सांगितलेलं नसल्यामुळे मला स्वतःलाच ते पहाणं व लिहीणं (आणि आता तुम्हाला वाचणं) क्रमप्राप्त झालं. स्वतःचं विमान असण्याची तर सोडाच पण सध्या विमानात बसण्याची देखील ऐपत नसल्यामुळे मला ऊष्ण हवा भारित फुग्याचा आश्रय घ्यावा लागला. फुगेवाल्या कंपनीकडे रीतसर नोंदणी केल्यानंतरचं पहिलं उड्डाण वारा असल्यामुळे रद्द झालं. खरं तर तसा काही फार वेगाचा वारा मला जाणवला नव्हता, एखाद दुसरी झुळुक येत होती इतकंच! तेव्हढा वारा तर पाहीजेच, नाहीतर फुगा एकाच जागी राहील.. असं आपलं माझं मत हो! मग नवीन तारखा ठरवल्या. ते पण उड्डाण रद्द झालं! असं अजून एक दोन वेळेला झाल्यावर एकदाचं ते झालं. असो.

तर आता वर्णनाकडे वळू या!

फुग्याच्या खाली एक झाकण नसलेला पेटारा असतो त्यात पायलट धरून पंधरा एक माणसं मावतात. पायलट मधे (चित्र-१) उभा राहतो. तो अधून मधून शेगड्या पेटवून फुग्यातल्या हवेवर आगीचा झोत सोडून ती तापवतो (चित्र-२ व ३).

चित्र-१: फुग्याखालचा पेटारा

चित्र-२: फुग्यातली हवा तापवायची शेगडी

चित्र-३: आगीचा झोत

फुगा सणसणीत मोठा असतो, इतका की त्याला फुगा म्हणणं म्हणजे बेडकाला प्रति भीमसेन म्हणण्यासारखं आहे. इतकी माणसं व इतर वजन उचलण्यासाठी सुमारे १७,००० मीटर क्यूब ( १ मीटर क्यूब = १००० लिटर्स) इतकी हवा मावण्याइतकं तरी त्याचं आकारमान लागतं. म्हणूनच, इतका अगडबंब फुगा उडवायचं प्रशिक्षण घेऊन लायसन्स घ्यावं लागतं. साबणाचा फुगा उडवणे आणि हा फुगा उडवणे यात गुरं वळणे आणि उकडीचे मोदक वळणे इतका फरक आहे.

सुरुवातीला पेटार्‍यात पायलट व दोन/तीन प्रवासी असतात. सुरुवातीला फुग्यात हवा भरून नंतर ती तापवली जाते. या फुग्यात हवा भरण्यासाठी कुठलाही पंप नसतो. त्यासाठी फुग्याच्या कडा हातात धरून त्यात चक्क दोन मोठ्या पंख्यांनी हवा भरली जाते (चित्र-५). पुरेशी हवा झाली की फुगा चिल्लर झुळकीनं देखील जमिनीवर लोळतो आणि पेटार्‍याला हिसके बसतात. फुगा फुगत असतानाच पायलट त्यातली हवा तापवायला लागतो. लोळणार्‍या फुग्यात आगीचा झोत सोडणं हे टर्ब्युलन्समधे चहा पिण्याइतकं जिकीरिचं आहे.

पेटारा खेचला जाऊ नये म्हणून पेटारा मागे एका गाडीला दोरखंडाने बांधलेला असतो. जेव्हा फुगा टम्म फुगतो आणि हवा चांगली तापते तेव्हा पेटार्‍याची जमिनीला चिकटलेली बाजू वर खेचली जाऊन थोडी तिरकी होते. वेळ पडल्यास मागची गाडी रिव्हर्स गिअर टाकून त्याला मागे धरून ठेवते. आता फार वेळ न खाता प्रवाशांनी पेटार्‍यात चढायचं असतं. फॅन आधीच हलवलेले असतात. प्रवासी चढल्या चढल्या मागचे दोरखंड काढले जातात आणि पेटारा जमिनीवरून फरफटला जाऊन शेवटी हवेत झेप घेतो.

चित्र-४: उड्डाणाआधी पसरलेला फुगा व आडवा पेटारा.

चित्र-५: हवा भरताना

आमचा प्रवास ऑक्सफर्डच्या उत्तरेकडून ऑक्सफर्डच्या दक्षिणेला १५ मैल लांब असलेल्या डिडकॉट गावापर्यंत चांगला दीड तास झाला. डिडकॉट जवळच्या एका शेतात तो फुगा व पेटारा उतरवला. मग पुढे तासभर फुग्यातली हवा काढणे, त्याची घडी घालणे, तो फुगा एका खोक्यात कोंबणे आणि शेवटी शँपेन पिणे इ. कामात गेला.

विहंगावलोकनाचे काही फोटो खाली आहेत.


चित्र-६: ज्या खेळाच्या मैदानातून आम्ही उडालो ते मैदान


चित्र-७: ऑक्सफर्डच्या उत्तरेकडचा भाग. उजवीकडे रिंग रोड. रिंग रोडच्या उजवीकडून उड्डाण झालं.


चित्र-८: उत्तरेकडील समरटाऊन गाव


चित्र-९: पूर्वेकडील हेडिंग्टन गाव. निळसर पांढर्‍या इमारतींचा समूह दिसतोय ते जॉन रॅडक्लिफ रुग्णालय. गावातल्या रॅडक्लिफ इन्फर्मरीतले काही विभाग आता इथे हलवले आहेत.


चित्र-९: खालील काही स्थळांचा उल्लेख माझ्या या लेखात आला आहे.
१. थेम्स व शेरवेलचा संगम. शेरवेल नदी झाडात लपल्यामुळे दिसत नाही.
२. विद्यापिठाची बाग
३. बॅलिओल कॉलेजचं मैदान
४. न्यू कॉलेज व मैदान
५. नॅचरल हिस्टरी संग्रहालय.
६. ख्राईस्ट कॉलेज
७. सर्वात जुनी इमारत - सेंट मायकेल चर्च. कारफॅक्स मनोरा इथून खूप जवळ आहे.
८. ऑक्सफर्डचा किल्ला
९. रॅडक्लिफ कॅमेरा
१०. सेंट मेरिज चर्च.


चित्र-१०: वरचंच चित्र थोडं अजून जवळून.


चित्र-११: कीबल कॉलेजच्या आतली हिरवळ


चित्र-१२: ऑक्सफर्डच्या पश्चिमेकडच्या कालव्यातील मरिना.


चित्र-१३: गावातल्या रॅडक्लिफ इन्फर्मरीच्या जागी नवीन बांधकाम करून तिथे विद्यापीठ प्रशासन नेणार आहेत.


चित्र-१४: रेल्वेच्या रुळाशेजारून जाणार्‍या कालव्यातला अजून एक मरिना


चित्र-१४: मालगाडी जाताना


चित्र-१५: हिरवळीचा उंचवटा ऑक्सफर्डच्या किल्ल्याचा भाग आहे


चित्र-१६: डिडकॉट येथील औष्णिक विद्युतकेंद्राच्या चिमण्या दूरवर आहेत.


चित्र-१७: इंग्लंडच्या मध्य व दक्षिण भागाला जोडणारा हमरस्ता A34.


चित्र-१८: शेतावर पडलेली फुग्याची सावली


चित्र-१९: ऑक्सफर्डचं गोल्फ कोर्स


चित्र-२०: ऑक्सफर्ड जवळचं जंगल आणि शेतं


चित्र-२१: वरचंच चित्र अजून जवळून


चित्र-२२: श्रिमंतांची घरं


चित्र-२३: जंगल अजून जवळून


चित्र-२४: जंगलाजवळचं एक फार्म हाऊस


चित्र-२५: मिलिटरी एअरपोर्टवर एक हेलिकॉप्टर उतरतंय.


चित्र-२६: शेतातली गवत कापणी


चित्र-२७: डिडकॉटच्या औष्णिक विद्युतकेंद्राच्या चिमण्या जवळून.


चित्र-२८: मावळता सूर्य


चित्र-२९: डिडकॉट जवळील रदरफर्ड-अ‍ॅपलटन प्रयोगशाळा. याबद्दल नंतर कधी तरी लिहायचा विचार आहे.

फुगवतानाच्या काही फोटोंचं मूळ स्थळ -- http://en.wikipedia.org/wiki/Hot_air_balloon
बाकीचे फोटो माझे आहेत.

बीबीसीने ऑक्सफर्ड वर केलेल्या एका
छोट्या डॉक्युमेंटरीचा व्हिडिओ!

-- समाप्त --

Thursday, October 18, 2012

ऑक्सफर्डचा फेरफटका

जगातल्या अग्रेसर विद्यापीठांमधे ऑक्सफर्डची गणना होते हे पुण्यातल्या वाहतुकीला शिस्त नाही इतकं सर्वश्रुत आहे. गाढ्या विचारवंतांचा आणि संशोधकांचा सुळसुळाट असलेलं, ८०० वर्षांपेक्षा जुनं, ऑक्सफर्ड विद्यापीठ आत्तापर्यंत ५० च्या वर नोबेल पारितोषिकांचं धनी आहे. जुनी कॉलेजं व जुन्या वास्तू अजूनही टिकून आहेत. नुसत्या टिकूनच नाहीत तर वापरात पण आहेत. याचं एक कारण शासकीय प्रयत्न व अनुदान आणि दुसरं हिटलर! हे कारण एखादं काम न झाल्याचा दोष वक्री शनीला देण्याइतका हास्यास्पद वाटेल पण दुसर्‍या महायुद्धात ऑक्सफर्डवर बाँब टाकायचे नाहीत असा हिटलरचा हुकूम होता. कारण त्याला इंग्लंड जिंकल्यावर ऑक्सफर्ड आपली राजधानी करायची होती.

ऑक्सफर्डबद्दल बरंच लिहीलं गेलंय व बर्‍याच कॅमेर्‍यात ते पकडलंय! एक प्रतिष्ठित विद्यापीठ असलेलं शहर, कार निर्मितीच्या कारखान्याचं शहर आणि आता बायोटेक्नॉलॉजी मधील आघाडीचं शहर अशी विविध ओळख असली तरी ऑक्सफर्डची लोकसंख्या फार काही प्रचंड नाही, जेमतेम दोन लाख! आपल्याकडचं एखादं वडगाव बुद्रुक सुद्धा सहज त्याच्या तोंडात मारेल. पण प्रतिवर्षी जितके पर्यटक (९० लाख) इथे येऊन जातात तितके आपल्या ताजमहालकडे पण फिरकत नाहीत.

ऑक्सफर्ड नावाची जन्मकथा अशी आहे.. Ox म्हणजे बैल व Ford म्हणजे जिथून नदी पार करणं सोप्पं जातं असा उथळ भाग! फार पूर्वीपासून इंग्लंडमधे उत्तर दक्षीण प्रवास करणारे लोक इथून थेम्स नदी पार करत असत. त्यामुळे बैलगाड्यांना सहजपणे नदी ओलांडता येणारा भाग म्हणजेच ऑक्सफर्ड! अर्थात त्या काळी विद्यापीठ नव्हतं नाहीतर ऑक्सफर्डचा आणि बैलाचा काहीही संबंध लावणं म्हणजे धाडसाचं काम ठरलं असतं!

ऑक्सफर्ड हे अति प्राचीन असल्याचे दावे, ते केंब्रिजहून जुनं आहे हे दाखविण्यासाठी (तळटीप-१ पहा), १२व्या शतकापासून मुद्दाम पसरवले गेले आहेत. पण ते फार काही जुनं नाही. ऑक्सफर्ड गावाचा पहिला उल्लेख ९११ सालच्या एका कागदपत्रात आहे. त्या आधीही इथे मनुष्य वस्ती होती याच्या खुणा आहेत, पण ते अति प्राचीन नक्कीच नाहीये.

नवव्या शतकात आल्फ्रेड द ग्रेट या अँग्लो-सॅक्सन राजानं कायदा, सुव्यवस्था व संरक्षण करण्यासाठी अनेक तटबंदीयुक्त गावांची निर्मिती केली. थेम्स आणि शेरवेल नद्यांच्या संगमावर वसलेलं (चित्र-१) व अर्ध वर्तुळाकार टेकड्यांनी वेढलेलं ऑक्सफर्ड त्या पैकी एक आहे. व्हायकिंग सैन्याचे सर्व हल्ले यशस्वीपणे परतवणारा आल्फ्रेड इंग्लंडचा एक सामर्थ्यशाली राजा मानला जातो आणि 'द ग्रेट' ही उपाधी भूषवणारा एकमेव राजा आहे!

चित्र-१: थेम्स आणि शेरवेल संगम. थेम्स डावीकडून येते आणि समोरून शेरवेल

त्या नंतर १०१३ साली डॅनिश लोकांनी इंग्लंडचं राज्य बळकावल्यावर १०१८ मधे इंग्लंडचा राजा कुणाला करायचं यावर ऑक्सफर्ड मधे राजकीय खलबतं झाली. पण डॅनिशांना फार काळ सत्ता उपभोगता आली नाही. १०६६ मधे नॉर्मन लोकांनी (फ्रान्सच्या नॉर्मंडी भागातले लोक) त्यांचा पराभव करून विल्यम-१ ला सत्तेवर आणलं. त्याने १०७२ मधे ऑक्सफर्ड मधे एक किल्ला (चित्र-२) बांधला.

चित्र-२: ऑक्सफर्डचा किल्ला

पुढे ११४० मधे, इंग्लंडचं राजेपद कुणी घ्यायचं यावर स्टिफन व मटिल्डा या विल्यम-१ च्या नातवंडात भांडण सुरू होऊन प्रचंड अराजकता माजली. मटिल्डाने ऑक्सफर्डच्या किल्ल्यात आश्रय घेतला असताना स्टिफनच्या सैन्याने हल्ला चढवून संपूर्ण ऑक्सफर्ड बेचिराख केलं. मटिल्डा कशीबशी पळून गेली.

ऑक्सफर्ड त्या राखेतून पुन्हा उभं राहीलं आणि ११६७ मधे ऑक्सफर्ड विद्यापिठाची स्थापना झाली. विद्यापिठातल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढण्याचं मुख्य कारण त्या वेळच्या इंग्लंडच्या राजाने विद्यार्थ्यांना पॅरिसमधे जाऊन शिकायला बंदी घातली हे आहे. त्या काळी विद्यार्थी आणि गावकरी यांच्यात प्रचंड तणाव असायचा. १२०९ मधे एका बाईची हत्या झाल्यावर गावकर्‍यांनी २ विद्यार्थ्यांना फाशी दिलं. त्यामुळे अनेक विद्यार्थी घाबरून केंब्रिजला पळून गेले. घटलेल्या विद्यार्थ्यांमुळे एकूणच धंदा कमी झाल्याचं पाहून गावकर्‍यांनी पडतं घेतलं.. १२१४ मधे त्यांना येऊन रहाण्याचं आमंत्रण दिलं. तरीही तंटा कमी झाला नाही! विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी विद्यापिठात चॅन्सेलरचं पद निर्माण झालं तरी दंगेधोपे व चकमकी चालू राहील्याच. मग विद्यार्थ्यांना संरक्षण देण्याच्या उद्देशाने वसतीगृहं बांधली गेली. त्या वसतीगृहांचीच पुढे कॉलेजं झाली. (ऑक्सफर्ड केंब्रिज मधील कॉलेजची व्याख्या वेगळी आहे.. तळटीप-२ पहा)

त्यातला १० फेब्रुवारी १३५५ रोजी झालेला दंगा सर्वात भीषण होता.. दंगा कसला युद्धच होतं ते! कारफॅक्स मनोर्‍याजवळच्या पबमधे (चित्र-३ मधे डावीकडे लाल रंगाची पाटी दिसते आहे ते, आता तिथे सँटँडेर बँक आहे) दारू ढोसत बसलेल्या दोन विद्यार्थ्यांनी मालकाकडे दारूबद्दल तक्रार करण्याचं निमित्त होऊन जी बाचाबाची झाली तिचं पर्यवसान मालकाच्या थोबाडावर दारू फेकण्यात आणि त्याला बडविण्यात झालं. ऑक्सफर्डच्या महापौराने चॅन्सेलरला त्या विद्यार्थ्यांना अटक करायला सांगितलं, कारण विद्यापीठ त्याच्या अधिकारक्षेत्राच्या बाहेरचं होतं, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्या ऐवजी, विद्यार्थ्यांनी सेंट मेरीज चर्चची (चित्र-४) घंटा वाजवली व २०० विद्यार्थ्यांनी धनुष्यबाण वगैरे घेऊन महापौर व इतर लोकांवर हल्ला केला. महापौराने आजुबाजूच्या गावातून कुमक मागविण्यासाठी कारफॅक्स मनोर्‍यावरची घंटा वाजवली आणि २००० गावकर्‍यांनी हाताला लागेल त्या शस्त्रात्रांच्या सहाय्याने हल्ला मोडून काढला. एकूण ६१ विद्यार्थी आणि ३० गावकरी मेले. शिवाय, खूपसे जखमी झाले आणि मालमत्तेची व पुस्तकांची हानी झाली ते वेगळंच! तब्बल तीन दिवस मारामार्‍या, दंगली व हत्याकांड चालू होतं.

चित्र-३: कारफॅक्स मनोरा


चित्र-४: सेंट मेरीज चर्च, विद्यापिठाचं प्रमुख चर्च

राजाकडे दोन्ही बाजूंकडून तक्रारी गेल्या, रीतसर चौकशी वगैरे होऊन शेवटी नागरिकांचे अधिकार कमी करून विद्यापीठाला बहाल केले. शिवाय गावाला २५० पौंडांचा दंड झाला. दर वर्षी १० फेब्रुवारीला महापौर आणि ६१ मान्यवर नागरिकांना सेंट मेरीज चर्चपर्यंत शोकयात्रा काढून चॅन्सेलराची क्षमायाचना करण्याची व प्रत्येकी एक पेनी दंड गोळा करून विद्यापीठाला देण्याची शिक्षा झाली. ऑक्सफर्डच्या नागरिकांना अपमानास्पद वाटणारी ही प्रथा जरी पुढची ५०० वर्ष चालू होती तरी उभय पक्षातला तणाव, भांडणं हळूहळू कमी झाली व शेवटी पूर्णपणे थांबली.

१६व्या व १७ व्या शतकात ऑक्सफर्डला प्लेगच्या साथीनं पछाडलं.

१५३४ मधे हेन्री-८ या राजाने रोमन कॅथलिक पंथ सोडला. कॅन्टरबरीचा तेव्हाचा आर्चबिशप क्रॅन्मरने हेन्रीचं अ‍ॅरागॉनच्या कॅथरिनशी झालेलं लग्न रद्दबातल ठरवून, अ‍ॅन बोलेयनशी लावलं. याच काळात प्रॉटेस्टंट पंथाचं वर्चस्व वाढलं आणि अनेक धर्मगुरुंनी प्रॉटेस्टंट पंथ स्विकारला. नंतर मेरी ट्युडर, ही कट्टर कॅथलिक राणी, सत्तेवर आली. १५५३ ते १५५८ या तिच्या कालखंडात तिने करवलेल्या हत्याकांडामुळे ती 'ब्लडी मेरी' म्हणून प्रसिद्ध आहे. ही हेन्रीच्या रद्द ठरवलेल्या लग्नातून झालेली मुलगी असल्यामुळे अनौरस पण मानली जायची. त्यामुळेच तिने प्रॉटेस्टंटना धडा शिकविण्यासाठी क्रॅन्मर आणि आणखी दोन धर्मगुरू लॅटिमर व रिडली यांना सजा दिली. लॅटिमर व रिडली यांना ऑक्सफर्ड मधील ब्रॉड रस्त्यावर १६ ऑक्टोबर १५५५ रोजी जिवंत जाळलं. जिथे त्यांना जाळलं (चित्र-५) त्या रस्त्यावरच्या भागावर दगडी क्रॉस केलेला आहे आणि त्याचं कधीही डांबरीकरण होत नाही. २१ मार्च १५५६ रोजी क्रॅन्मरलाही जाळलं. नंतर त्या तिघांचं स्मारक ब्रॉड रस्त्यापासून जवळच (कारण जिथं जाळलं त्या ठिकाणची जागा उपलब्ध झाली नाही) उभारलं (चित्र-६).

चित्र-५: ब्रॉड रस्त्यावरील क्रॉस


चित्र-६: स्मारक

इंग्लंडमधे कुठेही गेलं तरी बहुतेक गोष्टी पुरातन दिसतात.. कमितकमी दोनशे वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या! ऑक्सफर्ड त्याला मुळीच अपवाद नाही. इथे १२४२ सालापासूनचा एक पब अजून आपलं अस्तित्व टिकवून आहे (चित्र-७). १६५१ साली अख्ख्या इंग्लंडमधलं पहिलं कॉफी शॉप ऑक्सफर्ड मधे अवतरलं. तेही अजून आहे (चित्र-८). सेंट मायकेल चर्च हे तर १०४० सालापासून उभं आहे (चित्र-९).

चित्र-७: पुरातन पब


चित्र-८: इंग्लंडमधलं पहिलं कॉफी शॉप


चित्र-९: सेंट मायकेल चर्च

शहरातली बहुतेक जागा विद्यापिठाचे विविध विभाग, ग्रंथालये, दवाखाने, बागा व संग्रहालये यांनी नाहीतर कॉलेजांनी व्यापलेली आहे. जॉन रॅडक्लिफ या राणी अ‍ॅनच्या डॉक्टरच्या नावाने १७७० साली पाच एकरांच्या जागेवर 'रॅडक्लिफ इन्फर्मरी' नामक दवाखाना उभा राहीला (चित्र-१०). इथेच पेनिसिलिनचा मनुष्यावर प्रथम वापर केला गेला. ही जागा विद्यापिठाला नंतर मिळाली. आता हे बंद करून इथले विभाग विद्यापिठाच्या इतर चार मोठ्ठाल्या दवाखान्यात हलवले आहेत.

चित्र-१०: रॅडक्लिफ इन्फर्मरी

विद्यापिठाची अनेक संग्रहालये आहेत. त्यातलं एक वाद्यांचं आहे. इथे देशीविदेशी जुन्यापुराण्या वाद्यांचा प्रचंड मोठा साठा आहे. तो नुसता साठा नाहीये तर ती वाद्यं वाजण्याच्या स्थितित पण आहेत! जेव्हा या संग्रहालयात काही विशेष कार्यक्रम होतात तेव्हा तेथील कर्मचारी ती वाद्यं वाजवून दाखवितात.

दुसरं संग्रहालय आहे हिस्टरी ऑफ सायन्सचं! इथे सुमारे २०,००० जुनी शास्त्रीय उपकरणं ठेवलेली आहेत. अधून मधून त्यातल्या उपकरणांबद्दल माहिती देणारी व्याख्यानं होत असतात. अशाच एका अ‍ॅस्ट्रोलेब नामक उपकरणावरील व्याख्यानाबद्दल मी इथे लिहीलेलं आहे. १६ मे १९३१ रोजी आईन्स्टाईनने ऑक्सफर्ड मधे दिलेल्या भाषणात वापरलेला फळा त्यावर लिहीलेल्या समीकरणांसकट जपलेला आहे. आईन्स्टाईनने त्या भाषणात अवकाश प्रसरणाबद्दलचे आपले विचार मांडले होते.

चित्र-११: आईन्स्टाईनने वापरलेला फळा

अ‍ॅशमोल नावाच्या माणसाने जगातल्या कानाकोपर्‍यातून जमवलेल्या वस्तूंचं अ‍ॅशमोलीन संग्रहालय आहे. आत्ता जिथे हिस्टरी ऑफ सायन्स संग्रहालय आहे तिथे हे पूर्वी होतं. पण हळूहळू संग्रह वाढत गेल्याने एक नवीन इमारत उभी करून त्यात अ‍ॅशमोलीन संग्रहालय हलवलं.

नॅचरल हिस्टरी संग्रहालयामधे विविध प्राण्यांचे व पक्ष्यांचे सांगाडे तसंच मृत किडे व फुलपाखरं असे एकूण अडीच लाखाच्या वर नमुने ठेवलेले आहेत. ऑक्सफर्डपासून फक्त दोन मैलावर सापडलेले डायनासोरांचे सांगाडे इथे पहायला मिळतात.

सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ही संग्रहालयं बघायला एक छदाम पण मोजावा लागत नाही.

विविध क्षेत्रात प्रसिद्धी मिळवलेल्या बर्‍याच लोकांची नाळ ऑक्सफर्डला जोडलेली आहे. ऑक्सफर्डमधून बरेच नेते शिकून बाहेर पडले आहेत. डॉ. मनमोहन सिंग, इंदिरा गांधी, बिल क्लिंटन, डेव्हिड कॅमेरॉन (सध्याचा इंग्लंडचा पंतप्रधान) ही त्यातली काही ठळक नावं!

ऑक्सफर्डच्या हाय स्ट्रीट नावाच्या रस्त्यावरून चालताना बॉईल व हूक यांच्या शोधांबद्दलची एक पाटी दिसते (चित्र-१२).

चित्र-१२: बॉईल व हूक यांच्या शोधांबद्दल

अ‍ॅलिस इन वंडरलँड या पुस्तकाचा जनक लुईस कॅरॉल इथलाच! त्याचं खरं नाव चार्लस डॉजसन! ख्राईस्ट चर्च कॉलेजमधे (चित्र-१३) गणित शिकायला तो १८५१ साली आला, नंतर तिथेच शिक्षक झाला आणि मरेपर्यंत तिथेच रमला. त्या कॉलेजमधे असताना त्याने कॉलेज प्रमुखाच्या बागेतून कॅथिड्रलचे फोटो काढायची परवानगी मिळवली. तो कॅमेर्‍याची उभारणी करत असताना प्रमुखाची मुलगी अ‍ॅलिस व तिची भावंडं 'आमचे पण फोटो काढ' म्हणून त्याच्या मागे लागल्या. त्यातून त्यांची ओळख वाढली. तो त्यांना गोष्टीतून जादुई दुनियेत घेऊन जायचा. यातूनच त्या जगप्रसिद्ध पुस्तकांची निर्मिती झाली. ख्राईस्ट चर्च कॉलेज बाहेरच्या दुकानात (चित्र-१४) अ‍ॅलिस बर्‍याच वेळी खाऊ व गोळ्या घ्यायला जायची. थ्रू द लुकिंग ग्लास या गोष्टीची सुरुवात त्याच दुकानात होते.

चित्र-१३: ख्राईस्ट चर्च कॉलेजची मागची बाजू


चित्र-१४: अ‍ॅलिसचं दुकान, उजवीकडे कॉलेजचं फाटक आहे

पेम्ब्रोक कॉलेजमधे शिकवायला असताना जे आर आर टॉलकिनने द हॉबिट व लॉर्ड ऑफ द रिंग्ज ही पुस्तकं लिहीली.

मॉरिस नावाच्या माणसाने ऑक्सफर्डमधे कार बनविण्याचा कारखाना १९१३ साली उघडला. तिथे बनलेल्या पहिल्या वहिल्या कारचं नाव त्याने अर्थातच 'ऑक्सफर्ड' ठेवलं. गंमत म्हणजे तो सायकल वेडा होता. सायकल शर्यतीत भाग घ्यायचा. त्यानं आधी सायकल दुरुस्तीचं दुकान काढलेलं होतं. तिथेच तो सायकली तयार पण करायचा. सायकलचे स्पेअर पार्ट्स बर्मिंगहम वरून मागवावे लागत. घाई असली तर कधी कधी तो स्वतः एका दिवसात सायकलवर बर्मिंगहमला (ऑक्सफर्ड बर्मिंगहम अंतर जाऊन येऊन १२० मैल आहे) जाऊन पार्ट्स घेऊन यायचा. सायकली बनवता बनवता तो मोटर सायकली बनवायला लागला आणि त्यातूनच शेवटी कार्स! त्याचा कारखाना आता बीएमड्ब्ल्यूने घेतलेला आहे. तिथे आता 'मिनी' नावाची कार बनते.

केंब्रिज आणि ऑक्सफर्ड विद्यापिठांमधे एकच ग्रंथालय असण्याची प्रथा नाहीये. विद्यापिठाचं एक ग्रंथालय असतं, प्रत्येक कॉलेजमधे एक असतं आणि शिवाय प्रत्येक शाखेचं एक असतं. ऑक्सफर्ड मधे अशा एकूण ४० एक ग्रंथालयांच्या समूहाला बॉडलियन ग्रंथालयं म्हणतात.

ऑक्सफर्ड मधील १४व्या शतकात सुरू झालेल्या ग्रंथालयाची स्थिती खालावल्यानंतर १६व्या शतकाच्या शेवटी बॉडले याच्या देणगीमुळे त्याला पुनरुज्जीवन मिळालं. तेव्हापासून त्याचं नाव बॉडलियन ग्रंथालय झालं. नंतर जॉन रॅडक्लिफ या राणी अ‍ॅनच्या डॉक्टरने दिलेल्या देणगीतून बॉडलियन ग्रंथालयाचा विस्तार झाला. त्या विस्तारि भागाला रॅडक्लिफ कॅमेरा (चित्र-१५) म्हणतात. कॅमेरा शब्दाचा अर्थ इटालियन भाषेत खोली (रूम) असा होतो.

चित्र-१५: रॅडक्लिफ कॅमेरा

सध्या विद्यापिठात चाळीसच्या वर कॉलेजेस आहेत. प्रत्येक कॉलेजला त्याचा त्याचा सुरस इतिहास आहे. १८८४ साली ऑक्सफर्ड मधे स्त्रियांचं पहिलं कॉलेज सुरू झालं. त्यांना लेक्चर्सना आणि परीक्षेला बसायची परवानगी होती पण त्यांना डिग्री मिळायची नाही. ती १९२० पासून मिळायला लागली.

ऑक्सफर्ड मधलं एक ऑल सोल्स नावाचं कॉलेज एकदम वेगळं आहे. तिथे फक्त पदव्युत्तर शिक्षणासाठीच प्रवेश मिळू शकतो. प्रवेश मिळवण्यासाठी एका अत्यंत अवघड परीक्षेतून पार व्हावं लागतं. त्यामुळेच इथे प्रवेश मिळवणं फार मानाचं मानलं जातं. प्रवेश मिळालेल्यांना काहीही शिकवलं जात नाही, त्यांच्यावर कुठलंही संशोधन करायचं बंधन नसतं. विद्यार्थी त्याला वाटेल ते शिकण्यास मोकळा असतो. प्रत्येक विद्यार्थ्याला वर्षाला सुमारे १५,००० पौंड शिष्यवृत्ती मिळते.

तसं अजून बरंच काही लिहीता येण्यासारखं आहे, कारण प्रत्येक गोष्टीला भला मोठा इतिहास आहे. पण कंटाळवाणं होईल म्हणून इथेच थांबतो!

तळटीप - १: केंब्रिज आणि ऑक्सफर्ड विद्यापिठांमधे एक खुन्नस (चुरस, चढाओढ) आहे. इतकी की ते एकमेकांचा नावाने उल्लेख टाळतात.. ते एकमेकांचा उल्लेख 'द अदर युनिव्हर्सिटी' असा करतात. त्यांच्यात दर वर्षी एक बोटीची शर्यत थेम्स नदीमधे लंडनच्या जवळ होते. खुन्नस असली तरी विविध संशोधनात एकमेकांना ते सहकार्य करतात.

तळटीप - २: ऑक्सफर्ड केंब्रिज मधे प्रत्येक विषयाची व्याख्यानं विद्यापिठाच्या त्या त्या विभागांमधे होतात. उदा. फिजिक्स मधील क्वांटम मेकॅनिक्स या विषयाची सर्व व्याख्यानं फिजिक्स विभागात होतात, त्यांना विद्यापिठाच्या सर्व कॉलेजमधील क्वांटम मेकॅनिक्स विषय घेतलेले विद्यार्थी हजर असतात. त्या विषयावरची ट्युटोरियल्स मात्र विद्यार्थी ज्या कॉलेजमधे आहे तिथले प्राध्यापक घेतात. ऑक्सफर्ड केंब्रिज मधील कॉलेजची व्याख्या अशी वेगळी आहे.. कॉलेज म्हणजे एक वसतीगृहच असतं पण त्यात ट्युटोरियल व्यतिरिक्त काहीही शिकवलं जात नाही. करमणुकीची साधनं, खेळाची साधनं, जेवण, स्वस्त दारूचा गुत्ता व प्रार्थना करायला छोटं चर्च (त्याला चॅपल म्हणतात) अशा बाकी सोयी कॉलेज देतं. शिक्षक व विद्यार्थी एकाच मोठ्या हॉलमधे जेवतात. आठवा, हॅरी पॉटर मधली जेवणाची दृश्यं! त्यांचं चित्रीकरण ख्राईस्ट चर्च कॉलेजच्या जेवणाच्या हॉलमधे झालेलं आहे.

फोटोंचे मूळ स्रोत :-

१. कारफॅक्स मनोरा --- http://www.flickr.com/photos/mpascalj/6288162593/sizes/m/in/photostream/

२. ऑक्सफर्ड किल्ला, आईन्स्टाईनचा फळा, बोडेलियन ग्रंथालय व सेंट मायकेल चर्च -- http://wanderinglawyer.com/2012/02/16/photo-gallery-oxford/

३. सेंट मेरीज चर्च व पुरातन पब ट्रिपअ‍ॅडव्हायझर वरून
http://www.tripadvisor.co.uk/LocationPhotos-g186361-Oxford_Oxfordshire_England.html

४. स्मारक व रस्त्यावरील क्रॉस
http://www.sacred-destinations.com/england/oxford-martyrs-memorial

५. थेम्स शेरवेल संगम -- http://en.wikipedia.org/wiki/River_Cherwell

६. रॅडक्लिफ इन्फर्मरी --- http://www.medsci.ox.ac.uk/oma/histoxfordmedicine/4radcliffeinfirmary.jpg/view

७. अ‍ॅलिसचं दुकान -- http://www.aliceinwonderlandshop.co.uk/

८. बॉईल व हूक यांच्या शोधाची पाटी - http://www.audunn-marie.com/oxford2005/index.html

९. ख्राईस्ट चर्च कॉलेज -- http://www.ralphwilliamson.co.uk/christchurch.html

माहिती विकीपिडियावरून घेतलेली आहे.

--- समाप्त ---

Monday, September 3, 2012

हा खेळ आकड्यांचा!

(सदर लेख जत्रा २०११ दिवाळी अंकात, 'विद्यापिठातील संशोधनाची ऐशीतैशी' या शीर्षकाखाली प्रसिद्ध झाला होता)

एका फुटकळ शहरात फुटकळ विद्यार्थ्यांसाठी फुटकळ लोकांनी चालवलेलं ज्ञानपिपासू नावाचं एक फुटकळ विद्यापीठ होतं. डोंगरावरचे भूखंड स्वस्त असतात म्हणून की काय हे पण डोंगरावरतीच वसलेलं होतं. टेकड्यांवर पूर्वी देवळं दिसायची तशी हल्ली विद्यापिठं दिसायला लागली आहेत! श्री. फुटाणे त्याचे एका वर्षापासूनचे शिळे कुलगुरू! कुलगुरू होण्यापूर्वी फुटाणे परीक्षा विभागाचे मुख्य होते. 'परीक्षा विभागातील कार्यक्षम आणि सशक्त अधिकारी' असा टिळा घेऊन कुलगुरू निवासात रहायला आल्या आल्या ते कैलासवासी झाले.. केवळ कुलगुरू निवासाचं नाव 'कैलास' होतं म्हणून! कार्यक्षम वगैरे ठीक होतं पण ते सशक्त प्रकरण काय असेल ते कुणालाच झेपलं नाही.

इतर विद्यापीठात चालतं तसचं कुठल्या न कुठल्या आकडेवारीच्या मागे सतत धावण्याचं काम इथेही चालायचं! किती मुलं पदवी परीक्षेला बसली? का बसली? किती पास झाली? किती मागासवर्गीय होती? किती पहिल्या वर्गात पास झाली? वर्गात न बसता किती पास झाली? किती विद्यार्थ्यांनी पदवीसाठी प्रवेश घेतला? किती उत्पन्न झालं? त्यातलं फीचं किती?.. कायम असली आकडेघाशी! मग तिची मागील वर्षांच्या आकडेवारीशी व पूर्वी ठरवलेल्या लक्ष्यांशी तुलना करायची, आणि परत पुढील आकडेवारी काय असावी त्याचे लक्ष्य ठरवायचे! 'मरावे परि आकड्यातुनि मारावे' हे सर्व आकडेशास्त्र्यांचं ब्रीद वाक्य!

प्रत्येक बातमीला ३ बाजू असतात असं म्हणतात - समर्थकांची, विरोधकांची आणि खरी! तशा इथल्या प्रत्येक आकड्याला पण असायच्या. कुठल्याही आकड्यातून प्रत्येक जण आपापल्या अंतस्थ हेतुंना सोयिस्कर अर्थ काढायचे.. साहजिकच ते परस्परविरोधी असल्यामुळे 'आकडे तेथे वाकडे' अशी नवी म्हण रुजली होती. उदा. मागासवर्गीय विद्यार्थ्यांची संख्या या वर्षी ०.५% वाढली तर विरोधक 'शिक्षण अजूनही लोकाभिमुख होत नाहीये' म्हणून नक्राश्रू ढाळायचे, समर्थक 'शिक्षण हळूहळू पण निश्चितपणे तळागाळा पर्यंत झिरपतंय' असा दुर्दम्य आशावाद दाखवायचे, तर आकडेमोडीत झालेली चूक ही खरी बाजू असायची!

बरेचसे आकडे सरकारी आहेत.. सरकारी नियमांइतकेच कालबाह्य! त्यातले काही तर त्यांची उपयुक्तता संपल्यानंतरही वर्षानुवर्ष काढत असतात. १९७३ साली आलेल्या पुरामुळे पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरील परिणामासंबंधीचे आकडे अजूनही काढले जातात. हो, ज्ञानपिपासू विद्यापीठ तेव्हा अस्तित्वात नव्हतं तरीही! बैल कसे एकदा गुर्‍हाळाला जुंपले की आपोआप गोल गोल फिरायला लागतात तसे ते कर्मचारी विद्यापीठात आले रे आले की आकड्यां भोवती फिरतात. अशा ह्या उत्क्रांतीच्या एका विशिष्ट पायरी वर फसलेल्या लोकांनी सत्तेपुढे शहाणपण चालत नाही असं कालबाह्यतेचं समर्थन का करावं?

नानाविधं आकडेवारीतून विद्यापीठाचं अंतरंग व शैक्षणिक आरोग्य कळतं असा वरच्या लोकांचा विश्वास असतो. त्यामुळेच, चुकून माकून कधी ठरवलेले लक्ष्य गाठलेच तर लोकांना आकडा लागल्याचा आनंद होतो. विद्यापीठातून प्रसिद्ध झालेल्या संशोधनपर निबंधांबद्दलही असे खूप आकडे होते, विद्यापीठ अनुदान मंडळाकडून दर वर्षी ते मागवले जायचे.. संशोधनावर संशोधन करण्यासाठी असावं बहुधा! बर्‍याचशा आकड्यांबद्दल कुलगुरूंचा, बोगद्यामधे असतो तितका, अंधार होता. आयुष्यात त्यांचा लोकसंख्या सोडता बाकी फारशा संख्यांशी प्रत्यक्ष संबंध आला नव्हता. त्यांना त्या बद्दल फार काही माहिती असण्याचं कारणही नव्हतं म्हणा! नगरसेवकाला स्वतःच्या वॉर्डाची काय दशा आहे हे कुठं माहिती असतं? त्याला ते वृत्तपत्रातूनच समजतं! तसंच कुलगुरूंच होतं. पण यावेळी संशोधनपर निबंधांबद्दलचे आकडे मंडळाने नेहमी प्रमाणे फायलीत ठेऊन दिले नाहीत तर 'या वर्षात विद्यापीठातून कमितकमी १५० शास्त्रीय लेख छापले गेले नाहीत तर विद्यापीठाचे अनुदान बंद करू' असं धमकीवजा पत्र विद्यापीठाला पाठवलं.. धमकी'वजा' म्हंटलं तरी पत्रात धमकीच 'अधिक' होती.

कुलगुरू भिकार्‍याला देखील भीक घालायचे नाहीत तेव्हा असल्या धमक्यांना कुठून घालणार? पण या वेळची गोष्ट वेगळी होती. या वर्षी विद्यापीठ अनुदान मंडळाचे अध्यक्ष श्री. भणभणकर हे होते. त्यांची ज्ञानपिपासू विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची संधी फुटाण्यांच्या कनेक्शन्समुळे गेली होती आणि त्याचा राग भणभणकरांच्या मनात भणभणत असणार अशी फुटाण्यांची अटकळ होती. खरं तसं काही नव्हतं. 'देशात दर्जेदार संशोधन का होत नाही?' यावर संसदेत उठलेल्या गदारोळामुळे शिक्षणमंत्र्यांनी निर्विकारपणे अनुदान मंडळाकडे त्याबद्दलची माहिती विचारली. मंडळाने त्यातून 'देशातलं संशोधन वाढायला पाहीजे' असा सोयिस्कर अर्थ काढला आणि सर्व विद्यापिठांना तशी पत्रं पाठवून दिली. बाकी, निबंधांची संख्या वाढली म्हणून संशोधनाचा दर्जा सुधारला असं म्हणणं म्हणजे प्रवासी वाढले म्हणून पिएमटीची वागणूक सौजन्यपूर्ण झाली असा अर्थ काढल्यासारखं आहे. किंवा ब्लॉगची संख्या वाढल्यामुळे साहित्याचा दर्जा सुधारला असं म्हणण्यासारखं!

फुटाण्यांना आपल्या कारकीर्दीत अनुदान थांबणं ही गोष्ट कॉमनवेल्थ गेम्स मधल्या परकीय खेळाडूंचं बाथरुम तुंबण्या इतकी लांच्छनास्पद वाटणं स्वाभाविक होतं! आत्तापर्यंत त्यांच्या कारकीर्दीत तुंबण्याच्या फारशा घटना घडलेल्या नव्हत्या. परीक्षा विभागात असताना चुकीचा प्रश्न पेपरात येण्याच्या एक दोन घटना आणि एक दोन पेपर फुटण्याच्या मामुली घटना. बास! इतकं तर बहुतेकांच्या कारकिर्दीत तुंबतच! या नाकर्तेपणाच्या शिक्क्यापायी ते फुटाण्यातल्या चोरासारखे वगळले गेले असते आणि आणखी तीन वर्षांसाठी कुलगुरू पदाची खुर्ची उबवायला मिळाली नसती. त्यामुळे त्यांना सर्व विभाग प्रमुखांची तातडीची बैठक बोलावण्या शिवाय गत्यंतर नव्हतं.

तत्पूर्वी, त्यांनी गेल्या वर्षात विद्यापीठातून एकूण किती निबंध प्रसिद्ध झाले, इतर विद्यापीठांतून किती झाले याची आकडेवारी मागवून घेण्याची अक्कलहुशारी दाखवली.. कदाचित हाच तो त्यांचा बहुचर्चित सशक्तपणा असावा! गेल्या वर्षात विद्यापीठातून एकूण फक्त ८ निबंध प्रसिद्ध झाले होते. या पार्श्वभूमिवर, अनुदान मंडळाच्या गणपतीला १५० निबंधांचा नैवेद्य कसा दाखवणार? आधीच, 'फीच्या चरकात पिळवटून पोरांचं शोषण करणारं ज्ञानपिपासू विद्यापीठ हे प्रत्यक्षात रक्तपिपासू आहे' अशी हेटाळणी नेहमी सर्वत्र व्हायची. त्यात हे जमिनीत मुरणारं पाणी बाहेर आलं तर नावातलं 'ज्ञान' गळून नुसतं 'पिपासू' राहील अशी सार्थ भीति कुलगुरूंना होती.

'आपल्या विद्यापीठातून फारसं संशोधन होत नाही अशी टीका मी नुकतीच ऐकली! यावर तुमचं काय म्हणणं आहे?'. कुलगुरूंनी चिंतेचा षड्ज लावला.

'कोण म्हणतं असं? जे कुणी म्हणत असतील त्यांना संशोधन कशाशी खातात ते माहीत नाही!' कुणीतरी निषेधाचं रणशिंग फुंकलं.

'संशोधनाचं कसं असतं.. अमेरिकेत एखादा शोध लागतो. मग काही महिन्यांनी रशियन लोकं, तोच शोध बोरिस झकमारोस्की नावाच्या शास्त्रज्ञाने १७९९ सालीच लावला होता असं जाहीर करतात. त्या दोघांची वादावादी चालू असताना जपानी लोकं मात्र शांतपणे त्या शोधाचा वापर करून नवीन उपकरण बाजारात आणतात'. या प्रमुखाला विनोद करायचा असतो की काही तरी गंभीरपणे म्हणायचं असतं ते कधीच कुणाला समजायचं नाही.

'कुठल्या प्रकारचं संशोधन?' एका प्रमुखाला, प्रतिभा पाटलांना राष्ट्रपती म्हणायचं की राष्ट्रपत्नी अशा प्रकारचा, पेच पडला असावा! लोक उगीचच फाटे फोडणार याची कुलगुरूंना पूर्ण कल्पना होती म्हणूनच त्यांनी 'झाकली मूठ अनुदानाची' असा पवित्रा घेतला होता.

'म्हणूनच मी विद्यापीठाने गेल्या वर्षी किती पेपर्स छापले त्याची माहिती काढली. तर ८ पेपर्स झालेत. फक्त ८! आपल्या विद्यापीठात १५ च्या वर विभाग आहेत आणि फक्त ८ पेपर्स? ही अगदीच नामुष्कीची गोष्ट आहे. बाकीच्या विद्यापीठांचं बघा, वर्षाला दिडदोनशे छापतात. प्रत्येक विभागाने १० जरी पेपर्स टाकले तर आपल्यालाही ते सहज जमेल'. कुलगुरू समेवर आले. त्यांना पेपर टाकणं आणि पोष्टात पत्रं टाकणं यातला फरक माहीत नसावा.

'पण सर, आपल्या माहितीत काहीतरी चूक आहे. आमच्या विभागातूनच ८ पेक्षा जास्त पेपर्स नक्की गेले आहेत'. त्यातले साभार किती परत आले ते संख्याशास्त्राच्या प्रमुखांनी सोयिस्करपणे सांगायचं टाळलं. साध्यासुध्या संख्यांतून असंख्य विस्मयकारक अनुमानं काढणं हा त्यांच्या डाव्या हाताचा मळ होता.

'मी गेल्या वर्षाबद्दल बोलतोय. विद्यापीठ सुरू होऊन १२ वर्षं झाली. आणि इतक्या वर्षात तुम्ही फक्त ८ पेपर्स छापले त्यात भूषणावह काय आहे?'

'विथ ड्यू रिस्पेक्ट सर! पण रिसर्चचे पेपर छापणं हे काही परीक्षेचे पेपर छापण्या इतकं सोप्पं नाही. परीक्षेच्या पेपरात एखादा प्रश्न चुकला तरी सगळ्या विद्यार्थ्यांना त्या प्रश्नांचे पूर्ण मार्क देऊन नामानिराळं होता येतं. रिसर्च पेपर मधे चूक झाली की पूर्ण पेपर रिजेक्ट होतो.'

हायझेनबर्गच्या अनसर्टन्टी बद्दल अनसर्टन्टी असली तरी कुलगुरूंच्या बायोडेटा बद्दल कसलीही अनसर्टन्टी पदार्थविज्ञान विभागाच्या प्रमुखांना नव्हती. तसं, शिक्षणाशी फटकून असलेल्या कुलगुरूंनी विद्यापीठ चालवणं म्हणजे शेळीवरून उंट हाकण्यासारखंच आहे यावर सर्व प्रमुखांचं एकमत असणं हे एक आश्चर्यच होतं! त्यामुळे कुलगुरूंनी संशोधनावर काहीही भंकस केल्यावर त्यांची चिडचिड न व्हायला ते काही मादाम टुसॉड्स मधले पुतळे नव्हते. पण असं उघडपणे कुलगुरूंना ते कसे बोलणार? निधड्या छातीच्या सैनिकाला देखील आपल्या बायकोला 'तुला स्वयंपाक येत नाही' असं म्हणायची छाती होत नाही. मग हे तर एका यःकश्चित विद्यापीठातले यःकश्चित संशोधन करणारे यःकश्चित पोटार्थी! रिटायरमेंटच्या जवळ आलेले असल्यामुळे असेल कदाचित पण पदार्थविज्ञान विभागाचे प्रमुख त्याला अपवाद होते. 'विथ ड्यू रिस्पेक्ट सर' अशी वरकरणी सभ्य प्रस्तावना करून, वेळोवेळी कुलगुरूंना शालजोडीतले मारायचं काम ते आवडीने करायचे. अजून त्यांचे जोडे संपलेले नव्हते..

'आधी आघाडीच्या समस्या माहिती पाहीजेत. त्या साठी चांगलं ग्रंथालय हवं. मग संशोधनासाठी अद्ययावत उपकरणं, देशोदेशीच्या सेमिनारांना जाण्याच्या संधी आणि पैसे, बाहेरच्या शास्त्रज्ञांबरोबर चर्चासत्रं हवीत. अशा बर्‍याच गोष्टी आहेत. पण डोनेशन म्हणून घेतलेले पैसे आमच्या हाताला लागतील तर ना!' कुलगुरू शिक्षण क्षेत्रातले नसले तरी ते तथाकथित ज्ञानी लोकांना चांगलेच ओळखून होते. जो पर्यंत प्रमोशन सारख्या गोष्टींसाठी अडत नाही तो पर्यंत ते तत्व वगैरे बाष्कळ बडबड करत रहातात हे त्यांना माहीत होतं. कुठे काय आणि किती बोलायचं, आपल्या मर्यादा आणि ताकद याची त्यांना पूर्ण कल्पना होती. त्यामुळेच त्यांनी त्या टोमण्याकडे दुर्लक्ष केलं. शिवाय, त्यांनी संशोधनावर काही बोलणं म्हणजे छापखान्यात खिळे जुळवणार्‍याने कादंबरी कशी लिहावी यावर भाष्य केल्यासारखं झालं असतं.

'या यादीत सिम्पोझियम मधे टाकलेले पेपर्स दिसत नाहीत'. काही विभागांचे बरेच पेपर फुटकळ सिम्पोझियम मधे जायचे. भूगर्भशास्त्र त्यातलंच एक होतं! तसल्या सिम्पोझियमना आणि तिथे प्रकाशित होणार्‍या संशोधनाला सामान्यतः जगात काडीचीही किंमत दिली जात नाही. कारण तिथे काहीही फालतू पेपर्स घेतले जातात. तिथल्या पेपर सिलेक्शनबद्दल तज्ज्ञांच्या वर्तुळात एक अशी आख्यायिका आहे.. जमिनीवर एक रेघ मारायची आणि आलेले सर्व पेपर वरून खाली सोडायचे. जे रेषेच्या डावीकडे पडतील ते घ्यायचे, उजवीकडचे नाकारायचे! पण हे सगळं कुलगुरूंना माहिती असण्याची शक्यता नव्हतीच.

'हो का? बरं, मग गेल्या वर्षात किती पेपर्स झाले त्यात?' कुलगुरूंना लक्ष्मी रोडवर पार्किंग दिसल्याचा आनंद झाला.

'अम्ss! मला आत्ता ऑफ-हॅन्ड माहिती नाही! पण ४/५ तरी नक्कीच आहेत.' भूगर्भाने भूगर्भ पोखरून उंदीर काढला.

'ओह! मला वाटलं जरा मोठा तरी आकडा सांगाल! बरं, ते धरले तरीही एकूण संख्या १३च्या वर जात नाहीये!' तिथे झाडाची मुळं वर आलेली असल्यामुळे पार्किंग करणं शक्य नव्हतं.

'पण सर, हल्ली चांगले विद्यार्थीच येत नाहीत'. गणित विभाग प्रमुखांनी 'हल्ली' वर जोर देऊन जुनाच हायपॉथिसिस मांडला. विद्यार्थ्यांना नेमकं उलट वाटतं. विद्यार्थी-मास्तर, सून-सासू, मुलगी/मुलगा-आई/बाप ह्या वयानुरुप बदलणार्‍या आणि नेहमीच एकमेकांशी झगडणार्‍या अस्वस्थ अवस्था आहेत. एक अवस्था आपल्या अपयशाचं खापर नेहमी दुसर्‍या अवस्थेवर फोडत असते.

'वर्षात १० पेपर्स फार होतात. प्रतिकूल परिस्थितीतून वर आलेल्यांना ५०% सवलत हवी त्यात!' समाजशास्त्राच्या प्रमुखांनी एक मागासलेलं विधान केलं.

'नोबेल प्राईजमधे तशी सवलत द्यायला लागले की आपण पण देऊ!' कुलगुरूंच्या सुमार जोकवर सगळे बेसुमार हसले.

'मला वाटतं त्याचं कारण आपली फी आहे. गरीब पण हुशार मुलांची इतकी फी देण्यासारखी परिस्थिती नसते. आपण फी कमी केली तर काही वर्षात फरक दिसायला लागेल'.. पॉलिटिकल सायन्सच्या प्रमुखांनी समस्येला अति डावी बगल दिली! त्यांना गरिबांचा पुळका होता अशातला भाग नव्हता. विद्यापीठातल्या प्राध्यापकांच्या मुलांना फी मधे सवलत नव्हती. लवकरच त्यांना स्वतःच्या मुलासाठी संपूर्ण फी भरावी लागणार होती ही खरी व्यथा त्या मागे होती.

'हे पहा!'.. कुलगुरूंची बॅटरी संपली.. 'मला पुढच्या १० वर्षानंतर संशोधनातली वाढ नकोय. पुढच्या वर्षामधे हवी आहे.'

'जे वर्षाला दिडदोनशे छापतात त्यातला बराचसा कचराच असतो पण! उगाच आपलं भारंभार काही तरी कशाला छापायचं?' एक ढुढ्ढाचार्य बकले.

'तोच कचरा त्यांची ग्रँट टिकवतंय. हेच सांगायला ही मिटींग होती. या वर्षी १५० पेपर केले नाहीत तर संशोधनाची ग्रँट गेलीच म्हणून समजा. मंडळाचं तसं पत्र मला आलं आहे'. सर्व प्रमुखांना मिटिंगचा हेतू आणि गांभीर्य या दोन्ही गोष्टी एकदमच समजल्या. इतका वेळ घड्याळाकडे बघत बघत ते कुलगुरूंच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत होते. कारण, संशोधनाची वाट लागली तरी कुलगुरू कुणाच्या टाळूचा केस पण वाकडा करू शकले नसते. मात्र मंडळाचं अनुदान हे सगळ्यांचच राखीव कुरण असल्याने नुसती चौकशी समिती नेमून चालढकल करण्यासारखं ते प्रकरण नव्हतं. त्यामुळेच, 'दर महिन्याला प्रत्येक विभागानकडून मला प्रोग्रेस रिपोर्ट मिळायला हवा' या कुलगुरूंच्या हुकुमाला सगळ्यांनी मान्यता दिली.. हरी अडल्यावर दुसरं काय करणार?

अशा रीतिने कुलगुरूंनी आपला अस्वस्थपणा विभाग प्रमुखांकडे ढकलला. विभाग प्रमुखही निष्काम कर्मयोगी असल्यामुळे त्यांनीही तत्परतेने कुलगुरूंचा आकडा जसाच्या तसा आपल्या प्रोफेसरांकडे दिला. आणि त्यांच्याकडून प्रत्यक्ष संशोधन करणार्‍या विद्यार्थ्यांपर्यंत पोचला.

पहिले तीन चार महिने काहीच प्रोग्रेस दिसला नाही. संशोधन वेगात चालू आहे अशा नुसत्या बंडला प्रोग्रेस रिपोर्टात मारल्या. पण दर महीन्याला तेच कसं काय लिहीणार? काही घडतच नव्हतं. विभाग प्रमुखांपासून सर्व संशोधकांना एकच चिंता लागायला लागली.. आकडा कसा गाठायचा? मटका प्रेमी पण पहात नसतील इतक्या उत्सुकतेने सगळे दर महिन्याला तो आकडा पहायचे. काही महिन्यांनी कुलगुरूंनाही खुर्चीचं बूड डळमळीत झाल्यासारखं वाटायला लागलं. तशात, पाचव्या महीन्यात एका वर्तमानपत्रानं ज्ञानपिपासूच्या काही संशोधक विद्यार्थ्यांना वेड लागल्याचे वृत्त दिलं आणि त्याचं खापर कुलगुरूंवर फोडलं. खरं तर एकालाच लागलं होतं. पण बातम्या सनसनाटी केल्याशिवाय कोण वाचणार? तर तो संशोधक म्हणे कागदावर भराभर काहीतरी लिहायचा आणि नंतर तो कागद लपवून ठेवायचा. कारण त्याच्या मते त्याला फार चांगल्या कल्पना सुचायच्या आणि दुसरे त्या चोरून ते संशोधन स्वतःच्या नावावर खपवतील म्हणून! त्या बातमीत वरती अशी मल्लिनाथी पण केलेली होती.. 'हे सर्व कुलगुरूंनी टाकलेल्या अनाठायी प्रेशर मुळे झालं आहे असा दावा एका मान्यवर प्रोफेसरांनं (आपलं नाव न सांगता) केला'.

गनिमी काव्यात कुलगुरू पारंगत असल्यामुळे त्यांनी तो अल्पसंतुष्ट आत्मा कोण ते शोधून काढलं.. तो मान्यवर प्रोफेसर आपल्या संशोधक विद्यार्थ्यांकडून भाजी आणणे, आपल्या पोरांची शाळेतून ने आण करणे अशी घरकामं करून घेतो अशी स्फोटक माहिती त्यांच्या हाती लागली. मग ही बातमी प्रसिद्ध होणं अपरिहार्यच झालं!

दर महीन्या गणिक आकडा गाठण्याचं प्रेशर वाढतच होतं. काहीच न सुचल्याने एकाने मळलेली वाट चोखाळायचा प्रयत्न केला.. त्याने कुणाचा तरी पेपर कॉपी केला. दुर्देवाने, ते प्रकरण बाहेर पडलं! कुलगुरूंनी पण धोरणी पणाने त्याला निलंबित केलं.. पूर्ण चौकशी होई पर्यंत फक्त! दरम्यान कुलगुरूं सकट सर्वांना आकडा एकाने कमी झाल्याचं दु:ख झालं.

पुढच्या काही महीन्यात मात्र अनेक अभिनव, भूभंगी पेपर आले. त्यांचे गोषवारे असे..

मानसशास्त्राच्या एका प्रोफेसरांना कुतुहलाचं कुतुहल निर्माण झालं आणि त्यांचा निष्कर्ष भरपूर कुतुहल निर्माण करून गेला -- गरज ही शोधाची जननी आहे तर कुतुहल ही गरजेची! निव्वळ कुतुहलापोटी काही प्रश्न निर्माण होतात आणि त्याची उत्तरं मिळवणं काहींना गरजेचं वाटतं. प्रश्न असा आहे की कुतुहल कसं निर्माण होतं? न्यूटनला सफरचंद पडताना पाहूनच का कुतुहल निर्माण झालं? त्या आधी त्यानं इतर काही पडताना पाहीलंच नसेल हे काही खरं वाटत नाही. मग तेव्हा त्याचं कुतुहल का नाही जागृत झालं? तर आमच्या मते, त्याचं मर्म, सफरचंद टाळक्यात पडण्यात आहे.. केवळ त्यामुळेच त्याच्या विचारबुद्धीला धक्का बसला आणि ती कार्यान्वित झाली असावी! डोक्यात सफरचंद पडल्यावर मेंदुतील लहरींमधे वाढ होते असं आम्ही बर्‍याच प्रयोगाअंती सिद्ध केलं आहे. नंतर आमच्या असंही लक्षात आलं की डोक्यात काहीही पडलं तरी लहरींमधे वाढ होते, सफरचंदच पडायला पाहीजे असं काही नाही (ही खरी बुद्धिमत्तेची उत्तुंग झेप!).

म्हणजे, एखादा प्रश्न भेडसावत असेल तर भिंतीवर डोकं आपटा असं म्हणतात त्यात तथ्य आहे तर! त्या पेपरामुळे बर्‍याच विद्वानांच्या विचारबुद्धीला धक्का बसला मात्र! त्याच धक्क्याने त्यांना, न्यूटन नारळाच्या झाडाखाली बसला असता तर काय झालं असतं याचा विचार करण्यासाठी आपल्या डोक्यावर काय पडायला पाहीजे, याचा उहापोह करण्यास प्रवृत्त केलं!

जीवशास्त्रातल्या एकाचा हा शोध -- बेडका समोर नुसती पेन्सिल जरी आपटली तरी बेडूक उडी मारून बाजूला होतो. त्याचा एक पाय कापला तरी तो उरलेल्या ३ पायांवर बाजुला जायचा प्रयत्न करतो. अगदी तीन पाय कापले तरीही तो सरकण्याचा प्रयत्न करताना दिसतो. पण चारही पाय कापल्यावर मात्र नाही. सगळे पाय कापल्यावर त्याला पेन्सिल दिसत नाही असा अफलातून निष्कर्ष एका पेपरात होता.

काही संशोधनात 'गुणसूत्रांसारखी अवगुणसूत्रं पण असतात का?', 'कस्तुरीमृग, कांचनमृग आणि शहामृग हे जीवशास्त्रीय दृष्ट्या एकाच प्रकारचे प्राणी आहेत की नाहीत?' असल्या घोडा छाप प्रश्नांवर बरंच चर्वितचर्वण केलेलं होतं. काहींनी, आपण काही तरी मूलभूत आणि महत्वाचं सांगत आहोत असा आव आणून, जगाला आधी पासूनच माहीत असलेल्या गोष्टी सांगितल्या. त्या मागे संशोधकांची वैचारिक बद्धकोष्ठता असावी. नाही म्हणायला त्यांच्या पेपर संख्येत वेगवान भर पडली. त्यातले काही पेपर असे.. 'जास्त कंप्युटर गेम खेळणारे विद्यार्थी गृहपाठात मागे पडतात', 'नाक शिंकरणे ही मनुष्य प्राण्याची खासियत आहे, इतर प्राण्यांमधे ती आढळत नाही', 'हँगोव्हर मुळे त्रास होतो', 'कार्यालयात शुद्ध हवा मिळाली तर कर्मचार्‍यांचं आरोग्य चांगलं रहातं!', 'दूषित पाणी विकसनशील देशात जास्त मुलांचा बळी घेतं'.

काही शिरोमणींना माणसाच्या कुठल्याही कृतीशी, उत्क्रांती आणि लाखो वर्षांपूर्वीची त्याची रहाणी, याचा संबंध जोडण्याचा हव्यास दिसला. कुरूप तरुणाशी लग्न केलेल्या सुंदर तरुणी, सुंदर तरुणाशी लग्न केलेल्या कुरूप तरुणींपेक्षा जास्त सुखी असतात. कारण, सुंदर पुरुषांचा आपल्या जोडीदाराला भावनिक आधार देण्याकडे कमी कल असतो. याचं मूळ उत्क्रांतीमधे आहे ते असं.. सुंदर पुरुषांना सहजपणे भरपूर जोडीदार मिळू शकतात. किंवा, स्त्रियांना चष्मा लावणारे पुरूष, न लावणार्‍यांपेक्षा कमी आकर्षक वाटतात. कारण, प्राचीन काळी कुठे चष्मा होता? तसंच, स्त्रियांना नकाशे किंवा दिशा लवकर समजत नाहीत पण पुरुषांना समजतात. कारण, परत उत्क्रांतीच! पुरुष पूर्वी शिकारीला बाहेर पडायचा ना? त्यामुळे! त्यांना जरा स्कोप दिला तर, हल्लीच्या माणसाच्या नेटवरच्या भटकंतीत आदिमानवाच्या रानोमाळ भटकंतीच्या खुणा कशा आहेत, ते पण दाखवतील.

या लेखांवर आलेल्या प्रतिक्रियांना नेहमी प्रमाणे ३ बाजू होत्याच. असल्या फालतू संशोधनावरचा खर्च बंद केला तर फी पण कमी होईल. किंवा, संशोधनाला चांगला विषय सुचण्यासाठी भिंतीवर डोकं आपटून पहा. निदान डोकं फुटून जगाचा छळ तरी वाचेल. वगैरे, वगैरे! उलट, कुलगुरूंसारख्या समर्थकांनी 'आपलं कुतुहल शमवणं हे तहान लागल्यावर विहीर खणण्याइतकं नैसर्गिक आहे' असं विधान करून आपला पाठिंबा दिला. खर्‍या बाजूबद्दल तुम्हाला सांगायला नकोच!

बायोफिजिक्सच्या एका संशोधकाने केवळ ३ महीन्यात १५ पेपर पाडलेले बघताच कुलगुरूंना आकडा लागल्याचा आनंद झाला. त्याच्या यशाचं रहस्य जाणून घेण्यासाठी कुलगुरूंनी त्याला भेटायला बोलावलं. तर तो म्हणाला.. 'मी सचिन तेंडुलकरचा फॅन असल्यामुळे सचिनच्या सर्वच गोष्टींमधे मला कमालीचा रस वाटतो. धावा काढण्यासाठी सचिन आत्तापर्यंत किती किलोमिटर पळाला असेल असा प्रश्न पडल्यावर मला माझ्यातला शास्त्रज्ञ आणि फॅन स्वस्थ बसू देईनात. ही आकडेमोड तशी बरीच गुंतागुंतीची आहे म्हणून मी काही बाबी गृहीत धरल्या.

१> सचिनने चौकार, षटकार मारलेले असले तरी त्या सर्व धावा पळून काढल्या.
२> बाईज, लेग बाईज साठी तो किती पळाला ते आकडेमोडीत धरायचं नाही.
३> भागिदारीत दुसर्‍या फलंदाजाच्या धावांसाठी तो किती पळाला ते धरायचं नाही.
४> गोलंदाजी टाकण्यासाठी किंवा क्षेत्ररक्षणासाठी त्याला किती पळावं लागलं ते धरायचं नाही.

या गृहितकानंतर असं गणित मांडता येतं..

खेळपट्टीची लांबी २०.१२ मिटर असते.

एक दिवसीय सामन्यातल्या सचिनच्या धावा १८१११ * २०.१२ = ३,६४,३९३ मिटर्स = ३६४.३९ कि.मी.

कसोटीतील धावा १४६९२ * २०.१२ = २,९५,६०३ मिटर्स = २९५.६० कि.मी.

एकूण ३६४.३९ + २९५.६० = ६५९.९९ कि. मी. म्हणजेच आत्तापर्यंत सचिन ६६० कि.मी. पळाला.'

तरीही यातून १५ पेपर कसे झाले हा पेच होताच! त्यावर संशोधकाने असा खुलासा केला.. 'एकदा सचिनवरचा पेपर अ‍ॅक्सेप्ट झाल्यावर पुढचं सगळं सोप्पं होतं. मग मी गावसकर, द्रवीड, सेहवाग अशा सर्व फलंदाजांवर पेपर टाकायला सुरुवात केली. प्रत्येक पेपरला सचिनवरच्या पेपरचा रेफरन्स होताच.' कुलगुरूंना मात्र एका छोट्या बीजाचा वटवृक्ष कसा होऊ शकतो याची साद्यंत कल्पना आली. पण संशोधकाच्या मते तर हे सगळं म्हणजे किस झाडकी पत्ती.. ही सगळी गणितं आणखी बिनचूक करून त्याच बीजाचं जंगल करणं शक्य होतं. त्यानं घेतलेली खेळपट्टीची लांबी तितकीशी बरोबर नाही. ती खरी २०.११६८ मिटर्स पाहीजे. तसंच, सचिनच्या एकट्याच्या धावा न घेता त्याच्या बरोबर झालेल्या भागिदारीतल्या सर्व धावा घ्यायल्या हव्यात. असा सुधारित पेपर सचिनवर झाला की परत गावसकर, द्रवीड, सेहवाग इ. इ. आहेतच!

अशा पद्धतीने पेपरांचा सडा पडणार हे समजताच कुलगुरू आनंदाने फुटाण्यासारखे उडाले, त्यांच्यासाठी ती गोष्ट म्हणजे सिटी बँक मोमेंट ऑफ सक्सेस होती.. आकडा गाठलेला होता, आता पुढची काही वर्ष तरी अनुदानाची चिंता नव्हती. या गोष्टीचं भांडवल करणं पुढच्या कुलगुरू पदासाठी आवश्यकच होतं. त्यांनी पेपर मधे लगेच 'संशोधनाला चालना आणि प्राधान्य देणारे द्रष्टे कुलग्रुरू' असा बँड वाजवून घेतला. 'मी फक्त संशोधनावर लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचं काम केलं' हे त्यांच्या मुलाखतीत आलं. तिकडे, पदार्थविज्ञान प्रमुखांनी 'हेच दिवस बघायला जिवंत ठेवलंस का रे नारायणा?' म्हणून हताशपणे भिंतीवर डोकं आपटलं.

====== समाप्त ======

Tuesday, August 7, 2012

इंग्लंड मधील भत्ताचारी लोक!

न्यूटन, स्टिफन हॉकिंग, बेअर्ड, ग्रॅहॅम बेल, मॅक्सवेल, डार्विन या सारख्या शास्त्रज्ञांचा, शॅकल्टन, कॅप्टन कुक सारख्या धाडशी माणसांचा व चॅप्लिन, ज्युली अँड्र्यूज सारख्या अभिनेत्यांचा इंग्लंड हा देश असल्यामुळे मला इंग्लंड मधे यायच्या आधी आणि आल्यानंतर काही दिवस इथल्या प्रत्येक माणसाबद्दल प्रचंड आदर वगैरे वाटायचा. इथले सर्व लोक प्रचंड हुशार, कामसू व प्रामाणिक असतील हा गैरसमज त्यातूनच झालेला!

नंतर ऑफिसातल्या लोकांचं वर्तन, पेपरातल्या बातम्या, टाटांनी मारलेली चपराक पहाता इतकं समजलं की मोजके लोक सोडता बाकीचे कामाच्या नावाखाली टाईमपासच करीत असतात. तसं हे विशेष नाही कारण जगात सगळीकडे साधारण अशीच परिस्थिती आहे.

मग विशेष काय आहे? विशेष आहे तो एक ऐतखाऊ कामचुकार समाज! या समाजातले लोक पिढ्यान पिढ्या काम न करता, आयुष्यभर शिट्ट्या मारत आरामात फिरतात. ते सगळे लोक म्युन्सिपाल्टीने दिलेल्या घरात रहातात. अशी घरं पुरविण्याचा म्युन्सिपाल्टींचा खर्च वर्षाला सुमारे २१ बिल्यन पौंड (१६८ हजार कोटी रुपये (१)) आहे. एक सहा मुलांची अविवाहीत आई महिन्याला सुमारे साडेपाच लाख रुपये भाड्याच्या व सुमारे १६ कोटी रुपयांच्या अलिशान घरात रहाते. हे सगळे पैसे अर्थातच करदात्यांच्या खिशातून येतात. नोकरदार सामान्य माणूस असली घरं फक्त स्वप्नातच बघू शकतो. त्यामुळेच आपण भरलेल्या करांवर आपल्याला न परवडणार्‍या घरात हे ऐतखाऊ आनंदाने रहाताना बघून त्याचा किती संताप होईल त्याची कल्पनाच केलेली बरी!

हे लोक तर्‍हेतर्‍हेच्या सरकारी भत्त्यांवर जगतात, म्हणूनच मी त्यांना भत्ताचारी म्हणतो. वरती दिला आहे तो घरभत्ता! असाच बेकारभत्ता पण असतो. बेकारभत्ता बहुतेक सगळ्या पाश्चात्य देशात मिळतो, पण इथले लोक बेकारभत्ता चालू ठेवण्यासाठी काहीना काही कारणाखाली देऊ केलेलं काम करायचं टाळतात. सध्या २५ वर्षाच्या खालच्या लोकांना आठवड्याला सुमारे साडेचार हजार रुपये तर २५च्या वरती सुमारे साडेपाच हजार रुपये इतका बेकारभत्ता आहे.

शिवाय 'मूल भत्ता' म्हणून एक भत्ता पण असतो. पैशाविना मुलांच्या काळजीत कमी पडू नये या उदात्त हेतुने तो देण्यात येतो. मूल १६ वर्षांचं होईपर्यंत तो मिळतो. पहिल्या मुलासाठी आठवड्याला सुमारे १६०० रुपये तर पुढच्या प्रत्येक मुलासाठी आठवड्याला सुमारे ११०० रुपये इतका तो आहे. साहजिकच या लोकांचा कल जास्त मुलं पैदा करण्याकडे असतो. या शिवाय गर्भारपणात स्वतःची आणि बाळाची काळजी घेण्यासाठी वेगळे पैसे मिळतात. इथल्या सरकारनेच प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार १० पोरं असलेलं कुटुंब वर्षाला सुमारे ४८ लाखांपेक्षा जास्त रुपये विविध भत्त्यांपोटी कमवू शकतात.

नंतर येतो तो 'अक्षमता भत्ता' म्हणजे जे लोक काही कारणामुळे काम करण्यास असमर्थ आहेत अशा लोकांना दिलेला भत्ता! थापा मारून याचाही लोक फायदा घेतात. एक बाई आपल्याला क्रचेस घेतल्याशिवाय चालताच येत नाही आणि १० मीटर चालल्यावर प्रचंड वेदना होतात अशा बंडला मारून तो भत्ता घेत होती. रोलरकोस्टरची राईड घेतानाचे तिचे फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर तिला मिळालेले पैसे परत करायला लागले.

बाकी रहातो तो वेळी अवेळी लागणारा डॉक्टरांचा व औषधपाण्याचा खर्च! इंग्लंड मधे रहाणार्‍या सर्वांना डॉक्टरांचा काहीही खर्च नाही. औषधपाण्याचा खर्च (डॉक्टरांनी काही प्रिस्क्रिप्शन दिलं तर) एका विशिष्ट आकड्याच्या (सुमारे ६०० रुपये) पुढे कधीच जात नाही.. मग ते औषध कितीही महाग असो. गर्भार बायका, साठीच्या पुढचे म्हातारे, १८ वर्षाच्या आतील मुलं अशांना ते फुकट मिळतं. पण बेकारभत्ता मिळणार्‍यांना देखील ते फुकटच आहे.

असे ऐषोआरामी लोक दिवसभर काय करणार? चकाट्या पिटणे, ड्रग्ज व दारु झोकून दंगामस्ती करणे या शिवाय दुसरं काय? फावल्या वेळात चुकार पोरंपोरीं पोरं पैदा करण्याचं उदात्त कार्य करतात! अनुज बिडवेचा खुनी, कियारन स्टेपलटन हाही अशाच कुटुंबातला एक बेकार तरुण! तो धरून एकूण सहा भावंडं आहेत. आई वडील आणि पोरं म्युन्सिपाल्टिने दिलेल्या घरात रहातात. जवळपास त्यांचे इतर नातेवाईक रहातात. त्या सगळ्यांपैकी कुणीच फारसं कामबिम कधी केलेलं नाही.

तो स्वतःला सायको किलर म्हणवतो. पोलिसांना व कोर्टाला खून करण्यामागे काही विवक्षित प्रेरणा, उद्देश, द्वेष, जातीय द्वेष, गरीबी असं काहीही आढळून आलेलं नाही. केवळ चीप थ्रिल मिळविण्यासाठी केलेला एक निरर्थक खून! त्यानं अनुजला का मारलं याचं उत्तर त्यानं कोर्टात 'आय ऑनेस्टली डोन्ट नो' असं दिलं आहे.

या वरून काही चांगल्या उद्देशाने केलेल्या कायद्याचं पर्यवसान समाजकंटक निर्माण करण्यात होऊ शकतं हे मात्र दिसून येतं.

त्यातली जमेची बाजू इतकीच की स्टेपलटनला पकडणे, खटला उभा करून, सुनावणी होऊन जन्मठेपेची शिक्षा फर्मावणे हे सगळं अवघ्या ७ महिन्यात उरकलं. त्याबद्दल मला तरी ब्रिटिश पोलिसांचं आणि न्यायसंस्थेचं कौतुक वाटतं.

(१) एक पौंड = सुमारे ८० रुपये असा सध्याचा भाव आहे.

=== समाप्त ===

Sunday, July 8, 2012

वाघोभरारी

'संकेत! इकडे ये! हे हीन अभिरुचीचे फोटो उद्या पर्यंत निघाले नाहीत तर मी स्वतः ते काढून जाळून टाकेन!'.. संध्याकाळी घरी आलेल्या शहाणे मास्तरांनी विलायती कपड्यांची होळी करणार्‍यांच्या आवेषात ठणकावलं. त्यांचा आवाज होताच तसा.. ठणठणीत! त्यांनी वाहतुकीच्या गोंगाटाच्या वरताण सूर लावला की प्रत्येक पोराला ते आपल्याच कानात ओरडताहेत असं वाटायचं!

'हीन अभिरुची काय बाबा? ते सही फोटो आहेत बरं का! एकदम फट्टाक! तुम्हाला नाही समजायचं त्यातलं! सारखी उगीच नावं ठेवता तुम्ही!'.. हा डायलॉग ऐकल्यावर लव-कुशांनी खुद्द वाल्मिकींना रामायण शिकवल्यासारखं मास्तरांना वाटलं.

'तू ही... ही जी अर्ध्या मुर्ध्या कपड्यातल्या बायकांची चित्रं लावली आहेत ना?.. त्याला हीन अभिरुची म्हणतात.. देहाचं हिडिस प्रदर्शन म्हणतात.. सौंदर्याची जाण नाही! कोणीतरी मूर्ख ढुढ्ढाचार्य उठतो.. नग्ननेत सौंदर्य आहे म्हणतो.. झापडं काढून बघायला हवं म्हणतो.. मग तुझ्यासारखे अर्धशिक्षित अपरिपक्व बाजीराव ओढतात त्याची री! त्यापेक्षा जरा स्वतःकडे झापडं काढून बघा! गलिच्छपणाची किळसवाणी जाणीव होईल'.. मास्तर हात नाचवत परत एकदा ठणठणले.. शिकवताना हातातली छडी नाचवायचे, एरवी नुसता हातच!

'तसं काही नाही हां! लतिका सुंदरच आहे.. एकदम सामान! एलपीडी मधे काय फुल्टु सुंदर दिसते ती! आई शप्पत!'.. भिंतीवरच्या फोटोंकडे बघत संकेतने कुकरची शिट्टी वाजल्यासारखा सुस्कारा सोडला.

'एलपीडी? म्हणजे काय?'.. कॅल्सी, समस, गबोल, धतिंग.. असली नवीन पीढीची संक्षिप्त विक्षिप्त रुपं ऐकली की मास्तरांना गटारात पडल्यासारखं गलिच्छ वाटायचं.

'लिंगाणा पे धिंगाणा! लतिकाचा नवीन पिक्चर आहे'

'शाब्बास! नावातच धिंगाणा! मग प्रत्यक्षात बघायलाच नको!'

'बाबा! त्यात काही धिंगाणा वगैरे काय नाहीये हां! एकदम टचिंग पिक्चर आहे तो! लतिकेचं काम काय सही झालंय! डोळ्यातून पाणी काढते ती अगदी!'

'ती? पाणी काढते?'.. मास्तर खवचटपणे हसले.. 'कपडे काढण्याशिवाय काही येतं का हल्लीच्या नट्यांना? हे सगळे फोटो लतिकेचेच का?'

'हो! उद्या सकाळी इथे येणार आहे ती शूटिंगला! लॉ कॉलेजच्या टेकडीवर! मी जाणार आहे बघायला'.. संकेतनं घुश्शात बापाकडे नीट निरखून पाहीलं. काळा वर्ण, पोट सुटलेलं, डोक्यावर मधोमध टक्कल, काळसर पांढर्‍या झालेल्या मिशा, कानातून केस बाहेर आलेले, अंगात इस्त्री न केलेले साधे कपडे, गबाळी पँट, न खोचलेला शर्ट.. काय पण अवतार? श्या! आपला बाप लतिकेच्या शेजारी कसा दिसेल?.. सुंदर पैलू पाडलेल्या हिर्‍याच्या नाजूक दागिन्यापाशी ठेवलेल्या लोखंडाच्या गंजलेल्या पत्र्यासारखा?

'अजिबात जायचं नाही! तू गेला नाहीस तर ती काही शूटिंग रद्द वगैरे करणार नाहीये. फॅनगिरी करायचं सोड रे! ती तुला तिची गाडी धुवायला देखील ठेवणार नाही हे लक्षात घे. लाळ घोटत नुसता मागे फिरू नकोस! त्यापेक्षा पोटापाण्याचं बघ.. अभ्यास कर, नाव कमव जरा! थोडं फार कर्तृत्व दाखवायचं बघ!'

'बाबा पण नुसतं शूटिंग बघायला जाणं म्हणजे लाळ घोटत मागे फिरणं होतं का? तुम्ही कधी बघितलंय का शूटिंग? काहीतरीच बोलायचं उगाच!'.. 'हीन अभिरुची' नामक शिखंडीच्या आडून झालेल्या अभ्यास रुपी बाणांच्या हल्ल्याकडे त्यानं तत्परतेने दुर्लक्ष केलं. पण शैक्षणिक कुबड्या अजून निघालेल्या नसल्यामुळे संकेतला पडतं घेणं अपरिहार्य होतं.

'आणि मी ते फोटो काढून टाकेन ना!'

'बरं! ठीक आहे. फोटो आजच निघाले पाहीजेत. या घरात तिला स्थान नाही. आणि शूटिंग संपल्यावर लगेच घरी ये. उगीच घोटाळत बसू नकोस.. समजलं?'.. मास्तरांना फारसं भांडण न होता ते किळसवाणे फोटो काढायला लावल्याचा आनंद झाला. आईविना वाढणार्‍या पोराला वळण लावायच्या अनेक आडवळणातलं एक अवघड वळण होतं ते!

------***-----------***---------
'मॅडम, पिरंगुट मधे संचारबंदी का केली आहे?'.. रवी सोनार या 'दैनिक भुंगा' च्या वार्ताहरानं एक भुंगा पोलीस उपनिरीक्षक रंजना जाधव यांच्या समोर सोडला.

'अतिरेकी फरार आहेत म्हणून जाहीर केलंय ना सकाळीच! परत परत तेच तेच विचारू नका हो, मला वेळ नाहीये अजिबात'.. मॅडमनी त्याला झटकला.

'मॅडम! एक वाघीण अतिरेकी कधी पासून झाली?'.. मॅडम चपापल्या. या सोनाराचे कान कुणी फुंकले?

'पिरंगुटात कुठली वाघीण?'.. मॅडमनी एक चाचपणी वजा प्रश्न टाकला.

'मॅडम! उगा वेड पांघरून पेडगावला जाऊ नका! तुम्हाला माहितीये मी काय म्हणतोय ते.'

'हम्म्म! तुम्हाला काय समजलंय ते आधी सांगा'

'हेच की ती वाघीण डॉ. तालेवार यांनी लहानपणापासून पाळलेली आहे.. किंवा होती म्हणू फार तर! तिचं नाव राणी आहे! तिला ते कात्रज उद्यानात देण्यासाठी सोमवारी रात्री व्हॅन मधून घेऊन चालले असताना त्यांच्या वर चोरीच्या उद्देशाने प्राणघातक हल्ला झाला.. पिरंगुटात! लुटारूंनी व्हॅनचं मागचं दार उघडल्यावर राणी त्यांच्यावर झेपावली. त्यात एक लुटारू मेला. बाकीचे फरार झाले. हे असं काहीतरी घडलंय ना?'

'हो. ज्या वाघिणीने २ माणसांचे बळी घेतले ती अतिरेकीच म्हणायला नको का?'

'अहो २ कुठले? एकच फार फार तर! डॉक्टरांचा मृत्यू चोरांच्या हल्ल्यामुळे झाला. राणी कशी मारेल आपल्याच मालकाला? अंगावर उडी पडल्यामुळे एक मेला असेल आणि तिच्या अंगाला रक्त लागलं असेल! बाकीचे लुटारू पळून गेल्यावर ती मालकाला चाटत उभी असेल किंवा जवळ उभी असेल. ते पाहिल्यावर कुणाचाही गैरसमज होईलच ना?'

'हम्म! हे पहा सोनार! तुम्हाला जे काही समजलंय ते आत्ता कृपया तुमच्या पुरतंच ठेवा. मला लोक उगीच घाबरून जायला नको आहेत!'

'ते ठीक आहे! पण अतिरेकी फरार असं सांगितल्यावर लोक जास्तच घाबरले असतील ना?'

'त्याला कारणं आहेत सोनार! सगळं कसं मी पब्लिकला सांगणार? दुपारीच अँटीटेरर स्क्वॅड कडून सतर्क रहाण्याची सूचना आली आहे. समजा, वाघ हे डायव्हर्जन असलं तर? कुणाला माहिती? तेव्हा ते तुमच्या पुरतंच ठेवा! आम्हाला आमच्या प्रोसिजर प्रमाणे जाउ द्या! ओके?'

सोनार ओके म्हणाला पण त्याला काही ते पटलेलं नव्हतं. पोलिसांचं काम म्हणजे चोराने जिचं मंगळसूत्र मारलंय तिलाच काळजी घेतली नाही म्हणून झापण्यातला प्रकार असतो असं सोनाराचं ठाम मत होतं.

------***-----------***---------
नटी आणि नकटी हे केवळ एका अक्षराचं अंतर असलेले दोन शब्द लतिकाचं वर्णन करायला पुरेसे होते. तिच्या नकटेपणाचं व्यंग्य विविध अंगप्रत्यंग-दर्शनामुळे झाकलं जातं असं काही सौंदर्य मिमांसकांचं मत होतं!

शूटिंग पहाणार्‍यांच्या प्रचंड गर्दीत संकेत व त्याच्या मित्रांना जेमतेम उभं रहायची जागा मिळाली, ती पण लांबच!

'कुठल्या पिच्चरचं शूटिंग आहे रे?'

'काय घेणं आहे? आपल्याला फक्त लतिकेशी घेणं आहे.'.. संकेतचा फंडा क्लिअर होता.

'वाघिणीचं साहस, नामक एका झ दर्जाचा गल्लाभरू सिनेमा आहे म्हणे'.. सामान्यत: सगळेच सिनेमे गल्ला भरायलाच बनवलेले असतात तरी फक्त अत्यंत टुकार सिनेमांसाठी गल्लाभरू हे विशेषण का राखीव असतं कुणास ठाऊक!

'जंगलातल्या खडतर जीवनाच्या व संकटांच्या कात्रीत सापडलेल्या असहाय तरुणीची ती कहाणी आहे, असं सकाळ मधे आलं होतं!'

'म्हणजे अधिकृतपणे चोळ्या चिंचोळ्या करून सेन्सॉरची कात्री बोथट करायची पळवाट!'

लतिका हे तिचं पडद्यावरचं नाव, खरं नाव गंगा येडेकर! लाखो तरुणांना येडं करून तिनं आपलं नाव सार्थ केलं होतं. तिला प्राण्यांची फार भीती वाटायची. कुठलाही प्राणी समोर आला तरी तिचे प्राण कंठाशी यायचे. असं असलं तरी या चित्रपटात अभिनयाला प्रचंड वाव आहे हे ठसवलं गेल्यामुळे जराशा अनिच्छेने ती काम करायला तयार झाली होती. 'सौंदर्याचा फसफसता सोडा', 'धगधगत्या ज्वानीचा जल्लोष' असल्या विशेषणांनी गाजणार्‍या तिच्या कारकिर्दीत एखादा फिल्मफेअर अ‍ॅवार्ड सारखा मानाचा तुरा खोवून तिला लब्धप्रतिष्ठीत टीकाकारांची तोंडं बंद करायची होती. म्हणूनच, जिवंत वाघीणी बरोबर चित्रीकरण करायला तिनं एक व्यावसायिक धर्मसंकट समजून कशीबशी मान्यता दिली होती.

डायरेक्टरने लतिकेला सीन समजावून दिला.. 'तू आणि ही वाघीण जंगलात बरोबरीने वाढलेल्या आहात. तिचं नाव 'बिंदी'! तुमची घनिष्ट मैत्री आहे. तू त्या गुहेतून तिला हाका मारत, शोधल्यासारखं करत यायचं, या झाडापर्यंत! या झाडाखाली ती लोळत पडलेली दिसेल!'.. तिच्या चेहर्‍यावरची काळजी पाहून डायरेक्टर म्हणाला.. 'घाबरू नकोस! या सीन मधे वाघीणीला हलायचं काम नाहीये म्हणून खर्‍या वाघीणीसारखं दिसणारं सॉफ्ट टॉय ठेवलंय. तर तू तिकडून आलीस की तिला कुरवाळून तिच्या पोटावर डोकं ठेवून, लोळत लोळत तिच्याशी गप्पा मारायच्या! समजलं?'

जंगल सुंदरी साकारायची असल्यामुळे सौंदर्य प्रसाधनांवर बंदी होती.. ते तिला रॅकेट शिवाय बॅडमिंटन खेळल्यासारखं वाटत होतं! तरीही कोरलेल्या भुवया व इतर अनावश्यक केसांची केलेली दाढी जाणकारांच्या नजरेतून सुटत नव्हती. केसातल्या भरगच्च फुलांमुळे तिनं डोक्यात फुलं घातलियेत की फुलात डोकं ते समजत नव्हतं!

'ठीके! लतिका तू गुहेत जा बरं! रिहर्सल करू या!'.. डायरेक्टर ओरडला आणि रिहर्सल सुरू झाली. लतिका बाहेर येऊन फारच लचकत मुरडत चालायला लागली.

'लतिका! तू कॅटवॉक वरून चाललेली नाहीयेस!'

'आssss! ओ माय गॉड! डायरेक्टssर! हे खडे आहेत की खिळे?'

'मग जंगलात काय लुसलुशीत गालिचा असणारे?'.. तिच्या चेहर्‍यावरचा वेदनांचा ट्रॅफिक जॅम पाहून डायरेक्टरने तिला सीनची आठवण करून दिली.

'अगदी गालिचा नको, पण दुसरं काही तरी बघाना! चप्पल घालू का?'

'बरं घाल!'.. नंतर लतिकेच्या उंच टाचाच्या चपला पाहून डायरेक्टर खडूसपणे म्हणाला.. 'नशीब माझं! मनगटावर घड्याळ आणि हातात पर्स नाचवत नाही आलीस त्या बद्दल!'..

'मला बसणारी साधी चप्पल नाहीये इथे!'.. त्यामुळे लतिकेचं चालणं स्लो मोशन ब्रेक डान्स वाटत होता.

चित्रीकरणासाठी लतिकेला गुहेत गेली नि दिग्दर्शक 'कॅमेरा, अ‍ॅक्शन' असं ओरडताच कॅमेरा बसलेल्या वाघिणीवर फिरून हळूहळू गुहेकडे वळता वळता मधेच एक वाघ चालत येताना दिसला.. ती राणी होती पण ते कुणालाच माहीत नव्हतं. कॅमेरामन हडबडला. कॅमेर्‍यातलं चित्र थरथरायला लागलं.. शूटिंगचा वाघ आत्ता अपेक्षित नव्हता.. बरोबर कुणी माणूस दिसत नव्हता.. शिवाय त्याचं तोंड रक्तानं माखलेलं दिसत होतं. जिवंत वाघासमोर उभं रहायला एक तर वाघाची किंवा रिंगमास्तरची तरी छाती पाहीजे. कॅमेरामनने जोरात ओरडायचा प्रयत्न केला पण त्याच्या तोंडातून ब्र सुद्धा आलं नाही. त्याने वाघाच्या दिशेने हातवारे केले व पळत सुटला.. पळता पळता त्याने राणीच्या डोळ्यात धूळ फेकायला खोटी वाघीण पाठीवर घेतली.. सगळेच भेदरून पळायला लागल्यामुळे पडापडी, धक्काबु़क्की व चेंगराचेंगरीला ऊत आला. प्रत्येकालाच आपला जीव प्यारा मग लतिकाला कोण विचारतो?

राणीला कुणाच्याही मागे पळायचं नव्हतं, ती बसायची जागा शोधत होती. नेमकी तिला खोट्या वाघाची जागाच सापडली. गुहेतल्या लतिकेला आरडाओरडा ऐकू आला पण तिला तो शूटिंग पहायला आलेल्या गर्दीचा वाटला. ती लचकत-मुरडत बाहेर आली, लाडिक बोलत बोलत वाघापाशी येऊन आरामात बसणार तोच तिला खरीखुरी डरकाळी ऐकू आली. एकदम तिच्या अंगातून एक विद्युत लहर गेल्याचं जाणवलं. जीवघेणी किंकाळी फोडायला तिनं तोंड उघडलं पण तो खोटा वाघ आहे हे आठवल्यावर तिनं एक आवंढा गिळून घशाची कोरड शमवायचा प्रयत्न केला. मग तिला त्या इफेक्टचं कौतुक वाटलं. निर्धास्त होऊन ती आणखी पुढे होताच राणी उडी घेऊन तिथून पसार झाली.. तिला अचानक कुणी तरी भॉक केल्यासारखं झालं! ती घाबरून फटकन दोन पावलं मागे सरली आणि दगडाला अडखळून पडली.. थोडं फार खरचटलं. जिवाच्या भीतीने पटकन उठली व नखशिखांत थरथरत ती विरुद्ध दिशेला पळू लागली. पळता पळता नको त्या भानगडीत पडल्याबद्दल हातवारे करत स्वतःला शिव्या घालत होती. जरी वाघ बघितलेला होता तरी तिचा चेहरा भूत बघितल्यासारखा झाला होता!

पळणार्‍यातली काही माणसं आता लॉ कॉलेज रस्त्यावर आली.. रस्ता नेहमी प्रमाणेच तुंबलेल्या गटारासारखा गच्च भरलेला होता. पळणार्‍या माणसांना बघून दुकानदारांनी फटाफट शटरं बंद केली. पण वाघानं धरलेल्या माणसाला पाहून ही दंगल नसून भुताखेताचा प्रकार आहे असं वाटलं.. मग मात्र मधमाशांच्या अनेक पोळ्यांवर दगड मारल्यासारखा हलकल्लोळ झाला. लोक दिसेल त्या बिल्डिंगमधे घुसायला लागले.. बिल्डिंगांची दारं फटाफट बंद व्हायला लागली.. सर्व रस्ते तुंबले. वहानं एकमेकात गुंतून पडली. कर्कश्य हॉर्न मारणे, इंचभर जागा दिसलीच तर त्यात गाडी घालून बोळा घट्ट करणे, खिडकीतून हातवारे करून दुसर्‍याला उपदेश करणे असे नेहमीचे प्रकार चालू होतेच. मग खेचाखेच, चिरडाचिरडी, धक्काबुक्की सर्व काही आलंच! आंधळे भिकारी डोळस झाले, पांगळे भिकारी मॅरॅथॉन पळायला लागले. सिग्नल नुसते लागून जात होते वहानं तिथल्या तिथेच होती. असल्या गर्दीपुढे मारुतीला घाम आल्याच्या वेळची गर्दी काहीच नव्हती. या गोंधळात मिडीयाचे लोक 'आपको कैसा लग रहा है?' अशी विचारपूस करत होते. याच मिडीयातल्या एखाद्याचं कधी चुकून तंगडं बिंगडं मोडलं तर हाच प्रश्न निर्विकारपणे विचारून बघितला पाहीजे!

------***-----------***---------
'आँ! वाघ म्हणजे काय मांजर आहे का घेऊन पळायला? ते १५० किलोचं धूड असतं महाराजा!'.. फोनवर बातमी ऐकून जाधव मॅडमांचा स्वतःच्या कानावर विश्वास बसेना.. नंतर टीव्हीवर पाहून डोळ्यावरही!

'मॅडम, वाघाचं कातडं अंगावर घेऊन पळणारा माणूस अतिरेकी तर नसेल ना?'.. एका इन्स्पेक्टराने अतिरेक केला.

'हम्म्म! असं पण असू शकेल नाही का?'.. मॅडमनी मिनीट भर विचार करून लगोलग हुकूम सोडले.. 'लॉ कॉलेज रस्ता, विद्यापीठ रस्ता, सेनापती बापट रस्ता आणि टेकड्यांच्या बाजूच्या सर्व रस्त्यांची नाकेबंदी करा. ताबडतोब. कुणाला जाऊ देऊ नका. कुठल्याही वाघाला बाँब वगैरे लावलेले आहेत का ते बघा.'

'मॅडम! आज बरेचसे पोलीस शूटिंगच्या कामाला लावलेत.'

'तिथे आता कसला बंदोबस्त करणार ते? एक माणूस शिल्लक नाही तिथे! ते पोलिस पण कामाला लावा. शिवाय होमगार्ड, राखीव पोलीस दल अशा सगळ्यांची मदत घ्या.'

मागून पळत येणारी राणी आता लॉ कॉलेज रस्त्यावर आली.. इतका गोंगाट ऐकून ती बावचळली.. माणसांची सवय असली तरी इतक्या गोंगाटाची नव्हती. मग ती पण बुजली व वाघ पाठीमागे लागल्यासारखी सैरावैरा धावायला लागली (कधी मराठी भाषा तोकडी पडते ती अशी!).. तिला बघताच सायकलवाले, स्कूटरवाले आपली वहानं तिथेच टाकून पळत सुटले.. चारचाकीवाले काचा वरती करून मान खाली घालून टेन्शन मधे फोन फिरवू लागले. पण फोन करण्याचं प्रमाण प्रचंड वाढल्यामुळे पूर्ण नेटवर्क फापललं.

'आता हा तिसरा वाघ कुठून आला?'.. वायरलेसवर बातमी ऐकल्यावर मॅडमना आपण नक्की पुण्यात आहोत की अ‍ॅमेझॉनच्या जंगलात असा प्रश्न पडला.

'मॅडम! कात्रज उद्यानातून एखादा वाघ सुटला आहे का त्याची चौकशी करतो.'

'अहो! कात्रज मधले मरतुकडे वाघ लॉ कॉलेज पर्यंत चालत जाणं शक्य आहे का? त्यापेक्षा असं करा वाघाला दिसताक्षणी गोळ्या घालायचे आदेश द्या. तो नरभक्षक वाघ आहे हे लक्षात घ्या! त्यानं आणखी माणसं मारली तर काय तोंड दाखवणार आपण? आणि आसपासच्या झोपडपट्ट्यातली माणसं हलवा. आणि अतिरेक्यांबद्दल पण सतर्क रहा.'

मिडीयाचं तोंड धरलं तरी आधुनिक मिडीयाचा कीबोर्ड धरता येत नाही हे मागासलेल्या पोलिसांच्या लक्षात आलं नाही! मोकाट वाघ नरभक्षक असल्याची बातमी फोन, एसेमेस, फेसबुक, ट्विटर इ. किलर माध्यमातून प्रकाशलहरींच्या वेगाने पसरली. त्यांना गोळ्या घालू नयेत म्हणून फेसबुकावर तर 'सेव्ह पुने टायगर्स' असली पानं पण निघाली. दुपार पर्यंत त्या बातमीचा अनेक वाघ मोकाट सुटलेले असून आत्तापर्यंत अनेक माणसांचा बळी गेलेले आहेत असा ब्रह्मराक्षस झाला.

------***-----------***---------
टेकड्यांकडे जाणार्‍या येणार्‍या रस्त्यांवर माणसांचा महापूर आहे म्हंटल्यावर सर्व बागांपाशी तळ ठोकलेल्या तमाम वडापाववाल्यांनी, चहावाल्यांनी, भेळ/पाणीपुरीवाल्यांनी आपला मोर्चा तिकडे वळवला. त्या रस्त्यांवर रहाणार्‍या लोकांनी आपल्या गच्च्या १० मिनिटाला १०० रु. भाड्याने देऊन वाहत्या गंगेत हात धुवून घेतला. कोण म्हणतो मराठी माणसाला बिझनेस कळत नाही म्हणून?

मास्तरांना वाघाची बातमी शाळेत समजल्या समजल्या संकेतची काळजी लागली.. त्यांनी पटकन त्याचा मोबाईल नंबर फिरवला.. नेटवर्क जॅममुळे तो लागला नाही.. लागला असता तरी त्यानं उचलला नसता. कारण तो पळत असताना कुठेतरी पडला होता. पोलिसांचाही नंबर लागत नाही म्हंटल्यावर मास्तरांना स्वतःच पावलं उचलण्याशिवाय पर्याय नव्हता.

------***-----------***---------
सर्कशीतला वाघ घेऊन एक रिंगमास्टर आणि ड्रायव्हर शूटिंगसाठी निघालेले असताना नुकत्याच बंद झालेल्या रस्त्यांमुळे चतु:शृंगी जवळ अडकले. अचानक बंद झालेले रस्ते व गस्त घालणारे पोलिस बघून त्यांना एखाद्या छटाक आमदार खासदाराची सदिच्छा भेट असेल असं वाटलं. घुसाघुशीचा प्रयत्न चालू असताना पोलिसांनी ती गाडी हेरली. आज अतिरेकी 'लायसन' मिळालेलं.. त्यात आपापली फॅमिली सोडून एका खिडुक मंत्र्याच्या फॅमिलीची तैनात केलेली.. यामुळे पोलीसांच्या वर्दीच्या गुर्मीला उकळी फुटली.

'गाडीत काय आहे?'.. गाडीवर दंडुका आपटत एक हवालदार गुरकला.

'राजा हे सायेब! म्हंजे वाघ हे सायेब! राजा नाव हे त्येचं!'.. वाघाचा उल्लेख ऐकून पोलीसांनी एकमेकांकडे बघून डोळे मारले.

'तुझ्या बापाने कधी वाघ नेला होता का रे गाडीतून भोxxxx?'.. परत जोरात दंडुका!

'नाही सायेब, म्हंजे हो सायेब! बरेचदा नेलाय! सर्कशीत कामाला हे सायेब! खरंच वाघ हे! त्ये दांडकं मारू नका सायेब तो खवळंल!'

'उघड गाडी तुझ्या माxxx'

'आय शप्पत सांगतो सायेब, खरं वाघ हे'

'आता उघडतो का आत टाकू रे xxx'.. नाईलाजाने गाडीच्या दाराचं कुलूप काढून ड्रायव्हर बाजूला झाला.. पोलीसांनी अति उत्साहानं दार उघडल्यावर व्हायचं तेच झालं. अंगावर उडी पडल्यामुळे एक हवालदाराची गुर्मी जागीच गारद झाली.. बाकीचे हवालदार हवालदील झाले.

चौथ्या वाघाची बातमी आल्यावर मॅडमना अतिरेकी परवडले पण वाघ नको असं झालं..'आरे इतक्या वर्षात एक पण वाघ सुटला नाही. आता एकाच दिवशी एकदम चार चार? वाघांची साथबिथ आलीये काय?'

'आता घरी कोचावर चहा पीत बसलेला एखादा वाघ दिसला नाही म्हणजे मिळवली'.. मॅडम स्वतःशीच पुटपुटल्या.

मॅडम पुढे दरम्यान दोन समस्या उभ्या राहील्या. झोपड्यातल्या लोकांना हलवायची मोहीम सुरू करताच अनेक राजकीय पक्षांना अचानक झोपडपट्टीवासियांबद्दल सहानुभूती निर्माण झाली. त्यांनी वाघांचा सुळसुळाट नसलेल्या भागातल्या रस्त्यांवर बसकण मारून धरणं धरलं.. नक्राश्रू ढाळले.. वाघ आल्याची अफवा पसरवून गरिबांना बेघरं करायचा व त्यांना रस्त्यावर आणायचा काळा कावा आहे अशी बोंबाबोंब केली.

पोलिसांचा वाघांना गोळ्या घालायचा प्लॅन प्राणी मित्रांच्या संघटनांना समजल्यावर त्यांनी ही आवाज उठवला. जंगलांची बेसुमार तोड झाल्यावर गरीब वाघांना शहराकडे फिरकण्याशिवाय काय पर्याय रहाणार असा खडा सवाल त्यांनी केला. तसंच हे वाघ मारले तर वाघ हा प्राणी भारतातून नामशेष होईल असा निर्वाणीचा इशारा दिला. मग नाईलाजाने मॅडमनी गुंगीचं औषध लावलेले बाण मारायचा हुकूम सोडला.

------***-----------***---------
मास्तरांचे शूटिंगच्या जागी जायचे सर्व प्रयत्न रस्ते बंद असल्यामुळे असफल झाले. गस्तीवरचे पोलिस त्यांना 'तुम्ही कसली काळजी करू नका! आम्ही सगळ्यांना वाचवायचे आटोकाट प्रयत्न करू' या फुसक्या आश्वासना पलिकडे काही दाद लागू देत नव्हते. त्यांना कुणाचीही मदत मिळेना. शेवटी ते नजर चुकवून पाषाण रस्त्याच्या बाजूने टेकडी चढायला लागले.. सवय नसल्यामुळे जबरी धाप लागली.. झाडाची एक पडलेली छोटी फांदी उचलून तिच्या आधाराने ते कसे बसे टेकडी चढले.. मग हाशहुश करत टकलावरचा घाम पुसत ते लॉ कॉलेज टेकडीकडे निघाले. बराच वेळ चालल्यावर त्यांना संकेत पळताना दिसला. 'संकेत! संकेत!' त्यांनी जिवाच्या आकांताने हाका मारल्या.

'बाबा! पळा! वाघ!'.. पळता पळता संकेत कसाबसा ओरडला. पण मागून उड्या मारत येणार्‍या फुलांच्या गुच्छाला तो वाघ का म्हणतोय ते मास्तरांना कळेना. गुच्छ आणखी जवळ आल्यावर ती जेमतेम कपड्यातली एक आदिवासी मुलगी आहे असा साक्षात्कार झाला.

'अरे वाघ नाहीये, कुणी आदिवासी दिसतेय बिचारी!'.. मास्तर ओरडले. राजकपूरच्या सिनेमातून मिळालेलं आदिवासींचं ज्ञान असं बाहेर आलं. शिवाय त्यांचं लक्ष उंच टाचांचे बूट कोरलेल्या भुवया इ. कडे गेलं नाही. 'वाचवा! वाचवा!'.. मुलीने त्यांना येऊन मिठी मारल्यावर लक्ष जाणं शक्य पण नव्हतं.

'घाबरू नकोस मुली! घाबरू नकोस! मी तुझ्या पाठीशी आहे! नाव काय तुझं?'

'ल ति का'.. बेफाट दम लागलेल्यामुळे कसंबसं उत्तर बाहेर आलं.

'अरे वा! आदिवासी असलीस तरी नाव आधुनिक आहे एकदम!'.. बोलता बोलता त्यांना मागून पळत येणारा सर्कशीतला वाघ दिसला. राजाला बघून मास्तर किंचाळले, त्यांचा स्वतःवरचा ताबा पूर्ण सुटला.. ते भ्रमिष्टासारखे अचानक म्हणाले.. 'पळतोस कुठे? इकडे ये आणि अंगठे धरून उभा रहा' आणि हातातली काठी जवळच्या एका जागेवर आपटली. राजा त्या ठिकाणी मुकाटपणे जाऊन बसला. कधी नव्हे ते कुणी तरी पटकन ऐकल्यामुळे मास्तरांचा आत्मविश्वास थोडा वाढला.

'अरे राजा! बोल! आज तू गणवेष का नाही घातलास? उघडं नागडं फिरायला लाज नाही वाटली?' .. नावाने हाक मारल्यामुळे राजा वाघ त्यांच्याकडे आपुलकीनं पाहून गुरगुरला. त्यांना इतकंच जाणवलं की काही तरी सतत त्याच्याशी बोलत रहायला पाहीजे.. मग त्यांनी फर्मावलं.. 'हां! माझ्या बरोबरीने प्रतिज्ञा म्हण आता...
भारत माझा देश आहे।
सारे भारतीय माझे बांधव आहेत।
माझ्या देशावर माझे प्रेम आहे।
माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे।
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन।
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधार्‍या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन।
माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे।
त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी ह्यांतच माझे सौख्य सामावले आहे।'

मास्तर छडी वाघासमोर नाचवत होते आणि थंडपणे गुरगुरत राजा पंजाने बाजूला करत होता. 'गाढवा, मी तुला सांगतेय भिंतीला नाही'.

मास्तरांनी वाघाला पण गाढव ठरविण्याचा अद्भुत प्रकार लतिका डोळे विस्फारून पहात होती. तिच्या मनात अनेक विचार सुरू होते.. 'माझ्या कुठल्याही हिरोने असलं भारी शौर्य दाखवलं असतं काय? शक्यच नाही! काय धाडस आहे या माणसाचं? प्रत्यक्ष वाघाला शाळेतल्या पोरासारखं वागवतोय! इथे माझ्यावर जीव ओवाळून टाकायला लाखो तरूण तयार आहेत आणि हा मला ओळखत पण नाही?'

तत्क्षणी ती वाघाचा पार ससा करणार्‍या मास्तरांच्या प्रेमात पडली. तिने आपली मिठी अजूनच घट्ट केली.

तिकडे संकेतचेही डोळे विस्फारलेले होते.. कारण गंजलेल्या पत्र्याने काखोटीला मारलेला हिर्‍याचा दागिना! आणि तो फक्त एका काठीने वाघाला नमवत होता! संकेतला बापाच्या कर्तृत्वाची जाणीव होऊन प्रथमच आदर वगैरे वाटायला लागला. मधेच मास्तर संकेत कडे बघून ओरडले.. 'अरे! मी इथे वाघाचे खेळ करणारा वाटलो का तुला? शुंभासारखा बघत उभा राहू नकोस. पळ आधी आणि मदत घेऊन ये लवकर!'

त्याच वेळी राणी तिथे पळत पळत आली. मास्तरांनी तिच्याशी पण बोलायला सुरुवात केली.. 'तू कुठे उंडारत होतास? चल बस इकडे!'.. राणीला बर्‍याचे वेळाने आपल्याशी कुणी तरी बोलल्याचा आनंद झाला. ती पटकन मास्तरांच्या जवळ आली आणि मागच्या पायावर उभी राहून मास्तरांना चाटायला लागली. ती जवळ आल्यावर मास्तरांची हवा टाईट झाली होती खरी पण ते पाय जमिनीला शिवल्यासारखे जागच्या जागीच उभे राहीले.

------***-----------***---------
कॅमेरामनला आपण अंगावर उगीचच ओझं घेऊन पळतोय अशी जाणीव झाली. मग त्यानं ते धूड लॉ कॉलेज रस्त्यावरच्या गल्लीतल्या एका चारचाकीवर ठेवलं आणि पळून गेला. लोकांना गाडीवर वाघ दिसल्याची खबर आल्यावर पोलिस तिथे आले. त्यांनी सावकाशपणे वाघाला जाग येऊ न देता बाण मारून त्याला बेशुद्ध केलं. मग थोड्या वेळानंतर काही हालचाल दिसत नाही म्हणून हळूच, घाबरत घाबरत त्याच्या जवळ जाऊन त्याला हलवलं. तो खेळण्यातला वाघ आहे हे पाहून त्यांचे चेहरे पडले. पण मग सतर्कता दाखवायला उगीचच त्यांनी वाघ ठेवलेल्या चारचाकीची झडती घेतली.. आणि काय आश्चर्य? त्यात काही बाँब सापडले.

------***-----------***---------
संकेतने बोलावून आणल्यानंतर पोलीसांनी शिताफीने राजा व राणीला बेशुद्ध करून त्यांची सुटका केली. पोलिसांच्या पाठोपाठ आलेल्या मिडियाने मास्तरांचे, मिठी मारलेल्या लतिकेसकट, हजारो फोटो काढले. मास्तर मुलाखतीत म्हणाले.. 'प्राणी मुलांसारखेच निरागस असले तरी दोघांनाही वठणीवर आणायला छडीच लागते.'

'थॅक्यू हं! आज तुम्ही नसता तर मला वाघानं फाडून खाल्लं असतं! तुम्ही फारच असामान्य आहात! तुमचे आभार कसे मानावेत ते समजत नाहीये मला!'.. सगळं स्थिरस्थावर झाल्यावर लतिका उद्गारली.

'अहो, मी एक साधासुधा सामान्य माणूस आहे'

'छे हो! असामान्य माणूस सामान्यच असतो पण असामान्य प्रसंगात असामान्य धैर्य दाखवतो!'.. लतिकेला कुठल्या तरी पिक्चरचा डायलॉग आठवला.

'अहो कुणीही हेच केलं असतं! पण मला माफ करा हं! मी तुम्हाला आदिवासी मुलगी समजलो.'.. मास्तर ओशाळवाणं हसत म्हणाले.

'कुणीही हे केलं नसतं हो! आमच्या यूनिटचेच लोक बघा ना! सगळे पाय लावून पळून गेले. तुम्ही खरंच खूप शूर धाडशी आहात. मी तुमची फॅन झालेय, आता तुम्हीच माझे हीरो'

'आँ! हीs, हीs, हीs रो?'.. जे दोन वाघांना जमलं नाही ते लतिकेच्या एका डायलॉगात झालं.. मास्तरांना भीतीने कंप सुटला.

नंतरच्या काही दिवसात बर्‍याच घटना घडल्या.....

अतिरेक्यांचा डाव उधळून लावल्याबद्दल पोलीस उपनिरीक्षक रंजना जाधव यांची सगळ्यांनी मुक्त कंठाने प्रशंसा केली. त्यांना महानिरीक्षक म्हणून बढती मिळाली.

आपल्या वाघाला नमवल्यामुळे भारावलेल्या सर्कशीच्या मालकाने मास्तरांना रिंगमास्तरच्या जॉबची ऑफर दिली. लतिकेने फक्त मास्तरांशीच लग्न करण्याचं जाहीर केलं आणि पिंजर्‍याचा रिमेक झाला.

'संकेत! इकडे ये! हे काय हीन अभिरुचीचे फोटो लावलेत?'.. संकेतच्या खोलीच्या भिंतीवर मास्तरांची नेहमी प्रमाणे नजर गेली.

'हीन अभिरुची काय बाबा? ते सही फोटो आहेत बरं का! नीट बघा जरा!'.. आपल्याच मिठीतल्या लतिकेचे फोटो पाहून त्यांना आता पोरापुढे काय डोंबल आदर्श ठेवणार असं झालं!

'बाबा! जाळून टाकू?'.. संकेतच्या मिष्किलपणामुळे मास्तरांना त्याच्या कानाखाली एक आवाज काढावासा वाटला.. 'बाबा! पण तिला या घरात प्रवेश नाही असं तुम्ही ठणकावलं होत ना?'

'अरे! तिला कुठे या घरात आणणार आहे मी? मीच तिच्या घरात जाणार आहे.'

मास्तरांना तिनं येडं केलं.. आणि मास्तरांच्या दुसर्‍या लग्नाची पहिली गोष्ट सुरू झाली.. लवकरच ती येडेकर-शहाणे झाली.. मास्तर आपल्या 'शहाणे करुनि सोडावे सकळ जन' या व्यवसाय धर्माला जागले.

=== समाप्त ===

Thursday, April 19, 2012

एक खगोलशास्त्रीय दुर्मिळ घटना!

(टीप - या लेखाचा सहलेखक मायबोली वरील खगोलशास्त्रज्ञ आशिष (आश्चिग) आहे. त्यामुळे काही प्रश्न असल्यास त्याला विचारा.)

वेगवेगळ्या व्यवसायात वेगवेगळे धोके असतात. खगोलशास्त्राचा धोका उल्कापाताने मरण्याचा नसतो (उल्कापाताने कोणीही मेले असल्याची नोंद नाही), अघटीत गोष्टींच्या (म्हणजेच अ-घडु शकणाऱ्या गोष्टींच्या) इ-मेल उत्पाताचा असतो. 'पळा-पळा, सारे ग्रह रांगेत उभे आहेत', 'पहा-पहा, एका महीन्यात पाच-पाच शूक्रवार, शनिवार, सूर्यवार' वगैरे. त्यामुळे खऱ्याखुऱ्या (आणि) दुर्मीळ गोष्टींकडे मात्र सपशेल दुर्लक्ष होते. अशीच एक अति-दुर्मीळ आणि खगोलशास्त्राकरता ऐतिहासीक महत्व असलेली घटना येत्या ५-६ जूनला होऊ घातली आहे. तुमच्या-आमच्याच नाही, तर सध्या हयात असलेल्या सर्वांकरताच पृथ्वीवरून शुक्राची ही सुर्याबरोबर होणारी युती पहायचा शेवटचा योग आहे.

चंद्रांचे पृथ्वीभोवती फिरण्याचे आणि पृथ्वीचे सूर्याभोवती फिरण्याचे प्रतल एक नसल्याने दर महिन्याला युती होत नाही. त्याचप्रमाणे शुक्राची कक्षा पृथ्वीच्या कक्षेच्या पातळीशी करत असलेल्या ३.४ अंशांच्या कोनामुळे शुक्र, पृथ्वी आणि सूर्य जरी जवळ जवळ एका रांगेत दर ६०० दिवसांनी येत असले (तळटीप [१] पहा) तरी प्रत्यक्ष युती मात्र २४३ वर्षात ४ वेळाच होते, ते ही आठ वर्षांच्या फरकाने दोनदा! २००४, २०१२, आणि नंतर एकदम २११७ (आणि नंतर २१२५, २२४७ वगैरे). ही युती कुठून आणि केव्हा बघता येईल त्याच्या नकाशाची लिंक आता चालत नाही. लेख वाचा अथवा वाचू नका, पण पहायला मात्र विसरु नका. खंडग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी घ्याल तीच काळजी ही युती बघताना पण घ्या.

जरी ती इतकी दुर्मिळ घटना आहे तरी तिचा 'सूर्यापासून पृथ्वीचं अंतर कसं मोजलं?' या डोक्याला खिट्टी लावणार्‍या प्रश्नाचं उत्तर शोधण्याच्या प्रयत्नांशी निकट संबंध आहे. प्रकाशाला सूर्यापासून पृथ्वी पर्यंत यायला सुमारे ९ मिनिटं लागतात हे वाक्य आणि तत्सम अनेक वाक्यं शाळेत आपल्याकडून खूप वेळा घोटवून घेतलेली आहेत. पण एका आकड्या पलीकडे याची उपयुक्तता काय? ते कसं मोजलं? त्यामुळे अजून काय साध्य झालं? असे प्रश्न आपल्याला कधी पडले नाहीत किंवा पडले तरी त्यांना बगल दिली गेली. याचा इतिहास बघताना तेव्हाचं सर्वच विषयातलं तोकडं ज्ञान, ते ज्ञान वाढवण्याचा ध्यास घेतलेले शास्त्रज्ञ, त्यांचं चातुर्य व कल्पकता, त्यांचे कष्ट व धडपड, आलेल्या अनंत अडचणी, त्यातून मार्ग काढण्यासाठी दाखवलेली जिद्द तसंच त्या वेळची अपुरी, तुटपुंजी व बाल्यावस्थेतील साधन सामुग्री या असंख्य गोष्टी समोर येतात! या युतींचा मानवाचं खगोलशास्त्राचं ज्ञान वाढायला व एकंदरीत तंत्रज्ञानाच्या उन्नतीला खूपच फायदा झाला आहे

हे अंतर कशाला मोजायचं होतं? याचं कारण एकदा ते अंतर समजलं की केप्लरच्या<१> कृपेमुळं सूर्य आणि इतर सर्व ग्रहांमधली अंतरं एका झटक्यात मिळणार होती! त्याने, १६ व्या शतकात, त्याला उपलब्ध असलेल्या माहितीवरून एक फार महत्वाचा निष्कर्ष काढलेला होता (तळटीप [२] पहा). त्याला तो निष्कर्ष गणिताने सिद्ध करता आला नव्हता, तो नंतर न्यूटनने केला. तो म्हणजे ग्रहांचं सूर्यापासूनचं अंतर व त्यांना सूर्याभोवती फिरायला लागणारा वेळ (त्या ग्रहांचे 'वर्ष') यांचा एक साधा संबंध! तो वापरून सर्व ग्रहांचं अंतर AU (अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल यूनिट) या एककात (युनिट) मांडता येतं. इथे १ AU म्हणजे पृथ्वी व सूर्य यामधील सरासरी अंतर. केप्लरच्या समीकरणाने ग्रहांची अंतरं अशी येतात - शुक्राचं सरासरी अंतर ०.७२३३ AU, बुध ०.३८७ AU, मंगळ १.५२ AU, गुरू ५.२० AU आणि शनी ९.५५ AU. थोडक्यात, एकदा का १ AU म्हणजे नक्की किती ते समजलं की सर्वच ग्रहांची अंतरं मिळणार होती. इतकंच नाही तर प्रत्येक ग्रहाचा व्यास पण समजणार होता. ग्रहांचा दुर्बिणीतला व्यास किती आहे हे माहिती होतं, त्यामुळे ग्रहांचं खरं अंतर समजल्यावर त्यांचा खराखुरा व्यास किती आहे त्याचा अंदाज येणार होता.

ग्रह तार्‍यांची अंतरं थोडी भूमिती वापरून काढता येतात. आकृती - १ मधे दिलेल्या काटकोन त्रिकोणाच्या पायाची लांबी (AC=b) व एक कोन (B=ABC) माहिती असेल तर उंची (BC=a), tan(B) = b / a या सूत्राने काढता येते.
आकृती - १ : काटकोन त्रिकोण

ग्रह तार्‍यांची अंतरं काढण्याच्या वेळेला कोन B मोजण्यासाठी पॅरॅलॅक्स पद्धत वापरतात. पॅरॅलॅक्स म्हणजे दोन वेगळ्या ठिकाणांवरून एकाच वस्तूकडे पाहिल्यावर त्या वस्तूच्या जागेमधे दिसणारा बदल. उदा. एक पेन्सील हातात लांब धरून भिंतीवरच्या एखाद्या चित्राकडे पहा. नंतर एकदा डावा डोळा बंद करून व मग उजवा डोळा बंद करून पाहीलं तर ती पेन्सील चित्राच्या पार्श्वभूमिवर उजवी डावीकडे हललेली दिसेल. भूमितीच्या भाषेत बोलायचं झालं तर पॅरॅलॅक्स म्हणजे दोन वेगळ्या ठिकाणांवरून एकाच वस्तूकडे काढलेल्या दोन सरळ रेषां मधला कोन!

पॅरॅलॅक्स
---------

तारे प्रचंड अंतरांवर असल्यामुळे पॅरॅलॅक्स मिळविण्यासाठी प्रचंड लांबीचा पाया लागतो, अगदी पृथ्वीवरच्या दोन्ही धृवांपासून मोजमाप केलं तरी भागत नाही. त्यासाठी पृथ्वीच्या कक्षेचा वापर चतुरपणे करतात. तार्‍याची एका दिवशीची स्थिती आणि बरोबर ६ महिन्यानंतरची स्थिती घेतली तरच थोडासा पॅरॅलॅक्स दिसू शकतो. कारण पृथ्वी ६ महिन्यांनी बरोबर दोन विरुद्ध ठिकाणी असते व १ AU इतक्या प्रचंड लांबीचा पाया मिळतो. आकृती - २ व पॅरॅलॅक्स दाखवणारे अ‍ॅनिमेशनने पहा.



अर्थात फार लांबवरच्या तार्‍यांसाठी हाही पुरेसा पडत नाही. जरी सर्व तारे गतिमान आहेत तरी त्यांच्या अति प्रचंड अंतरांमुळे आपल्याला ते वर्षानुवर्ष एकाच जागी दिसतात ते याच कारणामुळे (तळटीप [३] पहा)!
आकृती - २ : तार्‍याचा पॅरॅलॅक्स.

शुक्राने होणार्‍या सूर्य युतीचा सूर्य व पृथ्वी यातील अंतराशी कसा काय संबंध हा प्रश्न येणं साहजिकच आहे. त्याचं उत्तर फार पूर्वी इंग्रज खगोल शास्त्रज्ञ एडमंड हॅली<२> याने दिलं. या युतीचा वापर करून शुक्राचा सूर्याच्या पार्श्वभूमीवरील पॅरॅलॅक्स मोजणं शक्य आहे आणि अर्थातच त्यामुळे शुक्राचं पृथ्वीपासूनचं अंतर व पर्यायाने सूर्याचं पृथ्वीपासूनचं अंतर मिळवता येईल असं त्याचं म्हणणं होतं. शुक्र जेव्हा पृथ्वी आणि सूर्याच्या मधे येतो तेव्हा तो आपल्या सर्वात जवळ असतो. त्यामुळे त्याचा पॅरॅलॅक्स मोजण्यातील चूक कमित कमी होईल हा त्याचा होरा होता. आकृती ३ व ४ मधे या युतीचा पॅरॅलॅक्स पृथ्वी वरील दोन भिन्न ठिकाणावरून कसा दिसेल ते दाखवले आहे.
आकृती - ३ : पृथ्वीच्या दोन भिन्न ठिकाणांवरून शुक्राकडे मागे सूर्य असताना पाहिल्यास आकृती - ४ प्रमाणे शुक्र दोन भिन्न मार्गांनी सूर्याच्या चकतीवरून जाताना दिसेल.
आकृती - ४ : शुक्र दोन भिन्न मार्गांनी सूर्याच्या चकतीवरून जाताना.

ही युती वेगवेगळ्या अक्षांशावरून पाहिल्यास शुक्राचा सूर्याच्या समोरून जायचा वेळ वेगवेगळा भरेल हे आकृती - ४ वरून स्पष्ट होतं. हॅलीच्या गणिताप्रमाणे, वेगवेगळ्या अक्षांशावरून मोजलेला युतीचा वेळ तसंच पृथ्वीचं स्वतःभोवतीचं भ्रमण इ. गोष्टी विचारात घेऊन, सूर्याचं अंतर काढणं शक्य होतं. पण सर्व स्थळांवरून एकाच वेळी मोजणं गरजेचं होतं. सूर्याच्या पुढे शुक्र नक्की कुठे कुठे असताना वेळा मोजायच्या त्या बाबतीत गोंधळ होऊ नये म्हणून आकृती - ५ मधे दाखवलेले ४ स्पर्श झाल्यावर मापन करायचं ठरवलं. ते असं - १> शुक्राची कड सूर्याला बाहेरून चिकटायची वेळ २> शुक्राची कड सूर्याच्या आतल्या बाजूकडून निसटायची वेळ ३> शुक्राची कड सूर्याच्या दुसर्‍या बाजूच्या आतल्या बाजूला चिकटायची वेळ ४> शुक्राची कड सूर्याच्या चकती पासून बाहेर पडायची वेळ. त्यातही सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळे शुक्र जवळ येतानाचा, पहीला, किंवा बाहेर पडतानाचा, शेवटचा, नेमका क्षण मोजणं अवघड होतं! म्हणून भ्रमणाची वेळ ही तिसर्‍या व दुसर्‍या वेळांमधला फरक धरणार होते.

आकृती - ५ : शुक्राचे सूर्याशी होणारे ४ स्पर्शबिंदू!

हॅलीच्या नशिबात एकही युती नाही हे त्याला माहीत होतं. आधीची युती १६३१ व १६३९ साली होऊन गेली होती आणि पुढची ६ जून १७६१ व ३ जून १७६९ रोजी होणार होती. म्हणूनच त्यानं सर्व खगोल शास्त्रज्ञांना भविष्यातल्या युतींच्या वेळेला एकत्रित प्रयत्न करून पॅरॅलॅक्स मोजण्याचं आवाहन केलं होतं. १७४२ साली त्याचा देहांत झाला.

सूर्याच्या अंतरातली चूक कमी करण्यासाठी आणखी दोन गोष्टीतल्या चुका कमी करणं आवश्यक होतं. एक म्हणजे पायाची म्हणजे पृथ्वी वरील दोन भिन्न ठिकाणातली लांबी मोजणं आणि दुसरं म्हणजे पृथ्वीच्या भिन्न ठिकाणांवरील घड्याळं जुळवणं!

पायाची लांबी मोजण्यासाठी लागणारे अचूक नकाशे नशीबाने त्या काळापर्यंत तयार व्हायला लागले होते. एक काळ असा होता की स्थळाचा अक्षांश धृव तार्‍याचा क्षितिजाशी झालेला कोन मोजून अचूकपणे काढता यायचा. पण सगळा बल्ल्या रेखांश मोजताना व्हायचा! पृथ्वी स्वतः भोवती (म्हणजे ३६० डिग्री) २४ तासात फिरते, याचाच अर्थ ती दर तासाला १५ डिग्रींनी फिरते. त्यामुळे जर वेळ अचूक माहिती असेल तर आकाशातले तारे बघून रेखांश काढता येतात. त्यावेळी वापरात असलेली लंबकाची घड्याळं जहाजांवर बसणार्‍या हेलकाव्यांमुळे कुचकामी ठरायची. दिवसाकाठी पाच दहा मिनिटांनी घड्याळ हमखास चुकायचं, त्यामुळे दहा बारा दिवस समुद्रात काढले तर वेळेप्रमाणे येणारा रेखांश आणि प्रत्यक्षातला रेखांश यात चार पाचशे मैलांचा फरक सहज पडायचा. त्याचा परिणाम जहाजं भरकटणे किंवा खडकांवर आपटून जहाजं फुटून माल व मनुष्य हानी होणे यात व्हायचा. लांबवरच्या व्यापारासाठी प्रामुख्याने जहाजांचा वापर व्हायचा म्हणून अशी हानी कुठल्याही सरकारला परवडणारी नव्हती. त्यामुळेच अचूक रेखांश मोजू शकणार्‍या यंत्रासाठी मोठमोठी बक्षिसं जाहीर केली गेली. सगळ्यात मोठं वीस हजार पौंडाचं बक्षीस ब्रिटिश बोर्ड ऑफ लाँजिट्यूड या संस्थेनं जाहीर केलं.

जॉन हॅरिसन नावाच्या एका अशिक्षित सुताराने तसं घड्याळ बनवण्याचा ध्यास घेतला. आयुष्यातली जवळपास तीसेक वर्ष खर्ची घालून त्यानं विविध व वेगवेगळ्या अचूकतेची घड्याळं बनवली. त्याचं एक घड्याळ, १७६१ साली, एच. एम. एस. डेप्टफर्ड या जहाजावरून पोर्ट रॉयल जमैका येथे पोचेपर्यंत त्याच्यावरची वेळ फक्त ५.१ सेकंदांनी चुकली होती. पण त्यापुढे बरीच वर्षं लढूनही बिचार्‍याला बोर्डाकडून बक्षीसाचे पूर्ण पैसे काही मिळाले नाहीत!

गॅलिलिओने गुरूच्या चंद्रांनी होणार्‍या गुरुच्या युतींचा अभ्यास करून घड्याळांच्या वेळा जुळवण्याची एक पद्धत बनविली होती. प्रतिभेच्या या अप्रतिम आविष्काराबद्दल डच लोकांनी त्याला सोन्याची चेन बक्षीस म्हणून दिली. ही पद्धतही जहाजांवरून वापरण्यासारखी नव्हती कारण जहाजांच्या हेलकाव्यांमुळे कुठल्याही दुर्बिणीत ते चंद्र अवलोकन पूर्ण होईपर्यंत रहाणं शक्य नव्हतं. हीच पद्धत वापरून फ्रान्सचा अचूक नकाशा बनवला व पृथ्वीचा परीघ पण काढला. तो फक्त १२६ मैलांनी चुकला. फ्रान्सच्या नवीन नकाशावरून नंतर असं लक्षात आलं की फ्रान्स वाटलं होतं त्यापेक्षा आकाराने लहान आहे. त्यावर फ्रान्सच्या राजाने अशी टीका केली:- फ्रान्सच्या सर्व शत्रूंनी आजपर्यंत जितका प्रदेश बळकावला नसेल त्यापेक्षा जास्त या नकाशा बनविणार्‍यांनी घालवला.

१६३१ सालची युती कुणीही पाहिल्याची नोंद नाही. १६३९ सालची युती दोघांनी बघितली होती पण तेव्हा फारशी उपयुक्त मोजमापं काही होऊ शकली नव्हती. शुक्राची चकती सूर्यापुढे 'आपल्या अपेक्षेपेक्षा फारच छोटी दिसली' या व्यतिरिक्त त्यात दुसरं लक्षवेधी काही नव्हतं.

पण ६ जून १७६१ च्या युतीच्या वेळी बर्‍याच सरकारांनी तो प्रतिष्ठेचा प्रश्न केला होता. बरेच पैसे या शास्त्रीय मोहिमेसाठी ओतले होते. सायबेरिया, दक्षिण आफ्रिका मेक्सिको अशा दूरदूरच्या एकूण ६२ ठिकाणी १२० शास्त्रज्ञ महागड्या उपकरणांसकट पाठवले होते. युतीच्या वेळी काही ठिकाणी निरभ्र आकाश मिळालं तर काही ठिकाणी ढगाळ! चार्लस मेसन व जेरेमाय डिक्सन यांना आफ्रिकेला पाठवलं होतं. वाटेत त्यांच्यावर फ्रान्सच्या बोटीने हल्ला केला (तेव्हा एक युद्ध पण चालू होतं). त्यात त्यांची ११ माणसं मेली व ३७ जखमी झाली. नंतर त्यांनी फ्रेंच सैनिकांच्या पहार्‍याखाली मोजमापं केली पण त्या दोघांच्या मोजमापात बर्‍याच सेकंदांचा फरक आला. विल्यम वेल्सनं कॅनडातल्या हडसन बे येथून डासांचा व कडाक्याच्या थंडीचा सामना करत मोजमाप केलं. थंडी इतकी कडक होती की त्यानं बाजूला ठेवलेल्या पाव लिटर ब्रँडीचा पाच मिनिटात बर्फ झाला.

ऑटेरोशे हा गोठलेल्या व्होल्गावरून रशियातल्या टोबोलस्क गावी युतीच्या ६ दिवस आधी पोचला. पण त्याने सूर्याच्या भ्रमणात हस्तक्षेप केल्यामुळे पूर आला म्हणून त्याच्यावर स्थानिक लोकांनी हल्ला केला. शेवटी त्याने रक्षकांच्या पहार्‍याखाली मोजमापं केली.

गिलोमे ले जेंटिल हा सगळ्यात जास्त दुर्दैवी म्हणावा लागेल. तो फ्रान्सहून २६ मार्च १७६० रोजी पाँडेचरीला निघाला. मान्सून मुळे त्याचं जहाज जे भरकटलं ते युतीच्या दिवशी देखील समुद्रातच होतं. त्यामुळे त्याला काहीही मोजमापं करणं शक्य नव्हतं. पण स्वतःची प्रतिष्टा जपण्यासाठी त्यानं तिथेच थांबून १७६९च्या युतीची मोजमापं करुनच परत जायचं ठरवलं. संपूर्ण मे महीनाभर निरभ्र असलेलं आकाश नेमकं युतीच्या दिवशी (जून ४) ढगाळलं ते युती संपल्यावर परत निरभ्र झालं. वैतागून त्यानं फ्रान्सला परत जायचं ठरवलं. पण वाईट पोट बिघडल्यामुळे त्याला पुढचे ९ महीने भारतातच रहावं लागलं. त्या नंतर तो एका स्पॅनिश जहाजावरून परत निघाला. ते जहाज केप ऑफ गुड होप पाशी वादळात सापडून भरकटलं. त्या नंतर तो कसाबसा फ्रान्स मधे सुमारे ११ वर्षांनी पोचल्यावर त्याला धक्काच बसला. तो मेला आहे असं जाहीर झालं होतं. त्याची बरीचशी मालमत्ता लुटलेली होती आणि उरलेली त्याच्या वारसांना वाटून टाकलेली होती.

१७६१ साली सर्वांच्या मापनात चुका झाल्या कारण आकृती ५ मधले दोन व तीन नंबरचे स्पर्श नक्की कधी झाले तेच ठरवणं अवघड झालं! कारण शुक्र सूर्याच्या जवळ असताना पाण्याच्या थेंबासारखा परिणाम दिसला. जेव्हा नळातून पाण्याचा एक थेंब हळूच पडतो तेव्हा तो नळापाशी, पाण्याच्या सर्फेस टेन्शन मुळे, ताणला गेल्यासारखा लांबट दिसतो. तसंच, दोन नंबरच्या बिंदूपाशी शुक्राची चकती सूर्याची कड सोडताना पाण्याच्या थेंबासारखी ताणली गेल्यासारखी दिसली. याच्या नेमकं उलट ३ नंबरच्या बिंदूपाशी झालं. शुक्राची चकती सूर्याला चिकटायच्या आधीच एक काळी रेषा शुक्रापासून निघून सूर्याला चिकटली व जसजसा शुक्र सूर्याच्या जवळ जायला लागला तसतशी ती रेषा ठळक व्हायला लागली. त्यामुळेच प्रत्येकाने मोजलेल्या स्पर्शांच्या वेळेत फरक आला.

अजून एक परिणाम म्हणजे सूर्या जवळ शुक्र एखाद्या प्रकाशमान कंकणात बद्ध दिसतो पण त्याची कड सावलीसारखी अस्पष्ट व फिकट दिसते. हा परिणाम शुक्रावरच्या वातावरणाचा असला पाहीजे असं अनुमान त्या वरून काढलं (जे नंतर बरोबर निघालं). तो पर्यंत कुणाला शुक्रावर वातावरण आहे याची कल्पना नव्हती. कारण वातावरणामुळे प्रकाशाचं वक्रीभवन होतं. सॅम्युएल डन या शास्त्रज्ञाने त्या सावलीला सूर्याची कड पार करायला लागलेल्या वेळावरून शुक्रावर सुमारे ५० मैलाचं वातावरण आहे असा निष्कर्ष काढला.

या सर्वांचा परिणाम सूर्याचं अंतर चुकण्यात झाला. ते साधारण ८१ ते ९८ दशलक्ष मैल या मधे असावं इतकाच तर्क बांधता आला. सध्याच्या मोजणी प्रमाणे खरं अंतर ९२, ९१०, ००० मैल आहे.

मागच्या युतीतून फारसं काही निष्पन्न न झाल्यामुळे ३ जून १७६९ रोजी होणार्‍या युतीसाठी जास्त प्रयत्न करायचं ठरवलं. एकूण ७७ ठिकाणांवर १५१ शास्त्रज्ञ पाठवले. या वेळेला युती बघताना काय समस्या येतात याचं ज्ञान होतं. म्हणून जास्त मोठ्या आणि चांगल्या दुर्बिणी दिल्या. त्यांना प्रतिमा कमी बिघडवणारी भिंगं लावलेली होती.

२६ ऑगस्ट १७६८ रोजी कॅप्टन कुकच्या नेतृत्वाखाली एच. एम. एस. एंडेव्हर प्लिमथ बंदरातून ताहितीकडे जायला निघाली. बोटीवर जोसेफ बँक्स हा शास्त्रज्ञ होता. शिवाय कुकही स्वतः चांगला गणितज्ञ होता. बोटीवर उपकरणांशिवाय एक पिंप भरून खिळे होते ते ताहितींशी व्यवहार करण्यासाठी घेतलेले होते. ताहिती लोकांना विशेषतः बायकांना धातुच्या कुठल्याही वस्तूंचं इतकं प्रचंड आकर्षण असतं की ते त्यांच्या बदल्यात कुठलाही सौदा करायला तयार असतात. कुकने सगळ्यांना परवानगीशिवाय कुणालाही ते खिळे द्यायचे नाहीत असा कडक दम भरला होता तरीही बोटीवरच्या धातुच्या वस्तू गायबच होत राहिल्या. या सर्व भानगडीतून त्यांनी ती युती व्यवस्थित पाहीली पण मोजमाप करताना घोटाळा झालाच. या वेळी चांगल्या दुर्बिणींमुळे थेंबासारखा परिणामही जास्त सुस्पष्ट व मोठा दिसला. म्हणून, कुक सकट सगळ्यांना शुक्र वेगवेगळ्या वेळांना सूर्याला चिकटला व बाहेर पडला असं वाटलं. त्यांच्या वेळांमधे वीस सेकंदांपर्यंत फरक होता. १७६९ च्या मापनातून सूर्याचं अंतर ९३ दशलक्ष मैलापासून ९७ दशलक्ष मैलापर्यंत भरलं. सध्याच्या अभ्यासानुसार तो थेंबासारखा परिणाम पृथ्वीचं वातावरण आणि दुर्बिणीतलं वक्रीभवन यामुळे दिसतो.

९ डिसेंबर १८७४ च्या युतीच्या वेळी सर्व निरीक्षकांना आधीच अपेक्षित मोजमाप पद्धतीचं प्रशिक्षण दिलं गेलं. त्यासाठी युतीचं सिम्युलेशन (नकली नाटकीकरण?) केलं गेलं. कुठल्या प्रकारच्या दुर्बिणी वापरायच्या ते ठरवलं. मुख्य म्हणजे कॅमेर्‍याचा शोध लागलेला असल्याने फोटो पण काढण्यात आले. या वेळेला जरी पाण्याच्या थेंबासदृश परिणामाचा त्रास कमी झाला तरी प्रकाशमान कंकणबद्ध शुक्र व त्याची अस्पष्ट व फिकट कड यामुळे फार काही चांगली मोजमापं झाली नाहीत. काढलेल्या फोटोंवरूनही काही वेगळा निष्कर्ष निघाला नाही म्हणून १८८२ च्या युतीच्या वेळी फ्रेंच शास्त्रज्ञांनी कॅमेरा न वापरण्याचा आग्रह धरला. १८८२ साली ९२, ८८०, ००० मैल इतकं अंतर काढलं गेलं जे सध्याच्या अंतरापेक्षा फक्त ३०, ००० मैलांनी कमी आहे.

रशियाने १९५७ साली स्पुटनिक अवकाशात उडवल्यावर अमेरिकेने पण अवकाश विज्ञान आपल्या प्रतिष्ठेचा प्रश्न केला. तो काळ त्या दोन राष्ट्रांमधल्या शीतयुद्धाचा होता. त्यामुळे अमेरिकेला रशिया उत्तर धृवावरून क्षेपणास्त्र फेकेल अशी भीती वाटत होती. क्षेपणास्त्र आल्याची सूचना देण्यासाठी उच्च शक्तीचा मायक्रोवेव्ह रडार एमआयटीतील तंत्रज्ञ, रॉबर्ट प्राइस व पॉल ग्रीन, बांधत होते. तेव्हा त्यांच्या डोक्यात असा विचार आला की त्यांच्या यंत्राने जवळच्या ग्रहाकडे लहरी पाठवल्या तर ग्रहाकडून परावर्तित झालेल्या क्षीण लहरी पकडण्याइतकं ते यंत्र चांगलं आहे का? त्याची परीक्षा घेण्यासाठी त्यांनी फेब्रुवारी १९५८ मधे पृथ्वी जवळ आलेल्या शुक्रावर लहरी सोडल्या. त्यातून समजलेलं शुक्राचं अंतर २८ दशलक्ष मैल (१ AU = ९३,४१६, ८७५ मैल) इतकं होतं. पण, दुर्दैवाने, सप्टेंबर १९५९ मधे शुक्र परत पृथ्वीच्या जवळ आल्यावर त्यांना त्या मापनाची पुनरावृत्ती नाही करता आली. अशातऱ्हेनं इप्सित साधण्यात जरी अपयश आलं तरी त्यातून अनेक नव्या गोष्टी पृथ्वीकरांना शिकायला मिळाल्या.

त्या नंतर रडार वापरून १ AU मोजण्यासाठी बरेच प्रयोग केले गेले आणि त्यातून जवळपासचे वेगवेगळे आकडे आले. शेवटी, १९६४ साली १ AU म्हणजे ९२, ९१०, ००० +/- १२५० मैल इतकं अंतर अशी घोषणा इंटरनॅशनल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल युनियनने केली.

या सगळ्याचा गोषवारा चर्चिलच्या शब्दात द्यायचा झाला तर तो असा देता येईल -- Success consists of going from failure to failure without loss of enthusiasm.

तळटीप [१] :- शुक्र, पृथ्वी व सूर्य एका रांगेत येण्याचा कालावधी
--------------------------------------------------------------------
शुक्राचे 'वर्ष' २२४ दिवसांचे, तर पृथ्वीचे ३६५ दिवसांचे. पृथ्वी/सूर्य/शुक्र एका रांगेत दोनदा येण्यामधील कालावधी हा ३६५*क्ष असा मांडता येईल. क्ष ची किम्मत अशी मिळेल: ३६५/२२४ = (क्ष + १)/क्ष = १.६

तळटीप [२] :- केप्लरचा तिसरा नियम
-----------------------------------------
कुठल्याही दोन ग्रहांना सूर्याभोवती फिरायला लागणार्‍या वेळांच्या गुणोत्तराचा वर्ग हा त्या ग्रहांच्या सूर्यापासूनच्या अंतराच्या गुणोत्तराच्या घनाच्या बरोबर असतो. केप्लरनं खालील समीकरण शोधलं.

(ग्रहाचा सूर्याभोवती फिरायचा वेळ / पृथ्वीचा सूर्याभोवती फिरायचा वेळ )^२ = (ग्रह व सूर्यातलं अंतर / पृथ्वी व सूर्यातलं अंतर )^३.

अर्थात, सर्व ग्रहांच्या कक्षा लंब वर्तुळाकार असल्यामुळे इथे सरासरी अंतर अपेक्षित आहे. कक्षा लंब वर्तुळाकार असल्या तरी त्या बर्‍याचशा गोलाकारच आहेत. सूर्यापासूनच्या सर्वात जवळच्या व सर्वात दूरच्या बिंदूंच्या अंतरात ४% पेक्षा कमी फरक आहे. यातल्या पृथ्वी व सूर्य यामधील सरासरी अंतराला १ अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल यूनिट (AU) मानतात.

प्रत्येक ग्रहाला सूर्याभोवती फिरायला किती दिवस लागतात हे भरपूर निरीक्षणांमुळे माहीत झालेलं होतं. उदा. समजा, एखाद्या ग्रहाला सूर्याभोवती फिरायला ८ वर्ष लागतात. तर वरचं समीकरण असं लिहीता येईल -
( ८ )^२ = (ग्रह व सूर्यातलं अंतर / पृथ्वी व सूर्यातलं अंतर )^३.
६४ = (ग्रह व सूर्यातलं अंतर / पृथ्वी व सूर्यातलं अंतर )^३.
४ = (ग्रह व सूर्यातलं अंतर / पृथ्वी व सूर्यातलं अंतर )
म्हणजेच, (ग्रह व सूर्यातलं अंतर) = ४ AU.

तळटीप [३] :- अंतर व पॅरॅलॅक्स यांचं व्यस्त प्रमाण
-------------------------------------------------------
हा पॅरॅलॅक्स वस्तू जितकी जवळ तितका मोठा दिसतो. पण लांबच्या वस्तूंसाठी अगदी लहान असतो. उदा. आपल्या सगळ्यात जवळ असलेल्या, प्रॉक्सिमा सेंटॉरी (अंतर ४.२ प्रकाश वर्ष), तार्‍याचा पॅरॅलॅक्स फक्त ०.७६८७ आर्क सेकंद (१ डिग्री = ६० आर्क मिनीटं, व १ मिनीट = ६० आर्क सेकंद, म्हणून १ डिग्री = ३६०० आर्क सेकंद) इतकाच भरतो. जवळ जवळ इतकाच पॅरॅलॅक्स ५.३ किलो मीटर लांब ठेवलेल्या २ सेंटिमीटर व्यासाच्या वस्तू मुळे मिळेल. हा पॅरॅलॅक्स इतका बारीक असल्यामुळे तो मोजताना थोडी जरी चूक झाली तरी अंतरात बरीच मोठी चूक होते.

तळटीप [४] :- सूर्य ग्रहण
---------------------------
आपल्याला दिसणारा चंद्राचा आणि सूर्याचा आकार साधारणपणे सारखाच असल्यामुळे चंद्र जेव्हा सूर्य व पृथ्वीच्या मधे येतो तेव्हा तो सूर्याला पूर्णपणे झाकू शकतो. त्यालाच 'ग्रहण' करतो म्हणता येईल. पण शुक्र फार लहान असल्याने त्याने सूर्य ग्रहण केलं असं म्हंटलेलं बरोबर वाटत नाही. उलट सूर्यानेच त्याचं 'ग्रहण' केलं असं दिसतं. म्हणून शुक्र सूर्य युती असं लेखात म्हंटलेलं आहे.

तळटीप [५] :- युतीचा उपयोग
--------------------------------
लांब वरच्या तार्‍यांना ग्रह आहेत की नाहीत हे दुर्बिणीतून नुसतं बघून कळत नाही, कारण एकच! अंतर! त्यामुळे त्याच्या भोवती काही फिरतं आहे की नाही हे त्या तार्‍याकडून येणार्‍या प्रकाशाच्या तीव्रतेत पडणार्‍या फरकावरून समजू शकतं. तार्‍याच्या समोरून त्या तार्‍याचा एखादा ग्रह जेव्हा जातो तेव्हा आपल्याला त्या तार्‍याकडून येणारा प्रकाश थोडा मंद झालेला दिसतो, फार जास्त नाही पण थोडा! उदा. गुरू सूर्यासमोरून गेला तर सूर्याची तेजस्विता फक्त सुमारे १% ने कमी होईल. याचा वापर करून त्या तार्‍याभोवती कुणी फिरतं आहे की नाही ते ठरवता येतं.

काही शास्त्रज्ञांची तोंडओळख
-------------------------------
१> केप्लर(१५७१-१६३०) : टायको ब्राहे या १६व्या शतकातील खगोल शास्त्रज्ञाने खूप मेहनतीने ग्रहांच्या कक्षा व तार्‍यांच्या जागा मोजून लिहून ठेवल्या होत्या. त्याला त्या माहिती वरून सूर्यमालेची प्रतिकृती बनवायची होती. त्यासाठी त्यानं केप्लर नावाच्या एका हुशार मुलाला आपला मदतनीस म्हणून नेमला. १६०१ मधे ब्राहेचं निधन झाल्यावर त्या माहितीचा वारसा केप्लरकडे चालत आला आणि त्यानं तेच काम पुढे चालू ठेवलं. ब्राहेने वापरलेली यंत्रं आणि मोजमाप पद्धती जास्त अचूक असल्यामुळे त्या माहितीतून केप्लरला इतरांना सहज न दिसलेल्या गोष्टी समजल्या. त्यातूनच त्याचे ३ नियम प्रसिद्ध झाले. या लेखात दिलेलं समीकरण हा त्याचा तिसरा नियम आहे आणि प्रथम ८ मार्च १६१८ रोजी त्याला तो सुचला हे त्यानंच त्याच्या 'द हार्मनी ऑफ द वर्ल्ड' या पुस्तकात नमूद केलं आहे.

२> एडमंड हॅली(१६५६-१७४२) : हॅली एक अत्यंत हरहुन्नरी माणूस होता. जहाजाचा कप्तान, नकाशे बनविणारा, ऑक्सफर्ड विद्यापीठातला भूमितीचा प्राध्यापक, डेप्युटी कंट्रोलर ऑफ रॉयल मिंट, खगोल शास्त्रज्ञ इ. इ. त्याची ओळख अशी विविध पदरी आहे. धूमकेतूला त्याचं नाव दिलं आहे पण शोध त्यानं लावला नाही. त्यानं फक्त १६८२ साली आलेला धूमकेतू आणि १४५६, १५३१ व १६०७ साली येऊन गेलेले धूमकेतू एकच आहेत आणि त्याची कक्षा कशी आहे इतकंच सांगितलं . पण त्या धूमकेतूला 'हॅलीचा धूमकेतू' हे नाव त्याच्या मृत्यू नंतर १६ वर्षांनी मिळालं. दर ७६ वर्षांनी येणारा हा धूमकेतू बहुतेकांच्या आयुष्यात फार तर एकदाच तोंड दाखवतो. उभ्या आयुष्यात हा धूमकेतू दोनदा येऊन जाण्याची शक्यता तशी कमीच! हे भाग्य मार्क ट्वेन ला लाभलं होतं. तो जन्माला आला आणि मृत्यू पावला त्या दोन्ही वर्षी धूमकेतू आकाशात होता.

संदर्भ/क्रेडिट्स :-
------------------
१) आकृत्या खालील स्थळांवरील आहेत!
अ> http://spiff.rit.edu/classes/phys235/venus_t/venus_t.html
ब> http://www.sciencebuddies.org/science-fair-projects/project_ideas/Astro_p019.shtml
क> http://www.exploratorium.edu/venus/P_question4.html

२> Coming of age in the milky way. By Timothy Ferris.
३> A short history of nearly everything. By Bill Bryson.
४> Article by Trudy Bell: http://www.tbp.org/pages/publications/bent/features/su04bell.pdf

-- समाप्त --