Monday, January 24, 2011

सरकार राज

सरकारी कार्यालयाचे अनंत झटके खाल्ल्यामुळे कार्यालय या शब्दाची कार्य + आलय अशी फोड कुणा गाढवानं केली हा प्रश्न मक्या मला नेहमी विचारतो. त्याच्या मते त्याची फोड खरी 'कार्य जिथे लयास जाते ते ठिकाण' अशी सार्थ व्हायला हवी होती.. शाळांमधलं शिक्षण कालबाह्य आहे ते असं! मक्याचं आणि सरकारी कार्यालयांचं काहीतरी वाकडं आहे हे मात्र नक्की! त्यानं सरकारी कार्यालयाच्या जितक्या वार्‍या केल्या तितक्या पंढरीच्या केल्या असत्या तर प्रत्यक्ष विठोबा 'कर कटेवरी' अवस्थेत त्याच्या घरात येऊन खाटेवर उभा राहीला असता. संत महात्म्यांना कधी सरकारचा बडगा बघायला मिळाला नसावा नाही तर त्यांनी 'जन्म मरणाचे फेरे परवडले पण सरकारी हापिसाचे नको!' असा टाहो फोडला असता.

लग्नानंतरचे झटके खायच्या आधी मक्याला आणि त्याच्या होणार्‍या बायकोला (मायाला) रजिस्टर्ड लग्न करण्याचा झटका आला. वास्तविक, त्यांचं लग्न हे दोन्हीकडचं पहीलं आणि शेवटचं होतं तरीही ते दोघे 'काहीतरी नवेच करा' या मानसिकतेचे बळी असल्यामुळे त्यांच्या हट्टापायी कुणाचंच काहीही चाललं नाही! मग काय? मी आणि मक्या मॅरेज रजिस्ट्रेशन हापिसात लग्नाआधी बर्‍यापैकी लवकर हजर झालो.. रजिस्टर्ड लग्नासाठी किमान एक महिन्याची नोटीस द्यावी लागते हे समजलं होतो म्हणून. आजुबाजुच्या परिसराची आणि त्या हापिसाची एकूण दैन्यावस्था पाहिल्यावर आम्हाला झोपडपट्टी निर्मूलन केंद्रापाशी आलो की काय असं वाटलं! सरकारी हापिसं अशा निवडक गलिच्छ आणि बकाल भागातच का असावीत बरे? बहुधा, तसा नियमच असावा.. कारण, त्यामुळे त्यांना कागदोपत्री लोकाभिमुख की काय ते व्हायला जमत असेल!

एकाच हापिसात मॅरेज रजिस्ट्रेशन आणि जमिनींचे व्यवहार यांची कामं होतात असं समजलं.. दोन्ही कामं करणारा कर्मचारी वर्गही एकच! मॅरेज सर्टिफिकेट ऐवजी मक्याला चुकून ७/१२ चा उतारा दिला तर काय करायचं ही शंका चाटून गेली मात्र! हापिसाच्या भिंती 'सख्या चला बागांमधी रंग खेळू चला' या गाण्याच्या शूटिंगसाठी वापरल्या सारख्या ठायी ठायी पानाच्या पिचकार्‍यांनी रंगलेल्या होत्या! हापिसात शिरल्यावर नजरेला प्रथम फक्त फायलींचे ढिगारेच ढिगारे दिसले. प्रकाश अंधुक होता कारण खिडक्यांसमोरही फायलीच.. अंधुक प्रकाशामुळे ट्युबा लावलेल्या.. सगळ्या धुळीने माखलेल्या.. त्यातल्या काही बंद तर काही कोंबडी सारख्या पक् पक् पकाक करणार्‍या.. सर्वदूर कोळ्यांची जाळी! एका कोपर्‍यात पाण्याचा माठ! वरती लयीत घ्रंs घ्रंs आवाज करणारे पण हवा न सोडणारे काळवंडलेले पंखे! फायलींनी अर्धी अधिक व्यापलेली कळकट टेबलं! खुर्च्यांवर मळकट उशा टाकलेल्या.. काही खुर्च्या डुगुडुगू नयेत म्हणून फायलींनीच लेव्हल केलेली.. बहुतेक फायली मळकट आणि तिथल्या कारकुंड्यांसारख्याच तट्ट फुगून कचर्‍याच्या डब्यासारख्या वाहणार्‍या!

अंधारात नीट निरीक्षण केल्यावर ढिगार्‍यांच्या मागे लपून बसलेले कारकून दिसले. सगळ्यांचेच चेहरे जवळचं कुणीतरी खपल्यासारखे सूतकी होते! 'एक टेबल झेलू बाई, दोन टेबलं झेलू' असा भोंडला खेळत शेवटी एका कारकूनापाशी उभे ठाकलो तेव्हा त्यांचा लंच टाईम झाला. आम्ही किती वेळेबरहुकूम काम करतो हे कर्मचारी दिवसातून फक्त दोनच वेळी दाखवतात.. एकदा लंच टाईमला आणि दुसर्‍यांदा हापिस सुटायच्या वेळेला! तासाभराने आम्ही परत उगवलो तेव्हा, कुत्रं जसं आपलीच शेपटी पकडण्याचा निष्फळ प्रयत्न करून आपण किती बिझी आहोत असं भासवत असतं तसाच हा पण कार्यमग्न होता! काही वेळाने त्याला शेपटी शिवाय अजूनही काहीतरी काम आहे याची जाणीव झाली. त्याच्याशी झटापट केल्यावर समजलं की नोटीस द्यायचे फॉर्म संपले आहेत आणि ते एक आठवड्यांनी येणार आहेत.

दोन तीन आठवडे गेले तरी फॉर्म्सच दुर्भिक्ष संपेना.. या हापिसातले लोक दोन लग्नेच्छुक लोकांची ताटातूट करणारे व्हिलन अकस्मात होताहेत की काय अशी परिस्थिती व्हायला लागलेली!.. मग चाचरत चाचरत त्याला चहा प्यायचं गाजर दाखवलं.. तर पठ्ठ्या लगेच तयार झाला. चहा पिता पिता मी त्याच्या विविध अडचणीतून कामं करण्याच्या वृत्तीची उगाचच प्रशंसा केल्यावर गडी खुलला! मग त्याची 'मी किती थोर! मी कशी पटापट कामं उरकतो!' टाईप भंकस ऐकून घेताना आता तो दुर्लभ फॉर्म जादूने उपलब्ध होणार याची मला खात्रीच झाली! हळूच त्याला मक्याचं लग्न कसं जवळ आलं आहे याची अडचण सांगितली. त्यावर त्याने 'खरच फॉर्म संपले आहेत हो' असं सांगून आमच्या गनिमी काव्याचं शिरकाण केलं. फॉर्म विना मक्याचा आधुनिक रामदास कसा होणार आहे त्याचं सविस्तर वर्णन केल्यावर त्यानं आमची दया येऊन एक उपाय सुचवला! त्याच्या हापिसात एक फॉर्म फ्रेम करून ठेवला होता! का कुणास ठाऊक! कदाचित त्याला हौतात्म्य प्राप्त झालं असावं.. पण हार घातलेला दिसत नव्हता! त्यानं आम्हाला फॉर्म म्हणून त्या फ्रेमची झेरॉक्स वापरायला सांगितलं!

आनंदाने 'तो' फॉर्म घेरी नेऊन मक्याने भरला आणि आपली सही ठोकून मायाकडे सहीसाठी कुरीयर केला.. कारण ती दुसर्‍या गावची होती. ३/४ दिवसांनी सही झालेला फॉर्म घेऊन आम्ही परत त्याच हापिसात त्याच कारकुना समोर उभे राहीलो! फॉर्म बघितल्यावर तो खेकसला.. 'हे काय? इथे कोण सह्या करणार?'. नीट बघितलं तर फॉर्मच्या समासातल्या २/३ जागा तो दाखवत होता.. जिथे सह्या पाहीजेत असं फॉर्मवर कुठेही लिहीलेलं नव्हतं.. आणि कितीही रिडिंग बिट्विन द लाइन्स केलं असतं तरी कळालं नसतं! त्या ठिकाणी मक्याच्या आणि मायाच्या सह्या हव्या होत्या! परत कुरीयर आणि ३/४ दिवसांची निश्चिंती! हा मक्या मॅरेज रजिस्ट्रेशन हापिसाचे जितके फेरे घालतोय तितके लग्नात घातले तर त्याला पुढच्या ७ जन्मात परत लग्नाला म्हणून उभं रहावं लागणार नाही असं मला वाटून गेलं!

एकदाचा तो सह्याबंबाळ फॉर्म त्या कारकुनाच्या पसंतीस उतरला आणि आम्हाला हुश्श होतंय न होतंय तोच त्यानं आम्हाला तो फॉर्म घेऊन त्याच्या साहेबाकडे जायला सांगितलं. साहेब म्हणजे लग्न नोंदणी आणि जमिन व्यवहार नोंदणीचा रजिस्ट्रार! त्याला भेटून लग्नाचं आमंत्रण द्यायचं असतं लग्न नोंदणीची कायदेशीर बाजू संभाळण्यासाठी! साहेबाच्या हापिसात साहेब टेबलावर आणि पुढच्या खुर्च्यांवर बरीच रिकामटेकडी मंडळी पारावर बसल्यासारखी गप्पा हाणीत बसलेली होती. साहेब फॉर्म हातात घेताच म्हणाला - 'हां! कुठं आहे जमीन?'. मक्या चांगलाच पिसाळला, पण करतो काय? रजिस्टर लग्न करून आपण कसे पुढारलेले आहोत हे दाखवायचं होतं ना! त्यानं तो लग्नाच्या रजिस्ट्रेशनचा फॉर्म आहे हे म्हंटल्यावर साहेब तो फॉर्म बघितल्यासारखा करून म्हणाला - 'आत्ताच त्या वेळेचं काही सांगता येत नाही.. अजून जवळपास सव्वा महिना आहे लग्नाला! तुम्ही मला रजिस्ट्रेशनला बोलावण्यासाठी एक अर्ज करा! आणि लग्नाच्या २ दिवस आधी या! तेव्हा मी सांगेन!". तेव्हा हा म्हसोबा काय सांगणार? जमणार नाही यायला म्हणून? या पेपर पुशर मंडळींना आपल्याला सतत प्रेशर कुकर मधे ठेवण्यात एक अलौकिक आनंद मिळतो.

मक्याला अर्ज लिहीण्यासाठी कागद हवा होता. कारकुनाकडे मागितला तर सरकारी हापिसात तो देण्याची प्रथा नाही असं ठणकावण्यात आलं. शेवटी झेरॉक्सच्या दुकानातून विकत आणला. वेष असावा बावळा परंतु अंतरी नाना कळा याची जिवंत उदाहरणं म्हणजे हे कारकून! त्यांच्या अंगातली एक कळ आहे ती कुठल्याही कामाला ना! ना! करण्याची.. मात्र ती आपल्याला नाना कळा देऊन जाते! घाईघाईने अर्ज खरडून साहेबाच्या हातात कोंबला.. तो वाचून तो हसत म्हणाला - 'भारी आहात तुम्ही! त्या दिवशीच्या जाण्या-येण्याचा खर्च देऊ असं पण लिहा त्यात!'. आहे की नाही मजा? आता लग्नाला बोलावल्यावर त्याला जेवायला पण घालणारच ना? पण त्याचा जीव जाण्या-येण्याच्या खर्चात अडकला होता! ती ओळ टाकून त्याला फॉर्म देताना मक्यानं धाडस करून त्याला विचारलं की दोन दिवस आधी भेटल्यावर तो काय गुपित सांगणार आहे ते! त्यावर तो म्हणाला की मला तेव्हा तुम्हाला सांगता येईल मला कुठून पिकप करायचं ते!

शेवटी, लग्नाच्या दोन दिवस अगोदरची एक फेरी आणि लग्नानंतरच्या सर्टिफिकेट घेण्यासाठीच्या ३ फेर्‍या घातल्यावर आम्हाला मोक्ष मिळाला. लग्नाचं ओरिजिनल सर्टिफिकेट म्हणून 'त्या' झेरॉक्स केलेल्या फॉर्मचीच झेरॉक्स मिळाली. त्या काळात असं वाटत होतं की राजा केळकर संग्रहालयातून एक तलवार चोरून आणावी आणि तिचं पाणी यांना पाजावं, म्हणजे त्यांच्या घोड्यांना आपण पाण्यात दिसायला लागू!

या अनुभवानंतर लगेचच मक्यानं एक सिद्धांत मांडला - सरकारी कामं पहिल्या फटक्यात होत नाही. करॉलरी, ज्यांचं काम पहिल्या फटक्यात होतं ते सरकारी ऑफिसातलं नसतं. लग्नानंतर थोड्याच दिवसात त्याला अजून एक सिद्धांत मांडण्याची वेळ आली-- नवरा बायकोच्या आवडी निवडी कधीही जुळत नाहीत. करॉलरी, ज्यांच्या आवडी निवडी जुळतात ते एकमेकांचे नवरा बायको नसतात.

====== समाप्त ======

Wednesday, December 15, 2010

पेशाचे भोग

'कंप्युटर विचारलेल्या प्रश्नांची बरोबर उत्तरे देतो' असं मास्तरने सांगितल्यावर एका नवशिक्याने, निरागसपणे, 'पुण्याहून मुंबईला जाणारी डेक्कन क्वीन किती वाजता सुटते?' असा सोप्पा प्रश्न कंप्युटरला टाकला. त्यावर कंप्युटरने एरर! एरर! असा, दाराच्या फटीत शेपटी चिणल्यासारखा, जीवघेणा आक्रोश केल्यावर तो नवशिक्या त्याच्या विरुद्ध फतवा निघाल्यासारखा टरकला. त्यावर त्या मास्तरने, 'कंप्युटर मधे आपणच आधी माहिती भरायची असते, मग कंप्युटर तीच माहिती आपल्याला परत देतो' अशी सारवासारवी केली. कसली सॉलीड गेम टाकली की नाही? जी माहिती आपल्याला आधी पासूनच आहे ती प्रथम कंप्युटर मधे भरायची, नंतर तीच, प्रश्न विचारून काढून घ्यायची?

कितीही चमत्कारिक वाटली तरी आवळा देऊन आवळाच काढायची कला मला जमलीच! कारण पूर्वी कॉलेजमधे प्रॅक्टिकल्स न करता फक्त बरोब्बर उत्तरं देणारीच ऑब्झर्व्हेशन्स जर्नल मधे लिहायची चालुगिरी! त्यानंतर मात्र माझं घोडं अल्गोरिदम नामक दलदलीत जे फसलंय ते अजून पर्यंत!

कंप्युटर नवसाला पावावा म्हणून अल्गोरिदम नामक र्‍हिदम कोणत्याही ड्रमवर वाजवला जात नाही.. हे सुरवातीलाच मुद्दाम सांगतोय, नंतर तक्रार चालणार नाही! तर, अल्गोरिदम म्हणजे एखादी कृती कशी करायची याबद्दल कंप्युटरला दिलेल्या सविस्तर सूचना! आपल्या मते त्या कितीही सविस्तर आणि बिनचूक असल्या तरी कंप्युटर एखाद्या मोलकरणी प्रमाणे घालायचा तो घोळ घालतोच! कुणाला नुसती रेसिपी वाचून पहील्या फटक्यात उत्तम पदार्थ करायला जमलंय का कधी? तसंच!

अल्गोरिदमची भानगड कळण्यासाठी असं समजा की कंप्युटर एका फूटपाथवर आहे आणि त्याला पायी रस्ता कसा क्रॉस करायचा आहे. तर काय काय सूचना द्याल? थोडं सामान्यज्ञान वापरलं तर प्रथम झेब्रा क्रॉसिंग शोधायला सांगता येईल, नंतर आधी उजवीकडे मग डावीकडे गाडी नाही ना याची खात्री करून मग रस्ता क्रॉस करायला सांगता येईल. प्रथम दर्शनी या सूचना पुरेशा वाटतात पण या सूचना देऊन कंप्युटरला समजा टिळक रोडच्या फूटपाथवर उभा केला तर त्याला गंज चढेल पण तो रस्ता क्रॉस करू शकण्याची खात्री नाही. का? कारण पहिलीच सूचना! झेब्रा क्रॉसिंग शोधा! पुण्यात ते सापडण्यासाठी अस्तित्वात असलं पाहीजे ना? असलंच तर दिसलं पाहीजे. पुण्यामधे सिग्नल लागल्यावर झेब्रा क्रॉसिंगवर गाडी नाही उभी केली तर आपल्याला पुढे जाऊच देणार नाहीत असं समजतात.

समजा, क्रॉसिंग दिसलं तरी पुढे लफडा आहेच! उजवीकडे बघितल्यावर एखादी पार्क केलेली गाडी दिसली तर कंप्युटर 'युगे अठ्ठावीस फुटपाथ वरी उभा' राहील. त्यासाठी ती सूचना 'स्वतःच्या दिशेने येणारी गाडी दिसली तर ती जाई पर्यंत उभे रहा' अशी बदलायला पाहीजे. हा अल्गोरिदम घालून कंप्युटरला अमेरिकेत रस्ता क्रॉस करायला लावला तर तो कदाचित पलिकडच्या फूटपाथ ऐवजी स्वर्गात सापडेल कारण तिकडे गाड्या रस्त्याच्या उजव्या बाजूने चालवतात. त्यामुळे तिकडे आधी डावीकडे आणि नंतर उजवीकडे बघायला लागेल. अशा प्रकारे, प्रत्येक सूचना कुठे आणि कधी चालेल याचा कंटाळा येई पर्यंत उहापोह करून अल्गोरिदम लिहीला तरच डोक्याचा भावी ताप कमी होतो. हुश्श!

हे सगळं मी तुम्हाला माझ्या डोक्यावर परिणाम झालाय म्हणून सांगत नाहीये.. वेल! म्हणजे, ते अगदीच खोटं नाहीये.. म्हंटलं तर झालाय, म्हंटलं तर नाही! त्याचं काय आहे, कंप्युटरला अल्गोरिदम भरवायचं माझं रोजचंच काम आहे. म्हणूनच प्रत्येक सूचनेला काय काय विघ्न येतील याचाच येता जाता विचार माझ्या डोक्यात सतत चालतो. ती कशी आणि कुठे झोपेल हे सारखं बघायचं.. असंभाव्य किंवा अतर्क्य गोष्टी घडतील असं गृहीत धरून!

त्या सवयीचा इतका गुलाम झालोय मी की साध्या साध्या कामांमधे देखील कीस काढतो अगदी! बायकोने नुसतं पोराला शाळेत सोडायला सांगितलं तरी माझ्या डोक्यात असंख्य विचारभुंगे भुणभुणायला लागतात.. ट्रॅफिक किती असेल?.. दुसरा रस्ता आहे का जायला?.. वेळेवर पोचणार का?.. पोरगा तयार होणार का लवकर?.. स्कूटर न्यावी की कार?.. पेट्रोल आहे का?.. पेट्रोल भरायची वेळ आली तर वेळ गाठणार का?.. पाऊस आला तर?.. वेळेवर पोचलो नाही तर काय करायचं?.. मला ऑफिसला पोचायला किती उशीर होईल?.. ऑफिसात आज काय करायचंय सकाळी?.. तंद्रीमधे पोराला ऑफिसलाच घेऊन गेलो तर?

असो. साधारण कल्पना आली ना तुम्हाला? इथंच ते प्रकरण थांबत नाही, तर त्या विचार भोवर्‍यात मी पूर्ण गुरफटतो. बायकोकडे तोंड अर्धवट उघडं टाकून पहात रहातो पण प्रत्यक्षात शून्यात पहात असतो. त्यामुळे पुढच्या सूचना न्युट्रिनो सारख्या कुठेही न अडखळता डोक्याच्या आरपार सरळ निघून जातात. त्या पुढच्या नाट्याचे यशस्वी प्रयोग घराघरातून सतत होत असतात त्यामुळे ते इथे सांगत बसत नाही.

मला वाटतं की हे पेशाचे भोग फक्त माझ्याच नशिबी असावेत. कारण, इतर लोकांना त्यांच्या पेशाचा घरगुती आयुष्यात उपद्रव झालेला मी तरी ऐकलेला नाही. उदा.. ट्रॅफिक पोलीस.. त्याच्या बायकोने जर 'स्वयंपाक करायला जाते' म्हणून घराच्या बाहेरचा रस्ता धरला तर तो जोरजोरात शिट्टी मारून तिला 'बाजूला' घेईल का? किंवा वीजमंडळातल्या कारकुनाच्या बायकोने त्याला विजेचं बिल भरायला सांगितलं तर तो तिला दुसर्‍या टेबलावर जा म्हणेल का? वाण्याला घरात कागदाचा तुकडा दिसला तर तो समोर दिसेल ती वस्तू त्यात गुंडाळून मोकळा होईल का? एखादा वकील, त्याला गावाहून परत येण्यास जास्त दिवस लागणार असतील तर असं पत्र बायकोला लिहीताना पाहीलं आहे का ?..

My Dear Shubha(Mrs. Shubha Vinayak Dange, Aged 34, resident of 234/56, Vakratunda Co-op Soc, Sadashiv Peth, Tilak Road, Pune 411004. Hereinafter referred to as 'Darling'.)

I, (Mr. Vinayak Shreedhar Dange, Aged 35, resident of 234/56, Vakratunda Co-op Soc, Sadashiv Peth, Tilak Road, Pune 411004. Hereinafter referred to as 'I'.), came to Delhi for official work on Monday the 28th of Oct. 2010, and whereas, the work was delayed because of the act of God, and whereas, I am not able to get train and plane tickets, and whereas, it is not clear when I can leave from here, I am not sure when I can be home.


______ (स्वाक्षरी)
(Mr. Vinayak Shreedhar Dange) Dated: 5 Nov 2010


Witness: _______ (Mr. Jayram Ramram Taliram, Aged 43, resident of 8502/41, Aarakshan road, Connaught place, New Delhi- 110092.)
Dated: 5 Nov 2010

कॉल सेंटर मधे काम करणार्‍या एखाद्या बाईला, घरी, तिच्या नवर्‍याचा फोन आला तर तिनं त्याला.. तुमची जन्मतारीख काय?.. तुमच्या आईचं लग्नापूर्वीच नाव काय?.. तुमचा पत्ता काय? इ. इ. प्रश्न विचारून हैराण केलेलं कुणी ऐकलं आहे काय? एखादा वेटर, घरी बायकोने खाण्यासंबंधी काहीही विचारलं तर 'इडली, वडा, डोसा, उत्तप्पा, कांदा उत्तप्पा, टोमॅटो आमलेट....' अशी सरबत्ती करेल काय? शाळा मास्तराने घरी बायकोला अंगठे धरून उभं रहाण्याची शिक्षा दिल्याचं ऐकलं आहे काय? घराच्या दाराची घंटा वाजल्यावर बस ड्रायव्हरला कधी गिअर टाकण्याची हालचाल करताना पाहीलं आहे काय? गारुड्याला बायकोसमोर पुंगी वाजवताना पाहीलंत का? रिकाम्या न्हाव्याला उगीचच कात्रीचा चुकचुकाट करीत बसलेला पाहीलाय का कुणी?

नाही ना? तेच तर मी म्हणतोय की इतर लोकांचं जिणं त्यांच्या पेशाच्या प्रदूषणापासून मुक्त आहे. तुम्हाला एखादी केस माहिती असलीच तर ती मी एक्सेप्शन प्रुव्हस द रूल म्हणून सोडून देईन. तुमचे केस जातील पण माझ्या सारखी केस नाही मिळणार! मला कंप्युटरनं झपाटलंय! कंप्युटरचं प्रोग्रॅमिंग करता करता त्यानंच माझं डोकं फॉर्मॅट करून तिथं चक्क नवीन ओएस टाकली आहे. आता तर, कुठलीही काम करण्याआधी मी नुसतं काय बोंबलेल याचा विचार करून थांबत नाही तर त्या प्रसंगी मार्ग कसा काढता येईल त्याचंही चर्वितचर्वण करायला लागलोय! इतका सगळा सखोल विचार केला तरी ते काम बोंबलायचं थांबत नाहीच शेवटी! फरक इतकाच की बोंबलण्याचं कारण आधी विचार न केलेल्या पैकी असतं. तरीही विक्रमादित्याचा आदर्श ठेवून, तेच काम पुढच्या वेळेस करायच्या वेळेला बोंबलण्याच्या नवीन कारणाचाही समावेश करायला जातो. याचा परिणाम फक्त अख्ख्या फॅमिलीची डोकी तापवण्यात होतो.. आणि माझंही!

उदाहरणार्थ, मंडईतून भाजी आणण्याची साधी गोष्ट! आयुष्यात पहिल्यांदा मी भाजी आणायला निघालो तेव्हा तुफान डोकं चालवल्यावर मला आणायच्या भाज्यांची यादी करायचं सुचलं. ती यादी एखाद्या कवितेच्या रसग्रहणासारखी लांबलचक झाली. पण प्रत्येक भाजी किती किलो घ्यायची हे न लिहील्यामुळे संजीवनी न शोधू शकणार्‍या हताश हनुमानाप्रमाणे घरी द्रोणागिरी एवढ्या भाज्या आल्या. त्याचं वेगळं रामायण झालं आणि माझे गाल, मारुती प्रमाणे, पुढचे बरेच दिवस फुगलेले राहीले. पुढच्या वेळेस यादीत सगळं नीट लिहून घेऊन गेलो पण माठ नामक भाजी ऐवजी पाण्याचा माठ नेण्याचा माठपणा केला. कुणा लेकाला माहिती माठ हे भाजीचं पण नाव असतं ते?

पुढच्या वेळेस गेलो तेव्हा मी भाजीवाल्यासमोर आणि माठ कसा ओळखायचा हा यक्ष प्रश्न माझ्यासमोर एकदमच उभे ठाकले. भाजी विकण्याची गरज त्याला जास्त आहे त्यामुळे तो योग्य ती भाजी देण्याचं काम चोख करेल असं समजून निर्धास्तपणे मी त्याला माठ मागितला. पुष्कळशा टोपल्या आजुबाजूला पसरून बर्‍याच आत मध्यभागी तो कोळ्यासारखा बसलेला होता. उत्तरादाखल त्यानं फक्त एक टोपली माझ्याकडे फेकली. एका यकश्चित भाजीवाल्या समोर माठ नावाखाली मायाळू घेऊन स्वतःचं हसं करून घ्यायचं नव्हतं मला! शिवाय, त्यानं भर मंडईत माझं शैक्षणिक वस्त्रहरण केलं असतं तर ते केव्हढ्याला गेलं असतं? मग माझी प्रतिष्ठा जपण्यासाठी माठ सोडून तिथून ताठ मानेने सटकलो. पण घरी बायकोशी गाठ होती.. हो, लग्नापासून बांधलेली! तिच्या लाथाळ्या खाल्ल्या. पुरुष हा क्षणकालाचा पती आणि अनंत काळाचा फुटबॉल असतो, हे मूलभूत ज्ञान मला तेव्हा झालं! शाळा कॉलेजात आई बाप, मोठी भावंड, मास्तर, नातेवाईक.. तारुण्यात बॉस, बायको, पोरंबाळं.. म्हातारपणी पोरांच्या बायका इ. इ. सगळे पुरुषांवर यथेच्छ पाय धुवून घेतात. नाही म्हणायला फक्त शैशवातच काय ते थोडं फार कोडकौतुक होतं पुरुषांच! म्हणूनच प्रौढत्वी निज शैशवास जपायला सांगतात की काय न कळे!

कधी सांगितलेली भाजी मंडईत नसणे तर कधी अधपाव म्हणजे नेमके किती असा प्रश्न पडणे अशा नवनवीन समस्या उद्भवणं काही थांबत नाही आणि त्या वेळेला मख्खपणे काम जमत नाही हे पण सांगता येत नाही! घोर कुचंबणा! कंप्युटरचं माणसापेक्षा बरं असतं. कुठेही तो अडकला की एरर फेकून हात झटकून रिकामा होतो. आठवा, मायक्रोसॉफ्टचे 'जनरल प्रोटेक्शन फेल्युअर' हे तीन अगम्य शब्द! ते स्क्रीनवर नाचले की एक्सप्रेस वे वरून भरधाव जाता जाता अचानक समोर मोठ्ठं विवर दिसल्यावर जसं फेफरं येईल तसं येतं. विचार करा, ओबामाची सुरक्षा व्यवस्था मायक्रोसॉफ्टकडे असताना त्याच्यावर हल्ला झाला तर ते 'जनरल प्रोटेक्शन फेल्युअर' ही भीषण एरर देऊन त्यातून अंग काढू शकतील का? असा सुलभ ऑप्शन माणसांना नसतो.

तरीही मी विचार करायचा थांबत नाही. मला ते व्यसन लागलंय. हेच बघाना, एकाने मला याच वेडावर लेख लिहायला सांगितलं तर लगेच.. कादंबरी लिहावी की साधा लेख?.. लिखाण टाकताना मधेच सर्व्हर झोपला तर?.. लोकांना अश्लील वाटला तर?.. हा लेख दुसर्‍या कुठल्या लेखाची कॉपी वाटला तर?.. .. .. .. .. ..

====== समाप्त ======

Tuesday, November 9, 2010

कोडग्यांची शाळा

'तुमच्या वेळेला कंप्युटर होता?'.. नव्या युगातल्या एका सळसळत्या रक्ताच्या अजाण कोडग्याने (प्रोग्रॅमरने) आश्चर्याने मला हा प्रश्न चॅट करताना विचारल्यावर हे नेट दुभंगून त्याला पोटात घेईल तर बरं असं वाटलं. हा शेंबड्या किती बोलतो? माझ्या लग्नाला जितकी वर्ष झालीयेत तेव्हढं याचं वय पण नाही. आणि हा त्या कालातल्या पुण्याच्या आयटीतल्या स्थानाबद्दल हे उद्गार काढतो? क्षणभर, गुहेतून बाहेर पडून वल्कलं संभाळत लकडी पुलापाशी शिकारीला जाण्याची दृश्यं तरळून गेली. पण क्षणभरच, मग विचार केला.. हल्लीचे लोक एखादी माहिती गुगलून नाही मिळाली तर ती अस्तित्वातच नव्हती असं सर्रास समजतात. नशीबानं, या बालकानं त्याचं अज्ञान माझ्यासमोर उघड केलं. अजून माझ्यासारखे, पुण्यातल्या आयटी रेव्होल्युशनचा पाया रचणारे, जुन्या पीढीतले कोडगे जिवंत आहेत. त्या काळी सुवर्णाक्षरांनी लिहीलेला आणि आत्ताच काळाच्या पडद्याआड चाललेला तो इतिहास आम्ही पुनरुज्जीवित करू शकतो. नाही केला तर पुढे याचं पण अयोध्या प्रकरण होऊ शकेल. तस्मात्, हा लेख तमाम कोडग्यांच्या डोक्यातली अज्ञानाची जळमटं व्हॅक्यूमने खेचून तिथे योग्य इतिहासाची लागवड करण्यासाठी लिहीला आहे.

तर, तुमच्या वेळेला कंप्युटर होता का? याचं थोडक्यात उत्तर 'हो' असं आहे. पुण्यात तर टीव्ही यायच्या आधीपासून कंप्युटर अस्तित्वात होता हे विधान मी कुठलही नशापाणी न करता करतो आहे. तुम्हाला ते 'वेदांमधे सगळ्या शोधांबद्दल माहिती आहे' छाप वाटू शकेल.

मी एसेस्स्तीत (१९७२) असताना पहिल्यांदा कंप्युटर पाहीला तेव्हा बाबा एसेस्सी बोर्डातच कामाला होते. त्या वेळेला त्यांनी, बोर्डात घेतलेला नवीन कंप्युटर दाखवायला, मला रंगलेल्या खेळातून ओढून, हट्टाने नेलं होतं. हल्ली पोरांना कंप्युटर वरच्या खेळातून ओढून मैदानावर न्यावं लागतं! आम्ही गेलो तेव्हा बोर्डातली दोन माणसं त्या कंप्युटरच्या एका सर्किट बोर्ड सदृश ठोकळ्याला वायरी जोडत होती. अनंत वायरींनी लगडलेला तो ठोकळा जटा पिंजारलेल्या साधूच्या डोक्यासारखा दिसत होता. नवीन वायर खुपसायची नेमकी जागा पहाण्यासाठी त्यांना केस बाजूला सारून ऊ शोधण्याची कसरत करावी लागत होती. त्यांनी मला खूपशा वायरी दाखवून जे बरच काहीबाही सांगीतलं त्या वरून कंप्युटरचं काम करायला इलेक्ट्रिशियन व्हायला लागतं हे पक्क ठसलं. पुढे मी एसेस्सीचा अडथळा निर्विघ्नपणे पार केला. त्या मागे माझ्या बाबांचा मोठा हात आहे असं माझ्या हितचिंतकांच ठाम मत आहे.. मला ते त्या कंप्युटरचं चुकून झालेलं चुकीचं वायरिंग वाटतं. पण ते काही मी त्यांना पटवू शकलो नाही! आजच्या कंप्युटरची बरोबरी जर माणसाशी केली तर त्या कंप्युटरला माकड म्हणायला लागेल इतक्या प्राथमिक अवस्थेतला तो होता.

मी जेव्हा कंप्युटरचं शिक्षण घ्यायला सुरुवात केली त्या काळात एक विलक्षण गूढ वलय होतं कंप्युटर भोवती आणि शिकणार्‍यांभोवती! त्यामुळे सर्वसामान्यांमधे जरी एक आदराची भावना होती तरी आतल्या गाठीचे, खास मासलेवाईक, प्रश्न शनवार/सदाशिव पेठी लोकांकडूनच यायचे.. कंप्युटर तर सर्व प्रश्नांची बरोबर उत्तरं देतोच मग तुमचा काय उपयोग? गणित चांगलं आल्याशिवाय कंप्युटर येत नाही अशी, सारसबागेच्या गणपतीला गेल्याशिवाय पेपर चांगला जात नाही सारखी, हूल कुणी तरी (बहुतेक गणिताच्या मास्तरांनी) उठवलेली होती. त्या सर्व गैरसमजुतींचा फायदा घेऊन काही धूर्त लोक आपल्या चुका बिनबोभाटपणे कंप्युटरवर ढकलायचे. पेपरात 'कंप्युटरच्या चुकीमुळे विद्यार्थी नापास' अशा सनसनाटी बातम्या झळकायच्या. कामगार संघटना 'नोकर्‍या जाणार, नोकर्‍या जाणार' म्हणून कंप्युटर धोपटायला बघायच्या. पूर्वीच्या आई बापांना इंजिनिअरिंग आणि मेडिकल सोडून दुसरं काही शिक्षण जगात असतं हे माहितीच नव्हतं.

हल्ली सगळं बदललंय. हल्ली सन्मान्य कोर्सचं शिक्षण पोरांना झेपत नसेल तर कंप्युटर शिकायचा सल्ला मिळतो! नेटभर बागडून आणि नाही नाही ते पाहून डोळे बिघडले तरी ठपका मॉनिटरवर ठेवला जातो. त्याचं भांडवल करून, वाढीव पैशाच्या मोबदल्यात, कामगार संघटना लोकांच्या नोकर्‍यांच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष करतात.

माझ्या माहितीत तेव्हाच्या पुण्यात दोनच कंप्युटर होते.. एक एसएससी बोर्डात आणि दुसरा विद्यापीठात.. बाकी अजून एक दोन पुण्याच्या खाजगी कंपनीत असावेत. विद्यापीठातला ICL 1904 नामक एक मेनफ्रेम कंप्युटर होता. त्याच सगळंच अवाढव्य होतं. स्वेटर न घालता गेलं तर थंडी भरून न्युमोनिया होईल अश्या गारढोण आणि भल्या मोठ्या जागेत तो बंदिस्त होता. तिथे फक्त कंप्युटर सेंटरच्या लोकांना प्रवेश होता. त्यांना पायताणं बाहेर काढून वेगळ्या सपाता घालून आत जावं लागे. आत जाणारे लोक बाहेरच्या गर्दीकडे तुच्छ नजरा टाकत आत जायचे. आत मधे, भिंतीच्या एका बाजूला मोठ्या वॉशिंग मशीनसारखी दिसणारी ४ कपाटं होती. एक कपाट म्हणजे ६४ एमबी इतकी दांडगी जागा असलेली हार्ड डिस्क होती.. त्या काळी ६४ एमबी म्हणजे अगदी झोपायला जागा आहे असं वाटायचं! आता असं वाटतं की त्या कपाटात मधाच्या पोळ्यासारखी खुराडी करून, पोळ्याच्या प्रत्येक षटकोनात एकेक बाईट ठेवला तरी ६४ एमबी पेक्षा जास्त बसले असते.

भिंतीच्या दुसर्‍या बाजूला, भस्म्या रोग झाल्यासारखा सतत कार्ड खाणारा कार्ड रीडर होता. दर मिनीटाला सुमारे हजारेक कार्ड तो फस्त करायचा. त्याच्याच शेजारी, स्वच्छ भिंतीवर ग्राफिटी करणार्‍यांची हलकी मनोवृत्ती असलेला आणि सतत कागदांच्या भेंडोळ्या ओकणारा प्रिंटर होता. तो छापखाना इतका कर्णकर्कश्य आवाज करायचा की ऑपरेटर बाहेर आल्यावर पण ओरडूनच बोलायचे. एकदा, बीएससीच्या पहिल्या सेमिस्टरचा निकाल होता.. एक जानेवारीला लावणार होते. आदल्या आठवड्यात रात्रभर बसून कित्येक हजार पानांचा तो निकाल छापला.. नंतर तो प्रत्येक सेंटर प्रमाणे पाकिटात घालताना लक्षात आलं की त्या वरची तारीख एक जानेवारी असली तरी वर्ष जुनच आहे.

तिसर्‍या बाजूला दोन महाकाय टेप ड्राईव्हज होते.. कॅसेट रेकॉर्डर समोर ते टॉर्च पुढे गॅसबत्ती सारखे वाटायचे. शेजारच्या मोठ्या कपाटात टेपा ठेवायची व्यवस्था होती. चौथ्या बाजूला सीपीयू आणि इतर गोष्टी असलेलं कपाट आणि एक ऑपरेटर कंसोल. त्या कंसोलला एक वेगळा प्रिंटर होता.. त्यावर कंप्युटर कडून ऑपरेटरला सूचना यायच्या. त्या वाचून ऑपरेटरची सीपीयू, टेप, रीडर आणि प्रिंटर यांच्यामधे पळापळ चालायची. कंप्युटरची मेन मेमरी १२८ केबी इतकी जबरा होती. या कंप्युटरला टर्मिनल्स नव्हती. प्रोग्रॅम आणि त्याला लागणारी माहिती कार्डांनी पुरवली जायची आणि प्रोग्रॅमचे फलित (आउटपुट) छापील कागदावर मिळायचं! हल्लीच्या काळात त्याला मेनफ्रेम म्हणणं म्हणजे डासाला डायनासॉर म्हणण्यासारखं वाटेल.

विद्यापीठात सामान्यत: कुठल्याही कोर्सची जबाबदारी एखाद्या विभागाकडे असते. त्या वेळेला कंप्युटर शिक्षणासाठी वेगळा विभाग नव्हता. त्यामुळे आमच्या या अनौरस कोर्सचं व्यवस्थापन इतर विभागातल्या एखाद्या मास्तरच्या गळ्यात घातलं जायचं. विषयांचे मास्तर बाहेरून आयात केले जायचे. आमच्या कोर्सचं सर्व प्रोग्रॅमिंग मेनफ्रेम वर चालायचं. प्रोग्रॅम पळवण्यासाठी आधी कार्डं पंच करायची. त्यासाठी प्रोग्रॅम हा प्रोग्रॅमिंग शीट वर लिहायचा आणि ते कागद पंच ऑपरेटरला (आमच्या भाषेत पंचर) द्यायचे. प्रोग्रॅमिंग शीटवरची एक ओळ म्हणजे एक कार्ड. पंचरच्या दुकानात सिद्धिविनायकासारखी मोठी रांग असायची. कधी कधी प्रोग्रॅम पंच होऊन मिळायला आठवडा पण लागायचा. स्वतःचा प्रोग्रॅम स्वतः पंच करायची सोय होती. पण त्यासाठी स्वतःची कार्ड वापरायला लागत. एका कार्डाला ५ पैसे पडायचे, तेव्हा ३०-३५ कार्डांच्या प्रोग्रॅमचे पैसे पाहीले की तोंडाला फेस यायचा हो! पंचरकडे काम दिलं की कसं सगळं फुकटात व्हायचं!

पंच झालेला प्रोग्रॅम, म्हणजे एका रबर बँडने मुसक्या बांधलेला कार्डांचा गठ्ठा, हातात पडला की तो कंप्युटर ऑपरेटरला नेऊन द्यायचा. अल्पावधीतच आमच्याकडे ढिगानी रबर बँड जमली.. कुठल्याही खिशात हात घातला तरी पैसे नाही पण रबर बँड नक्कीच सापडायचं. आम्हा बँडवाल्यांना त्या ढिगाचं काय करायचं हा यक्ष प्रश्न होता. थोड्याच दिवसात, रबर बँड विशिष्ट पद्धतीने बोटांना अडकवलं तर गोळीसारखे मारता येतं असा शोध काही अत्राप कार्ट्यांनी लावला. मग काय? जरा वेळ मिळाला की तुंबळ बँड वॉर सुरू व्हायचं. (रबर बँड कसं मारायचं याच्या अधिक माहिती साठी मला भेटा अगर लिहा. चांगल्या वर्तणुकीचा दाखला आवश्यक!).

कोर्सचे प्रोग्रॅम दळण्याच्या दोनच वेळा होत्या, सकाळी ११ आणि दुपारी ३. बाकीच्या सर्व वेळ खाजगी कंपन्यांना आणि विद्यापीठाला वापरायला दिलेला होता. या वेळांच्या आत कार्डांचे गठ्ठे देण्यासाठी धुमश्चक्री चालायची.. त्यात पंचरला पटविण्यापासून त्याच्याकडच्या रांगेचं अवैध मॅनिप्युलेशन पर्यंत सर्व चालायचं. गठ्ठे दळायला आत गेले की तिथे मॅटर्निटी वॉर्डच्या बाहेरचं वातावरण व्हायचं. सगळ्यांच्या चेहर्‍यावर काळजी मिश्रीत हुरहुर आणि शंका... कस्सं होणार? या वेळेला तरी टॅहँ ऐकू येणार का?

कार्डांच्या गठ्ठ्याला बांधलेली फलिताची (प्रिंटाउटची) सुरळी या स्वरूपात दळण बाहेर यायचं. कधी कधी, गहू दिल्यावर हळद दळून मिळाल्यासारखं, आपल्या कार्डांना भलत्याचीच सुरळी चिकटून यायची. तसं झालं की 'माझ्या प्रोग्रॅमची सुरळी हरवली, ती मला सापडली' असल्या बडबडगीतांनी सेंटर आणि कँटिन दणाणून जायचं. दळण आलं की उत्सुकतेने सुरळी उघडून बघितली जाई. बहुतेक वेळेला काही ना काही तरी चुकलेलंच असायचंच. त्यामुळे टॅहँ ऐवजी टाहोच जास्ती ऐकू यायचा. मग काय चुकलंय ते चहा बिडी मारून सुप्त मेंदुला चालना दिल्या शिवाय समजायचं नाही.

चूक सापडली की गठ्ठ्यातली चुकीची कार्ड शोधून त्याजागी नवीन कार्डं पंचून घालायला लागायची.. ते काम पंचरला दिलं तर ते कधी मिळेल त्याचा भरवसा नसायचा. त्यावर आम्ही एक जालीम उपाय शोधून काढला होता. एका कार्डावर १२ ओळी व ८० कॉलम असतात. एका कॉलम मधे एकच कॅरॅक्टर पंच करता येतं. एका कॉलम मधे कुठल्या ओळीवर भोकं मारली आहेत त्यावरून कुठलं कॅरॅक्टर पंच केलंय ते कळतं. एका कॉलममधे जास्तीत जास्त ३ ओळींवरच भोकं असतात. एकही भोक नसेल तर ते स्पेस कॅरॅक्टर. पोथी वाचणारे काय वाचतील इतक्या सराईतपणे आम्ही नुसती भोकं बघून कार्ड वाचायला शिकलो होतो. त्यामुळे कोर्स संपल्यावर सेंटर मधे निदान स्टँडबाय कार्ड रीडरची नोकरी पक्की होती. आम्ही पंचिंग रूम मधून भोकं पाडल्यावर पडतात त्या टिकल्या जमा करायचो. त्या टिकल्यांनी फॉल्टी कार्डावरची अनावश्यक भोकं बुजवून परत योग्य भोकं पाडून वापरायचो. अशी होलिस्टिकली मॉडिफाईड कार्ड रीडरला चालायची. फक्त, कार्ड थोडं ओलं असेल किंवा वापरून वापरून मऊ पडलं असेल तर रीडर मधे ते अडकायचं आणि पुढचे २०-२५ गठ्ठ्यांच्या राई राई एवढ्या चिंधड्या मिळायच्या. 'हेचि फळ काय मम प्रोग्रॅमला' अशी खंत करत कोडगे ते तुकडे कवटाळत भग्न हृदयाने कँटीनला जायचे.

या सर्व प्रक्रियेमधे एक प्रोग्रॅम सुरळीत व्हायला (तसे सर्व प्रोग्रॅम सुरळीतच मिळायचे, पण इथे सुरळीतचा रूढ अर्थ अपेक्षित आहे.) किमान दोन आठवडे तरी जायचेच. ही परिस्थिती जरा तरी बरी होती. कंप्युटर आणायच्या आधी विद्यापीठात फोर्ट्रान प्रोग्रॅमिंगचा एक कोर्स चालायचा. त्याचे प्रोग्रॅम तर मुंबईत टिआयएफारला दळायला जायचे. पंचर सगळे प्रोग्रॅम घेऊन मंगळवारी सकाळी मुंबईला जायचा, दळण झालं की सुरळ्या घेऊन रात्री पुण्यात यायचा. बुधवारी सगळ्यांनी चुका दुरुस्त करून दिल्या की गुरुवारी अजून एक दळण व्हायचं. यातच दळणवळण शब्दाची उत्पत्ती दडली आहे की काय कोण जाणे! अशा प्रकारे एक प्रोग्रॅम बरोबर चालायला किती आठवडे लागतील त्याचा हिशेब वाचकांना गृहपाठ म्हणून दिलेला आहे!

प्रोग्रॅम सुरळीत होण्यासाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठी, आम्ही लिहीलेला प्रोग्रॅम १०-१० वेळा तपासून मगच पंचरला द्यायचो. पंच झालेला गठ्ठा स्वतःच वाचून त्यातली चुकीची कार्ड आधीच दुरुस्त करायचो. या पद्धतीने शिकण्याचा एक प्रचंड फायदा झाला.. तो म्हणजे, स्वतःच्या प्रोग्रॅमला 'आपला तो बाळ्या' अशी पक्षपाती वागणूक न देण्याची सवय आपोआपच लागली. हल्लीच्या कोडग्यांसारखं १० ओळी लिहून लगेच डिबगर खाली त्या चालवणं म्हणजे कन्याकुमारी ते दिल्ली बस प्रवासात दर १० मिनीटांनी, 'आलं का दिल्ली?' असं विचारण्यासारखं वाटतं मला!

जितकी मजा कंप्युटरला जोडलेली यंत्रं करायची तितकीच आमचे मास्तर आणि पोरं करायची. मला फोर्ट्रान शिकवायला एक अत्यंत तिरसट, खडूस आणि विक्षिप्त मास्तर होता. बोलायच्या ऐवजी तो खेकसायचाच! जर का एखाद्याची चूक त्याला दिसली तर तो त्याला कार्ड रीडरसारखा फाडून खायचा. त्याला आम्ही तिरसिंगराव म्हणायचो. कोर्स सुरू होऊन महिना होऊन गेला तरी पठ्ठ्या शिकवायला उगवलाच नाही. पोरांनी कंटाळून लेक्चरला येणं बंद केलं. कुणी तरी 'वर' तक्रार वगैरे केल्यावर एक दिवस तो उगवला. वर्गात कमी पोरं बघून लगेच खेकसला.. 'बाकीचे कुठे आहेत? सगळे आल्याशिवाय मी लेक्चर घेणार नाही'.. आणि गेला. पुढच्या लेक्चरला सगळ्या पोरांना बाबापुता करून जमवलं. वर्गात आल्या आल्या तो गरजला 'प्रत्येकाकडे फुलस्केप वही आणि पेन्सील पाहीजे. त्या शिवाय मी लेक्चर घेणार नाही.' आयला! पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स आहे की शाळा? पण करतो काय? आलिया तिरसटाशी असावे सादर! पुढच्या लेक्चरला सगळे वही पेन्सील घेऊन हजर! म्हंटलं, चला! आता तरी याची सगळी कारणं संपली असतील.

पण कसचं काय? तो सवाई तिरसिंगराव निघाला. लेक्चरला आल्या आल्या त्यानं फळ्यावर लिहीलं 'I = 1' आणि गुरकावला 'सांगा, याचा अर्थ काय होतो?'. पहिलीतल्या पोरांना वर्गमूळ काढायला सांगितल्यावर त्यांचं जे काय होईल तेच आमचं झालं. बरेच जण माना खाली घालून बसले. खरे कोडगे खिडकी बाहेरच्या हिरवळीचं रसग्रहण करत बसले. दोन मिनिटातच तो 'याचं उत्तर आल्याशिवाय मी लेक्चर घेणार नाही' असं ठणकावून निघून गेला. मग परत सगळे 'वर' गेल्यावर तो 'खाली' आला आणि पुढचं शिक्षण नीट सुरू झालं. लवकरच 'I = 1' म्हणजे काय ते समजलं पण गाडी 'I = I + 1' वर अडली. दोन्ही कडचे I कॅन्सल होऊन 0 = 1 होतं आणि तरीही कंप्युटरला ते चालतं हे समजण्यात आणखी काही दिवस गेले. बाकी, त्याचा मूड चांगला असला तर तो शिकवायचा मात्र उत्तम!

काही वर्षानंतर मी मुंबईहून डेक्कन क्वीनने पुण्याला येत असताना माझ्या वर्गातली दोन तीन मुलं भेटली. गप्पाटप्पात तिरसिंगरावाचा विषय निघाला. सगळे त्याची नक्कल करत करत त्याचे किस्से सांगून मनमुराद खिदळत होते.. इतक्यात, समोरचा एक वृद्ध माणूस पुसता झाला.. 'तुम्ही हे त्या विद्यापीठातल्या अमुक अमुक प्रोफेसरबद्दल बोलताय का?'. होकारार्थी उत्तर मिळाल्यावर त्या गृहस्थांनी गुगली टाकला.. 'नशीबवान आहात, थोडक्यात सुटलात'. आँ! म्हणजे काय? हा माणूस बालवाडीपासून त्याचा विद्यार्थी आहे की काय? कुणालाच काही समजलं नाही. भुवया उंचावून प्रश्नार्थक मुद्रेने एकमेकांकडे पाहिल्यावर एकाने विचारलं 'म्हणजे? तुमचं म्हणणं समजलं नाही हो नीट!'. त्यावर तो कळवळून 'अहो! तो माझा जावई आहे हो!' म्हणताच एकदम सगळ्यांचा कडेलोट झाला.

आमचा दुसरा एक मास्तर अगदी हसतमुख होता, कधीही चिडायचा नाही. तो विद्यापीठा जवळच रहायचा, खूप हुषार होता आणि खूप वेगवेगळे विषय शिकवू शकायचा. साहजिकच, प्रत्येक वर्षाला काहीना काही तरी तो शिकवायचाच. फक्त, प्रचंड विसरभोळेपणा हा एकच त्याचा प्रॉब्लेम होता.. त्याचा म्हणण्यापेक्षा आमचा! त्याला लेक्चरची वेळ कधीही आठवायची नाही. आठवलीच तर काय विषय शिकवतोय ते आठवायचं नाही. आणि चुकून हे सगळं आठवलंच तर मागच्या लेक्चरला कुठपर्यंत शिकवलं होतं ते आठवायचं नाही. कित्येक वेळेला लेक्चरच्या वेळेला तो आम्हाला न सांगता बाहेर गेलेला असायचा. त्यामुळे त्याचा विषय मागे पडायचा. मग रविवारी जादा लेक्चर व्हायची. एका रविवारी सकाळी ११ वाजता त्याच्या लेक्चरला गेलो.. नेहमी प्रमाणे त्याचा पत्ताच नव्हता. मग घरी बोलवायला गेलो.. पायजमा शर्ट असल्या कपड्यात तो घरी निवांत होता. आम्हाला दारात पहाताच हसत हसत म्हणाला 'मी काहीतरी विसरलोय ना? काय विसरलोय?'. हा इसम, खुद्द त्याच्या बायकोला दिलेला शब्द पण विसरायचा. हे तो मुद्दाम करायचा की नाही याबद्दल तज्ज्ञात मतभेद आहेत. तरीही अजून त्यांचा संसार मात्र सुरळीत चालू आहे.

कोबॉलचा प्रोग्रॅम म्हणजे एक मोठ्ठाच्या मोठ्ठा निबंध असतो. त्यात सुरुवातीच्या भागात CONFIGURATION SECTION आणि त्या नंतर SOURCE-COMPUTER असं लिहून कंप्युटरचं नाव लिहायचं असतं. एका पोराने त्याच्या प्रोग्रॅम मधे एकदा SOURCE-COMPUTER चं स्पेलिंग चुकवलं. साहजिकच, कंप्युटरने झापड मारली 'SOURCE-COMPUTER MISSING'. त्याला त्याचा अर्थच कळाला नाही. बिच्चारा! जातीचा सरदार होता तो, अगदी त्यांच्या लौकिकाला साजेलसं वागला.. ऑपरेटरला कंप्युटर हरवला आहे का असं विचारून आला!

मी पास झाल्यावर (या खेपेला कंप्युटरची काहीही चूक नव्हती, कारण निकाल मुळात कंप्युटरवर काढलेला नव्हता) काही वर्षांनी कंप्युटर शिक्षणाचा स्वतंत्र विभाग झाला. त्या विभागाने त्यांच्या कोर्सेस साठी स्वतंत्र कंप्युटर घेतला. कालांतराने मेनफ्रेमचे ते सेंटर बंद होऊन ती जागा सीडॅकला देण्यात आली.

== समाप्त ==

Thursday, October 14, 2010

जिवाची मुंबई

'काल नेहमी प्रमाणे सायकलवरून घरी चाललो होतो.. भरपूर ढग होते.. गच्च अंधार होता.. आणि तेव्हाच एका गल्लीतून एक सायकलवाली भसकन माझ्या समोर आली'.. माझ्या ऑफिसातला एक सहकारी डिसेंबरातल्या एके दिवशी सांगत होता.. 'तिच्या सायकलला दिवा नाही.. डोक्यावर हेल्मेट नाही.. अंगावर फ्ल्युरोसंट जॅकेट नाही.. काहीच नाही.. मी म्हणालो.. माय गॉड! हाऊ इज शी गॉना सर्व्हाइव्ह?'.. हो ना! इकडे सायकल चालवायची असली तरी हेल्मेट लागतं, सायकलला दिवा लागतो शिवाय अंधारात इतरांना तुम्ही दिसावेत म्हणून अंगात फ्ल्युरोसंट जॅकेट लागतं. त्याच्या ष्टोरीवर बाकीचे संमती दर्शक माना डोलावत शेरेबाजी करत होते आणि मला मात्र आपल्याकडचं सायकलिंग आठवत होतं. एकदम मन सुमारे ३०/३५ वर्ष मागे गेलं.. कॉलेज मधल्या काळात.

[टीप :- आता फ्लॅशबॅक चालू होणार आहे. तरी प्रत्येकांने इथे आपल्या आवडी प्रमाणे आपल्याला हवा तसा फ्लॅशबॅक मारून घ्यावा. तुम्हाला काही सुचत नसल्यास पुढील मान्य फ्लॅशबॅक पद्धतीतून निवड करा .. चालू सीन पाण्यावर डचमळून डचमळून एकदम भूतकाळातल्या सीनला खो देण्याची एक पद्धत. दुसरी, भूतकाळातला सीन सरळ ब्लॅक अँड व्हाईट मधे सुरू करण्याची. वाचकांना अशी कस्टमायझेशनची सोय देऊन त्यांना लेखात प्रत्यक्ष सहभागी करून घेणारा हा पहीलाच लेख असावा बहुधा!]

आम्ही नेहमीप्रमाणे कॉलेजच्या कट्ट्यावर चकाट्या पिटत बसलो होतो. का कुणास ठाऊक पण त्या दिवशी जाम बोअर होत होतं.. कशातच मजा राहिली नव्हती.. लेक्चरना दांड्या मारून पिक्चरला जाणे.. दुसर्‍या कॉलेजच्या लेक्चरांना बसणे.. कॉलेजला सरळ यायच्या ऐवजी व्हाया गुत्ता येणे.. सगळ्या सगळ्याचा घनघोर कंटाळा आलेला होता.. अगदी, सुंदर मुलगी दिसल्यावर केसांची झुलपं ठीक करायला देखील हात उठत नव्हता.

आणि, अचानक, कसलीही पूर्वकल्पना न देता मक्यानं 'आपण सगळ्यांनी मुंबईला जायचं का?' असा बाँब टाकला. बाँब नाहीतर काय? कारण, आमच्या पॉकेटमनीच्या पैशात आम्ही फार फार तर हडपसर पर्यंत जाऊन आलो असतो. त्या काळी आमचा पॉकेटमनी आठवड्याला तीन किंवा चार रुपये इतका घसघशीत असायचा. 'लागतोय कशाला पॉकेटमनी?' हा समस्त आईबापांचा युक्तिवाद! 'बाहेरचं खायला? शीss! कळकट्टं हॉटेलातलं ते त्याच त्याच तेलात तळलेलं खाणं? छे! त्यापेक्षा पोराने डबा घेऊन जावा!'. तेव्हा चहा फक्त १५ पैशाला मिळायचा हो, पण आम्हाला बिड्या प्यायलाही पैसे लागायचे.. अर्थात, ते कळालं असतं तर मी कुठल्या तरी गॅरेजवर गाड्या पुसत बसलो असतो.

या पार्श्वभूमिवर, ट्रेनच्या तिकीटाचे आणि मुंबईत हिंडण्याफिरण्याचे पैसे घरी मागितले असते तर पैसे सोडाच वर हक्काचा पॉकेटमनी पण बंद झाला असता.. शिवाय, कुचकटपणे 'हॅ! मुंबईत काय जायचंय? पाहिली नाही का कधी आपण? त्यापेक्षा अभ्यास करा जरा! मागच्या परीक्षेत किती मार्क पडलेत ते माहिती आहे ना?' असली मुक्ताफळं ऐकायला मिळाली असती. 'परीक्षेतले मार्क' हे समस्त आईबापांच सुदर्शन चक्र! त्यांनी ते तोंडातून भिरकावलं की सपशेल शरणागती पत्करल्या शिवाय गत्यंतर नसायचं.

तरीही गंमत म्हणून आमचे खर्चाचे हिशेब सुरू झाल्यावर मक्याने खरा बाँब टाकला.. याच्या मानाने मागचा लवंगी बाँब होता.. 'अरे गाढवान्नो! ट्रेनने नाही, सायकलने जायचंय'. सायकलने मुंबई? माणसानं पहिल्यांदा चंद्रावर पाऊल ठेवण्या इतकीच ही आयडिया जगावेगळी होती. इथे जवळपास जायला सायकल ठीक आहे, पण मुंबई? जरा विचार केल्यावर ती कल्पना थ्रिलिंग वाटली मात्र!

बाकी मक्याच्या कल्पना नेहमी चित्तथरारक आणि उत्स्फुर्त असायच्या. त्याच्यामुळे पुण्याच्या आसपासच्या गावांना आमच्या सायकलवार्‍या झाल्या होत्या. लोणावळ्याला तर तीन चार वेळा जाणं झालं होतं. एकदा तर संध्याकाळी ६ वाजता आम्ही अचानक निघालो आणि शिवापूरला सायकलवर जाऊन रात्री ११ वाजता परत आलो होतो. पण सायकलने मुंबईला एका दिवसात काही जाऊन येणं शक्य नव्हतं, शिवाय पैसे पण लागले असतेच. मग घरी काय बंडला मारायच्या? मुंबईत कुठं रहायचं? पैसे कसे जमवायचे? कोण कोण येणार? असल्या अनंत प्रश्नांचा उहापोह सुरू झाला.

हो नाही करता करता ५ जण तयार झाले. मी, दिल्या, मक्या, उल्हास आणि सतीश. जायला किती वेळ लागेल याचा काहीच अंदाज नव्हता. लोणावळ्याला जायला चार साडे चार तास लागायचे इतकाच अनुभव होता. शांतपणे सायकल चालविली तर वेग तासाला सुमारे १५/१६ किमी पडतो. त्यावेळी पनवेल ते चेंबूर खाडी पुला वरून जाणारा रस्ता नुकताच तयार झाला होता. त्या पुलाचं उदघाटन नेहमी प्रमाणे रखडलेलं होतं पण वाहनांची ये जा सुरू झाली आहे असं ऐकून होतो. तसंच त्या पुलावरून जायला टोल भरावा लागतो हे समजलं होतं आणि सायकलला किती टोल पडेल त्याची माहिती कुणालाच नव्हती. एक दिवस जायला, एक यायला आणि एक दिवस तिथे रहायला असा ३ दिवसांचा प्लॅन झाला. उल्हासची बहीण दादरला रहायची तिच्याकडे रहायचं ठरलं.

मुंबईला सायकलने सोडाच पण ट्रेनने जायला सुद्धा घरून परवानगी मिळाली नसती म्हणून घरी 'सिंहगडावर जाणार आहोत.. तिथे एका मित्राच्या शेतावर रात्री राहून दुसरे दिवशी परत येऊ' अशी बंडल ठोकली. फक्त उल्हासच्या घरी आम्ही मुंबईला जाणार आहोत हे माहीत होतं. पैशासाठी वेगवेगळ्या पुड्या सोडल्या! मला पुस्तकं घ्यावी लागणार होती, मक्याला केमिस्ट्री प्रॅक्टिकल करण्यासाठी डिपॉझिट भरावं लागणार होतं, दिल्याला कॉलेजच्या एका कार्यक्रमाची वर्गणी भरायला लागणार होती. सावधगिरी म्हणून प्रत्येकानं इतरांनी घरी काय बंडला मारल्या आहेत ते लक्षात ठेवलं होतं!

ठरल्या दिवशी पहाटे ६ ला निघालो. एकाच दिवसाचे कपडे घेऊ शकत असल्यामुळे प्रत्येकाच्या खांद्याला एकच शबनम पिशवी होती! त्याकाळात शबनम पिशवीची क्रेझ होती.. बॅकपॅक सारखी उच्चभ्रू लोकांची वस्तू फारशी कुणाला माहीत नव्हती.. आणि शबनम बॅकपॅकेसारखी पाठीवर टाकता यायची. थोडं खाणं बरोबर घेतलं होतं.. पुरी भाजी, शिरा असलं काही तरी.. कामशेतला चहा/बिड्या प्यायला थांबलो तेव्हाच ते संपलं.

नेहमी होणार्‍या अपघातांमुळे पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ बर्‍यापैकी कुप्रसिद्ध होता. सतत येणार्‍या जाणार्‍या ट्रक आणि गाड्यांमुळे सायकली पॅरलल चालवणं म्हणजे गंगेच पाणी वर्तमानपत्राने अडवायला गेल्यासारखं झालं असतं. सायकली एका पाठोपाठ एक अशाच चालवत होतो तरीही मागून येणार्‍या गाड्यांना त्यांचा त्रास व्हायचाच.. समोरून गाडी येत असेल तर जास्तच. कित्येक वेळा ट्रकवाले आम्हाला ओव्हरटेक केल्यावर मुद्दाम आमच्या जवळून आत येऊन रस्त्यावरून खाली उतरवून द्यायचे.. बाजुच्या जमिनीपासून रस्ता एक दीड इंच उंच असल्यामुळे सायकल डांबरी भागावर ठेवायची कसरत केल्यास कपाळमोक्ष होण्याची शक्यताच जास्त होती. तीच कथा सायकल परत डांबरी रस्त्यावर घेताना! त्यामुळे ट्रकने झाँसा दिला रे दिला की लगोलग त्याच्या ड्रायव्हर/क्लीनरचा मुक्तपणे कुळोद्धार व्हायचा.

मक्याच्या सायकलचा फक्त मागचा ब्रेक लागायचा.. पुढचा ब्रेक अस्तित्वात नव्हता.. फक्त हँडल जवळची दांडी होती.. मक्या ती गोल गोल फिरवत उगाचच एखाद्याला ओव्हरटेक करायचा आणि वर 'टॉप गिअर टाकलाय रे' म्हणून खिजवायचा. मग दुसरा खुन्नसने त्याला ओव्हरटेक करायचा. पण कामशेत नंतर मक्याची सायकल पंक्चर झाली आणि त्याच्या चेहर्‍यातली हवा गेली. परत कामशेतला मागे जाण्याचं धैर्य कुणात नब्हतं. मग एकाने मक्याला डबलसीट घेतलं आणि दुसर्‍याने त्याची सायकल डबल कॅरी केली. ते दमले की दुसर्‍या दोन जणांची पाळी! मधे मधे ट्रकवाले नको इतकी जवळीक दाखवत होतेच. असं करत करत वरात पार लोणावळ्या पर्यंत आल्यावर एक सायकलचं दुकान दिसलं आणि आम्ही कपडे न काढता 'युरेका! युरेका' म्हणून ओरडलो. सायकलवाल्यानं मख्खपणे टायर ट्यूबचा राडा झाल्याचं सांगीतलं. दोन्ही नवीन टाकून मग खंडाळा गाठे पर्यंत बारा साडे-बारा झाले आणि कुणाला तरी बिअर बार दिसला.. भूकही लागली होतीच.. एकेक बिअर आणि जेवण रिचवून दीड दोनच्या सुमारास गाडी उताराला लागली.

घाटातून अशक्य बुंगाट वेगाने सायकली सुटल्या.. ते इवलेसे ब्रेक वेगावर नियंत्रण आणण्यासाठी अपुरे पडत होते.. आमच्या हातात फार काही नव्हतं, आम्ही उतारपतित होतो.. एखाद्या ब्लॅकहोलच्या तळाकडे जसे काही प्रचंड वेगाने खेचले जात होतो.. मधे येणार्‍या सगळ्या गाड्यांना कधी डावी तर कधी उजवी घालत आमच्या सायकली एखाद्या उल्के सारख्या खोपोलीत येऊन धडकल्या. हा रोलरकोस्टरचा पहीला वहीला अनुभव! सायकली थांबवून ब्रेक बघायला गेलो तर रबर जळल्याचा वास आला.. ते चांगले चटका बसण्या इतके गरम लागत होते आणि त्यावरचं रबर वितळलं होतं. मक्या त्या भीषण उतारावरून एकाच ब्रेकवर कसा उतरला त्याचं त्याला माहिती.. फक्त उतरताना तो येडा टॉप गिअर टाकत ट्रकांना ओव्हरटेक करीत होता.

ब्रेकांच डॅमेज विशेष नाहीये हे पाहील्यावर आगेकूच सुरू झाली.. खोपोली मागे पडलं आणि टँशsss!.. या वेळेला दिल्याच्या चाकाने राम म्हंटलं. पण आता आम्ही अनुभवी होतो. परत डबल कॅरी डबल सीट करत करत संध्याकाळच्या सुमारास पनवेल गाठलं. तिथे टायर ट्यूब बदले पर्यंत सगळ्यांच्या चहा बिड्या मारून झाल्या. पनवेल सोडून खाडी पुलाचा रस्ता शोधेपर्यंत चक्क अंधार पडला. बॅटरी आणण्याची अक्कल कुणीच दाखवली नव्हती आणि आता अकलेचा प्रकाश पाडण्याला पर्याय नव्हता. रस्ता नवीन असल्यामुळे आणि पूर्ण तयार झाला नसल्यामुळे तिकडे फारशी वर्दळ नव्हती, शिवाय कडेला बर्‍यापैकी खड्डे होते. मागून गाडी आली तर तिच्या प्रकाशात थोडा रस्ता तरी दिसायचा पण पुढून आली तर सायकलवर आंधळी कोशिंबीर खेळायला लागायचं.

थोड्या वेळाने पूर्ण चंद्र आला आणि त्यातल्या त्यात थोडं दिसायला लागलं. अजूनही आम्ही एका मागून एक असेच चाललो होतो. पुढच्याच्या मागून बिनबोभाट जायचं हा नियम असल्यामुळे पुढचा खड्ड्यातून गेला की मागून आणखी ४ जण त्याच खड्ड्यातून तसेच यंत्रवत जायचे. सगळ्यात पुढे सतीश अभिनव पद्धतीने सायकल हाणत होता.. हाताची दोन्ही कोपरं हँडलवर ठेवली होती आणि हनुवटीला तळव्यांचा आधार दिला होता.. सर्किटपणाचा कळस नुसता!.. केवळ हँडल हाताने धरायचा कंटाळा आला म्हणून! लवकरच, एका मोठ्याशा खड्ड्याने जादू दाखवली आणि सतीशचा एक दात भूमिगत झाला.

इतका वेळ चाललेलं सायकलिंग आता आपले रंग दाखवायला लागलं होतं. कधी एकदाचे पोचतोय असं झालं होतं. शरीरातला घाम संपत आला होता. अंगावर धुळीची असंख्य पुटं चढली होती. आमच्या पायांना सतत पेडल मारायची सवय झाली होती. चालताना विचित्र वाटायचं कारण पेडल मारल्यासारखी पावलं पडायची. तहान कायम लागलेली असायची आणि पाण्याची बाटली कुणाकडेही नव्हती.

आणि, एकदाचा तो खाडी पुलाचा टोल बूथ आला. बूथवरच्या माणसाकडे 'सायकलला किती टोल?' अशी पृच्छा करताच त्यानं स्वतःला चिमटा काढून तो झोपेत नसल्याची खात्री केली नि टोलच्या रेट कार्डावर नजर फिरवली. या पुलावरून कधी कुणी सायकलवाला जाईल अशी अपेक्षा सरकारला नसावी कारण सायकलचा रेट नव्हता. 'कुठून आलात?' त्यानं आम्हाला जाता जाता विचारलं. 'पुण्याहून' हे उत्तर ऐकताच तो स्वप्नात असल्याबद्दल त्याची खात्रीच झाली असणार.

पुलावर दिवे होते पण ते खाडी दाखवायला असमर्थ होते. लांबलचक पूल पार करून चेंबुरात शिरलो. उल्हासचं लहानपण दादर मधे गेलेलं होतं. त्यामुळे चेंबूर पुढे कसं जायचं हे उल्हासला माहीती असेल या समजुतीला धक्का बसला. एका दुकानात विचारून प्रवास सुरू झाला. दिव्यांचा लखलखाट, खूप गाड्या/बसेस आणि मोठे रस्ते पाहून 'आता पोचलोच की आपण' याचा आनंद झाला होता. त्यात, बाजुनी जाणार्‍या बस मधल्या प्रवाशांनी ओरडून आणि हात हलवून चिअरिंग सुरू केल्यावर आमचा थकवा कुठल्या कुठे पळून गेला. सगळे हिरीरीने सायकल मारायला लागले.. मक्याच्या गिअर टाकण्याला ऊत आला. प्रचंड चिअरिंग चाललय आणि आम्ही एखादी मोठी रेस जिंकत असल्यासारखे सायकली हाणतोय हे दृश्य आजही मनात ताजं आहे. सायकल नामक यंत्र त्यांनी कधी पाहिलं नव्हतं की काय कुणास ठाऊक. माझं इतकं चांगलं स्वागत मुंबईच्या लोकांनी त्या नंतर कधीही केलं नाही.

उल्हासचं अजूनही मधेच उतरून रस्ते विचारणं चालू होतं आणि आमचं चिडवणं पण! 'इतकी वर्ष मुंबईत शिकायला ठेवलं पण साधे रस्ते पण माहीत नाहीत तुला?' असली हेटाळणी एकीकडे चालू होती. पण दुसरीकडे 'आयला, अजून किती जायचय?' हा विचार पिंगा घालायला लागला होता. उल्हास सोडता आमच्या पैकी कुणालाच मुंबईच्या आकाराची कल्पना नव्हती हे खरं! शेवटी उल्ह्याला ओळखीची खूण दिसली एकदाची आणि आम्ही थोड्याच वेळात त्याच्या बहिणीच्या दारात उभे राहीलो. रात्रीचे सुमारे साडे-नऊ दहा झाले होते.

घरात अंधार दिसत होता. झोपले की काय सगळे? बेल दाबल्यावर कुणीच दार उघडलं नाही. परत एकदा बेल दाबून घरात कुणी नाही याची खात्री केली. उल्ह्याने शेजारच्या घरात चौकशी केल्यावर बहीण आणि तिचा नवरा सिनेमाला गेल्याचं कळलं. किल्ली त्यांच्याकडे नव्हती. परत एकदा उल्ह्याला 'फोन करून का नाही सांगीतलस?' म्हणून भोसडण्यात आलं. पण ते येई पर्यंत काय करायचं? मग उल्ह्यानंच दादर चौपाटीवर टीपी करायची आयडिया टाकली. सायकली तिथेच ठेवून पेडल मारत मारत चौपाटीवर आलो. मस्त गार वारं वहात होतं, आकाशात चंद्र तारे शायनिंग करत होते, लाटांनी खर्ज लावला होता आणि आम्ही प्रवासाच्या आठवणीत दंग झालो.

कुणीतरी कशाने तरी मला ढोसत होतं.. 'कॉलेजला जायचं नाहीये, आई!'.. मी बरळलो.. तरी ढोसणं चालूच होतं.. काय त्रास आहे च्यायला!.. वैतागून डोळे किलकिले करून पाहीलं तर एक पोलीस लाठीने ढोसत होता.. आयला पोलीस घरी येऊन का ढोसतोय? पूर्ण जाग आल्यावर आम्ही चौपाटीवर असल्याचा साक्षात्कार झाला.. रात्री १० नंतर चौपाटीवर बसायची परवानगी नसते, कोजागिरी आहे म्हणून आज १२ पर्यंत होती.. तो पोलीस सांगत होता.. अरेच्च्या! म्हणजे आज कोजागिरी होती? किती वाजले होते कुणास ठाऊक!.. आमच्या पैकी फक्त उल्ह्याकडे घड्याळ होतं. रात्रीचा १ वाजला होता. अर्धवट झोपेत पेडल मारत घरी गेलो.. नशीबानं बहीण आलेली होती. तिला अर्थातच आम्ही येणार असल्याची काहीच कल्पना नव्हती. जुजबी ओळख परेड होताच क्षणाचाही विलंब न लावता सगळे मेल्यासारखे झोपले.

सकाळी उशीराच जाग आली तेव्हा घरी फक्त बहीण होती, नवरा कामावर गेला होता. पाय आहेत की नाहीत याचा नक्की अंदाज येत नव्हता. काबाडकष्ट करून सकाळचे कार्यक्रम उरकले नि बिड्या फुकायला बाहेर पडलो. 'आपण घरी फोन करायला पाहीजे'.. कुणाला तरी अचानकपणे समंजसपणाची भरती आली. फोन फक्त माझ्या आणि मक्याच्या घरीच होता. घरच्यांना इतर घरी सांगायला पाठवायचं ठरवलं. उल्ह्याच्या घरी माहितीच होतं. बाबा घरी असण्याची शक्यता नसल्यामुळे हीच वेळ फोन करायला योग्य होती. पब्लिक फोनवरून फोन लावल्यावर अपेक्षेप्रमाणे आईने उचलला.
'आई! मी आज घरी येत नाहीये'
'बरं! का रे पण? अजून एक दिवस शेतावर घालवणार आहात का?'
'अं अं अं हो! नाही! मी शेतावर नाहीये'
'आँ? शेतावर नाहीयेस? मग कुठे आहेस तू?'.. आवाजातून रागाची छटा जाणवायला लागली होती.. पण खरं काय ते सांगणं भाग होतं.
'मुंबईत!'.. त्यानंतर तिकडे काय घडलं ते माहीत नाही.. सिनेमात जसं हातातून ट्रे पडून सगळ्या कपबशा खळकन फुटताना दाखवतात तसं काहीसं झालं असावं! नंतर मक्याच्या घरच्याही फुटल्या. बहुधा, नजिकच्या भविष्य काळात आमची टाळकी फुटण्याची ती नांदी असावी.

रात्री पायांना चांगलं तेल रगडून झोपलो.. दुसरे दिवशी परतीचा प्रवास सुरू केला. पाय दुखत असल्यामुळे प्रवास निवांतपणे रमत गमत चालला होता. घाट लागल्यावर मात्र बोंबाबोंब झाली. पेडलवर पूर्ण उभं राहीलं तरीही चाक एक मिलीमीटर पण पुढे जात नव्हतं.. असला भयानक चढ! कात्रजपेक्षाही भीषण! सायकलवर कात्रजचा चढ पुण्याच्या बाजूने देखील व्यवस्थित चढता येतो. मात्र खंडाळ्याच्या घाटाने पार वाट लावली.. ट्रकच्या साखळ्या धरून जायचा प्रयत्न केला जरा.. पण डावीकडे खोल दरी, उजवीकडे रँव रँवणारा ट्रक आणि मधे सायकल जेमतेम मावेल अशी रस्त्याची चिंचोळी पट्टी हे दृश्य एक दोनदा अनुभवल्यावर सगळा माज उतरला. सगळे हातात सायकल धरून मुकाटपणे चालायला लागले. बराच वेळ चालल्यावर शेवटी खंडाळा आलं. यापुढील प्रवास वेगाने होतो कारण खंडाळ्यापासून थेट पुण्यापर्यंत सतत थोडा थोडा उतार आहे. त्यामुळे परतीचा वेग आपोआपच वाढून तासाला सुमारे २०/२१ किमी पडतो.

रात्री ९ वाजता घरी ठेपलो. भीत भीत घरात पाऊल ठेवलं. 'पायात गोळे बिळे नाही आले का रे?'.. घरच्यांनी विशेषतः बाबांनी प्रेमाने चौकशी केल्यावर सगळं टेन्शन गेलं. 'तेल लावून चोळ पाय चांगले'.. 'गरम पाण्यात पाय बुडवून ठेव'.. मधेच एक प्रेमळ दटावणी आली.. 'अरे पण सांगून गेला असतास तर आम्ही काही नाही म्हंटलं नसतं!'.. त्यात काही तथ्य नव्हतं हे आम्हा दोघांनाही चांगलं माहीत होतं. दुतर्फा प्रेम ओसंडत असताना बाबांनी एकदम 'कुठली पुस्तकं घेतलीस ती दाखव बघू!' म्हणून ६.३ रिश्टर स्केलचा धक्का दिला आणि माझा चेहरा सूळी जाणार्‍या माणसासारखा झाला.

'तुला काय वाटतंय चिमण?' माझा हरवलेला चेहरा पाहून ऑफिसातला सहकारी पुसता झाला आणि मी भानावर आलो.
'अं अं, वि वेअर लकी'.. आता भंजाळायची पाळी त्याची होती.

तळटीपः

या सायकलवारीच्या उत्तुंग यशामुळे आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत नाशिकला जायचं ठरवलं. तो सायकल प्रवास थोडक्यात पुढे देतोय...

या खेपेला एकही बंडल मारली नाही. कारण, आपला पोरगा काही तरी करू शकतो असा विश्वास कधी नव्हे ते घरच्यांना वाटत असेल असा विश्वास आम्हाला वाटला. परीक्षेचा रिझल्ट लागलेला नव्हता म्हणूनच परवानगी मिळाली. मक्या, मी आणि दिल्या असे तिघेच तयार झाले. पहाटे निघालो. त्या दिवशी मला थोडं बरं वाटत नव्हतं, तोंड पण आलेलं होतं. तरीही निघालो. मागच्या वारी पासून म्हणावा असा काही बोध घेतला नव्हता. म्हणजे बॅटरी किंवा पाण्याची बाटली असं काहीही या ही वेळेला बरोबर नव्हतं. सतत डावीकडून उजवीकडे आडवा वारा वहात असल्यामुळे सायकल रस्त्यामधे ढकलली जात होती. सायकल चालवणं अवघड जात होतं. तिच्या मुसक्या बांधून परत परत तिला कडेला आणावं लागत होतं.

चार साडे-चार तास सायकल मारल्यावर मंचर आलं. तिथल्या एस.टी. स्टँडवरच्या कँटीनमधे एक थेंब चाखला तरी १००० व्होल्टचा दणका देणारं पाव-शॅंपल ऑर्डर केलं. मला ते खाणं शक्यच नव्हतं.. इथेच माझा धीर खचला. मी कुठेही काहीही खाऊ शकेन असं वाटत नव्हतं. मी फक्त चहा बिडी मारली आणि परतीचा निर्णय घेतला. मक्या आणि दिल्यानं पुढे जायचं ठरवलं. मी एकटा नंतरचे चार तास सायकल मारत घरी परतलो. ते दोघे त्या दिवशी नाशिकला पोचू शकले नाहीत हे नंतर कळालं. वाटेत एका गावातल्या देवळात रात्रीचे झोपले आणि दुसरे दिवशी पोचले. येताना सायकली बसवर टाकून आले.


====== समाप्त======

Sunday, September 26, 2010

भूतचुंबक

बंड्या वाघ माझा शाळासोबती! आम्ही शाळेत असताना त्याला साप चावला होता. त्याचं असं झालं.. त्याच्या घरात आई-वडील कुणी नव्हतं.. तो एकटाच खेळत होता.. मधेच त्याला काहीतरी बांधायला दोरीची आवश्यकता भासली.. म्हणून तो घरात आला.. तर आतल्या दरवाज्यावरच एक, त्याला हवी होती तशी, दोरी लोंबकळताना दिसली.. क्षणाचाही वेळ न घालवता त्यानं ती धरली आणि ओढली.. त्याच्या दुर्दैवाने तो विषारी साप होता.. सापानं त्याचं काम चोख बजावलं.. त्यावर बंड्याला काय करावं ते सुचेना.. आईला शोधून काढून दवाखान्यात जाई पर्यंत थोडा उशीर झाला.. म्हणजे बंड्याला दवाखान्यातच अ‍ॅडमिट करावं लागलं.. थोडे आधी उपचार झाले असते तर लगेच घरी जाता आलं असतं इतकंच.. अपघात असल्यामुळे ती एक पोलीस केस पण झाली. बंड्या वाचला खरा पण घरच्यांच्या आणि आमच्या तोंडचं पाणी पळवलं त्यानं!

दुसरे दिवशी एका भुक्कड पेपरात चक्क बंड्याच्या मृत्यूची वार्ता छापून आली.. जिचा त्याच्या घरच्यांना काहीच पत्ता नव्हता.. लगेच शाळेला सुट्टी देण्यात आली.. धक्का बसलेल्या अवस्थेत वर्गातली काही मुलं आणि एक दोन मास्तर सुतकी चेहर्‍याने त्याच्या घरी गेले.. घरी फक्त वडील होते त्याचे.. वडलांना वाटले सगळे चौकशीसाठी आले आहेत म्हणून त्यांनी हसत हसत 'अरे वा! या या या' असं म्हंटलं.. लोकांना विचित्र वाटायला लागलं.. एव्हढा स्वतःचा मुलगा गेला आणि हा माणूस सरळ हसतोय? बहुतेक एकुलता एक मुलगा गेल्यामुळे त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय असं सगळ्यांना वाटलं आणि परिस्थिती आणखीनच विचित्र झाली.. कसंबसं चाचरत चाचरत एका मास्तराने 'अं अं अं, मि. वाघ... बंडू असा अचानक गेला.. तुमच्या.....' वगैरे बोलायला सुरुवात केली. पण वडिलांनी त्यांना मधेच तोडून 'बंडू कुठे गेला? तो तर दवाखान्यात आहे. उद्या घरी येईल.' असं सांगितल्यावर आमची खात्रीच झाली की वडिलांच्या डोक्यावर नक्की परिणाम झालाय.. असा बराच सनसनाटी गोंधळ झाल्यावर कुणीतरी दवाखान्यात त्याला बघायला जायची आयडिया टाकली आणि खरी परिस्थिती समोर आली.

असा हा बंड्या वाघ एक अद्भुत भूतचुंबक आहे. तुम्ही भूतचुंबक हा शब्द ऐकला आहे का? नसेलच ऐकला! कसा ऐकणार म्हणा कारण मी तो आत्ताच तयार केलाय! मी तो लोहचुंबक किंवा कवडीचुंबक असल्या शब्दावरूनच बनवला आहे. तर, लोहचुंबका भोवती जसे एक अदृश्य चुंबकीय क्षेत्र असते ज्यामुळे आजुबाजूचे लोह त्याच्याकडे खेचले जाते तसेच भूतचुंबका भोवतीही एक अभूतपूर्व चुंबकीय क्षेत्र असते ज्यामुळे आजुबाजूची भुतं आकर्षित होतात. फरक इतकाच आहे की यातली ही भुतं ही भूतदया शब्दातली 'मुकी बिचारी कुणी हाका' टाईप भुतं असतात.

तर अशा कुठल्याही भुताला आकर्षित करण्याचा बंड्यात एक अंगभूत गुण आहे. सगळं छान चाललेलं असताना, आजुबाजूचा एखादा प्राणी मुद्दाम वाट वाकडी करून त्याला आडवा जाणार! मांजरं तर हमखास! तो दिसला की कुंपणावरचे सरडे जमिनीशी ४५ अंशाचा कोन करून, गळ्यातल्या गळ्यात धापा टाकत, रंग न बदलता एखाद्या मानवंदना देणार्‍या सैनिकाप्रमाणे समोर निश्चल बघत रहातात. कुत्रीही जवळ येऊन वास घेतल्याशिवाय पुढे जात नाहीत.. अगदी पिसाळलेली देखील. मी त्याच्या बरोबर असलो आणि एखादं कुत्रं दिसलंच तर माझी अवस्था रस्त्याच्या कडेच्या खांबासारखी होते. पक्ष्यांना तर त्याचं डोकं वरून टॉयलेट सारखं दिसतं की काय कुणास ठाऊक!

एकदा आम्ही दोघं कँटीनला, आमच्या पोटातल्या कावळ्यांची शांत करण्यासाठी, जात असताना एका कावळ्यानं त्याच्या डोक्याच्या दिशेने झडप मारली.. त्याच्याही पोटात कावळेच ओरडत होते की काय माहीत नाही.. नशिबानं समोरून झडप मारली म्हणून बरं.. कावळा त्याला दिसला तरी.. त्यानं त्याला कसंबसं चुकवून मागं वळून पाहिलं.. तर त्याला तो कावळा यू टर्न मारून परत हल्ला करण्याच्या तयारीत दिसला.. मग विमानातून गुंड कसे जमिनीवरील एकट्या हिरोच्या मागे लागतात तशा धर्तीवर काही हल्ले झाले.. बाजुच्या पोरांनी आरडाओरडा केल्यावर कावळा पळून गेला आणि बंड्या काकबळी होता होता वाचला. आपल्या घरट्यातलं पिल्लू आपलं नसून कोकीळेचं आहे असा कावळ्याला साक्षात्कार होतो तेव्हा चिडून जाऊन तो असे हल्ले करतो म्हणे! आपल्या बिनडोकपणाचं खापर आपल्याशी दुरान्वयानेही संबंधित नसलेल्यांवर फोडणे ही फक्त माणसाचीच मक्तेदारी नाहीये हे मी त्यातून काढलेलं एक गाळीव रत्न!

कॉलेजात बंड्या स्कॉलर म्हणून प्रसिद्ध झाला होता. त्या प्रसिद्धीला या काकभरार्‍यांमुळे जरा नजर लागली. तो येताना दिसला की काव काव करून काव आणण्याचे प्रकार सुरू झाले. तरी बंड्या शांत होता. त्याला माहिती होतं की परीक्षा जवळ आल्या की हेच सगळे कावळे त्याला गूळ लावायला येणार आहेत.. अगदी मुली पण! मुली तर इतक्या घोळात घ्यायचा प्रयत्न करायच्या की सगळ्याच त्याच्या प्रेमात पडल्या आहेत असं लोकांना वाटावं.. त्यानंही स्वतःचा एक दोन वेळा तसा गैरसमज करून घेऊन प्रेमभंगाचे एकतर्फी झटके खाल्ले होते.. नाही असं नाही. पण आता तो मुलींच गोड बोलणं व्यवस्थित गाळून ऐकायला शिकला होता.

वास्तविक, त्याच्या सगळ्या प्रेमभंगांचं मूळ मुली नव्हत्या. एका प्रेमभंगाला एक 'भूत' पण कारणी'भूत' झालं होतं. तेव्हा त्याची शीला बरोबर पिक्चरला जायची पहिली वहिली डेट ठरली होती.. थेटरवरच भेटणार होते ते. थेटरकडे जायच्या वेळेला आईने त्याला पोस्टात एक पत्र टाकायला सांगीतलं. जवळच्या पेटीत पत्र टाकल्यावर त्याला ते पेटीच्या तोंडात अडकून पडलेलं दिसलं म्हणून जरा आत हात घालून ढकलणार.. तो.. आत बसलेल्या विंचवाची ब्रह्मानंदी लागलेली टाळी भंग झाली आणि त्यानं एक प्रेमळ दंश केला. ठो ठो बोंबलत हात बाहेर खेचल्या बरोबर विंचूही बाहेर आला. आपल्याला 'ते' जालीम प्रकरण चावलंय हे पाहून बंड्या वाघ पाठीमागे लागल्यासारखा धावत डॉक्टरकडे गेला. मोबाईलचा जमाना नसल्यामुळे औषधपाणी, मलमपट्टी होईपर्यंत तिकडे शीलाची कोनशीला झाली आणि नंतर बंड्याला शीला नामक इंगळी पण डसली. बंड्यानं खरं कारण सांगायचा प्रयत्न केला पण तिचा विश्वास बसला नाही.. आफ्टरॉल, विंचू चावणं हे डास चावण्याइतकं काही कॉमन नाहीये हो!

पण जस्सीची गोष्ट वेगळी होती. ती त्याच्या प्रेमाच्या दलदलीत रुतत चालली होती. कॉलेज क्वीन जस्सी म्हणजे पोरांच्या भाषेत एक 'सामान' होती. कॉलेजच्या पोरांमधे जस्सी प्रश्न काश्मीर प्रश्नापेक्षा जास्त चिघळलेला होता. पोरांची हृदयं पायदळी तुडवत ती कॉलेजला आली की सगळे जण 'शब्द एक पुरे जस्सीचा, वर्षाव पडो मरणाचा' या आकांताने तिच्याशी काहीबाही बोलायचा प्रयत्न करीत असत. पण जस्सीची नजर बंड्याचा शोध घेत भिरभिरायची. तो दिसला की त्याच्याशी काही तरी कारण काढून बोलल्याशिवाय ती त्याला सोडत नसे. पण बंड्या जस्सी सारखी लस्सी देखील फुंकून फुंकूनच प्यायचा. इतकंच काय, पण ती दिसली तर त्याची तिला चुकवायची धडपड चालायची.

पण परमेश्वराची लीला कशी अगाध असते पहा.. अजून एका प्राण्यानं वाट वाकडी केली आणि बंड्याच्या आणि जस्सीच्या प्रेमाचा मार्ग सरळ झाला. त्याचं असं झालं.. बंड्या सायकल वरून कॉलेजला येत होता. जवळच्या फुटपाथ वरून जस्सी कॉलेज कडेच निघालेली होती. बंड्याचं तिच्याकडे लक्ष नव्हतं. तो त्याच्याच तंद्रीत होता. इतक्यात समोरून एक उधळलेली म्हैस सुसाट वेगाने त्याच्याच रोखाने पळत येताना दिसली. तिला चुकवायला म्हणून बंड्यानं सायकल पटकन फुटपाथकडे वळवायचा प्रयत्न केला. पण तितका वेळ मिळाला नाही. म्हशीच्या धडकेनं सायकलच्या दोन्ही चाकाचे द्रोण झाले. बंड्याला खूप लागलं, शिवाय एका पायाचं हाड मोडलं.. त्याला काही सुधरत नव्हतं.. म्हशीच्या भीमटोल्यामुळे आजुबाजूला एकच गलका झाला. लोकांचा त्याच्या भोवती गराडा पडला.. जस्सी मधे घुसून त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करत होती.. 'बंडू! बंडू!'.. तिच्याकडे त्याचं लक्ष गेल्यावर तो 'म्हैस! म्हैस!' ओरडला.. लोक घाबरून भराभरा बाजूला झाले.. जस्सीचं त्यांच्याकडे लक्ष नव्हतं.. तिला खरं तर 'बंडू! बंडू! तुम ठीक तो हो ना?' असं काहीतरी विचारायचं होतं.. पण तिची 'बंडू! बंडू!' याच्या पलीकडे गाडी जात नव्हती.. आणि बंडूची 'म्हैस! म्हैस!' या पलीकडे! त्यांच ते 'बंडू! बंडू!.. म्हैस! म्हैस!' ऐकून ती म्हैस पण जबड्यातल्या जबड्यात खिंकाळली असती. शेवटी त्याला लोकांनी उचलून परस्पर हॉस्पिटलात नेलं.

पण जस्सीचा असा गोड गैरसमज झाला की बंड्यांनं केवळ तिला वाचवायला सायकल मधे घातली.. कारण तिनं त्या दिवशी लाल रंगाचा टॉप घातला होता म्हणून त्या म्हशीला 'घेतलं शिंगावर'चा प्रयोग तिच्यावर करायला ते एक आमंत्रण होतं.. आता तिच्या प्रेमाचा दाब ४४० व्होल्टच्या पलीकडे गेला.. तिला त्याच्या शिवाय काही सुचेना.. कुठल्याही म्हशीच्या चेहर्‍याऐवजी बंड्याची छबी दिसायची.. म्हशीच्या काळ्याभोर डोळ्यातून बंड्या तिच्याकडे प्रेमाने बघतोय आणि म्हणतोय.. 'जस्सी! जस्सी!'. बंड्याच्या आठवणी अशा सारख्या दाटून यायच्या. तिचं कशातच लक्ष लागेना. ती नित्यनेमाने दवाखान्यात रोज त्याच्या चौकशीला जायची. दवाखान्यातून तो घरी गेल्यावर घरीही जायला लागली. बाकीचे मित्रमैत्रिणी पण यायचे पण जस्सीसारखे रोज नाही.. ते बंड्याच्याही लक्षात आलं आणि तो तिच्या येण्याची आतुरतेने वाट पाहू लागला. आणि मग त्याच्या लक्षात आलं 'जस्सी जैसी कोई नहीं!'

म्हशीनं बंड्याला दिलेल्या अनपेक्षित 'कलाटणी'मुळे ती दोघं प्रेमात पडल्यानंतर त्यांनी एकत्र सिनेमाला जाणं काही अनपेक्षित नव्हतं. ते जुवेल थीफ बघायला गेले.. तनुजा देवानंदला पटवायचा प्रयत्न करत असते तो सीन चालू होता आणि बंड्याच्या हातावर जस्सीनं हात ठेवला.. किंवा बंड्याला तरी तसं वाटलं.. तो सुखावला.. 'रात अकेली है, बुझ गये दिये' तनुजाचं गाणं सुरू झालं आणि बंड्याला कळेना की जस्सीचा हात इतका खरखरीत कसा? अंधारात त्यानं डोळे ताणून ताणून पाहीलं तर त्याला त्याच्या हातावर एक मोठी घूस बसलेली दिसली. त्यानं घाबरून हात झटकला आणि ती जस्सीच्या मांडीवर पडली... 'आके मेरे पास, कानोमें मेरे.... अ‍ॅssssssss'.. आशाच्या मादक आवाजामुळे मोरपीस फिरल्यासारखे वाटतंय न वाटतंय तोच जस्सीच्या थिएटरभेदी किंकाळीमुळे रोंगटे खडे हो गये! ती उठून उभी राहिली आणि तिनं अंगावरचं धूड उचलून फेकलं ते पुढच्या रांगेतल्या कुण्या बाईच्या डोक्यावर पडलं. 'अ‍ॅssssssss'.. दुसरी थिएटरभेदी किंकाळी आली. किंकाळ्यांच्या बॅकग्राऊंड वर घुशीची रांगेरांगेतून आगेकूच चालू होती. देवानंद तनुजाला काय करावे कळेना. जस्सी भीतिने चांगलीच थरथरत होती मग सिनेमा अर्धवट टाकून ते निघून आले.

बंडू आणि जस्सी प्रेम प्रकरण आता कॉलेजभर झालं होतं.. कॉलेजचं शेवटचं वर्ष संपत आलं होतं.. त्यांनीही शिक्षण संपल्या संपल्या लग्न करायचा निर्णय घेतला होता. साहजिकच जस्सीच्या बापाला भेटणं आवश्यक होतं. तिचा बाप आर्मीतला एक रिटायर्ड कर्नल होता. त्यांच्या घरी बंड्या गेल्यावर जस्सी बापाला बोलवायला गेली. बंड्या त्यांच्या दिवाणखान्यातल्या वेगवेगळ्या बंदुकींचं निरीक्षण करत होता.

मागून अचानक बापाचा आवाज आला.. 'चल मी तुला पिस्तूल कसं चालवायचं ते शिकवतो'.. हातात पिस्तूल, भरदार पांढरी दाढी, कल्लेदार मिश्या करडा आवाज या सगळ्यांच्या एकत्रित परिणामांमुळे बंड्या थरथरायला लागला. बापानं त्याला बागेत नेलं.. पिस्तुलाचा सेफ्टी कॅच काढल्याशिवाय गोळी उडत नाही ते सांगीतलं.. मग तो कसा काढायचा ते दाखवलं.. एका लांबच्या झाडावर नेम धरून त्यानं गोळी झाडली.. ती बरोब्बर त्यानं सांगितलं होतं तिथं घुसली होती.. बंड्याची थरथर अजूनच वाढली.. मग त्यानं सेफ्टी कॅच लावला आणि पिस्तूल बंड्याच्या कानशीलावर रोखलं.. म्हणाला.. 'घाबरू नकोस. गोळी उडणार नाही'.. बंड्या आता लटलटायला लागला होता.. कानशीलापासून फक्त एक फुटावर मरण उभे होते.. सेफ्टी कॅच लावलेला असताना सुद्धा चुकून गोळी उडाली तर?.. बंड्याला घाम फुटला.. हृदय डेक्कन क्वीनसारखं धडधडत होतं.. बापाने सावकाश ट्रिगर ओढला.. टिक.. गोळी उडाली नाही. बंड्याला हुश्श्श झालं! आता घामाच्या धारा वहात होत्या.. ते सगळं अनावर होऊन शेवटी बंड्या कोसळला.. नंतर तापाने फणफणला.. त्यात तो पिस्तूल, सेफ्टी कॅच, गोळी, ढिश्यांव असलं काहीबाही बरळायचा.

तिच्या बापाला एखादा वाघासारखा मर्द माणूस जावई म्हणून हवा होता.. झाल्या घटने वरून बापाने बंड्या वाघ आहे पण मर्द नाही असा निष्कर्ष काढला आणि लग्नाला साफ नकार दिला! या खेपेला बाप नावाचा प्राणी बंड्याला आडवा आला. पण जस्सीनं पळून जाऊन लग्न करायचं ठरवलं.. आमच्या अजून एका मित्राच्या ओळखीचे भटजी लग्न लावून द्यायला तयार झाले.. जवळच्या दुसर्‍या एका गावातल्या मंदिरात जायचं आणि लग्न करायचं असा प्लॅन ठरला.. ठरल्या प्रमाणे काही मित्रमैत्रिणी, बंड्या, जस्सी, बंड्याचे आई वडील आणि ते भटजी मंदिरात आले.. लग्न सुरू झालं.. बंड्या आणि जस्सी हातात माळा घेऊन उभे होते.. मंगलाष्टकांचा शेवट जवळ आला त्याच वेळेला बंड्याला तिचा बाप येताना दिसला.. त्यानं मानेनेच बाजुच्या मित्रांना खुणावलं.. भटजी आता शेवटचं 'शुभमंगल सावधान!' म्हणणार इतक्यात बंड्याच्या पँटिच्या आतमधे मांडीपाशी काहीतरी खसफसलं.. बंड्यानं हार टाकला आणि एका हातानं मांडी जवळचा भाग घट्ट धरून सूंबाल्या केला तो थेट मंदिरा बाहेर! जस्सीच्या बापामुळे त्याचा धीर खचला असं काहींच मत होतं.. तर 'शुभमंगल सावधान!' ऐकताच पळ काढणारा बंड्या हा रामदासांचा आधुनिक अवतार आहे असं काहींच! तिकडे बंड्या धावत धावत एका झाडामागे गेला.. मागे मित्र होतेच.. बंड्यानं घाईघाईने पँट काढली आणि झटकली.. त्यातून एक पाल बाहेर पडली.. बंड्या पँट चढवून परत आला.. त्याची आणि तिच्या बापाची नजरानजर झाली.. बंड्याच्या चेहर्‍यावर चिंतेचं जाळं पसरलं.. ते पाहून 'डोंट वरी! मै तुम्हे आशीर्वाद देने आया हूं!' असं बाप म्हणाला आणि सगळ्यांचच टेन्शन गेलं.. नंतर लग्न यथासांग पार पडलं.

अजूनही बंड्याच्या आयुष्यात भुतं लुडबुडत असतात.. लेकिन वो किस्से फिर कभी!

== समाप्त ==

Wednesday, September 1, 2010

ऐका हो ऐका!

दिल्या: 'अरे मक्या! काय झालं? इतका काय विचार करतोयस?'.. कधी नव्हे ते भरलेल्या साप्ताहिक सभेत विचारमग्न मक्या डोक्याला हात लावून शून्यात बघत बसलेला होता.. हो. बरेच दिवसांनी आमच्या साप्ताहिक सभेचा कोरम फुल्ल होता.. म्हणजे सगळ्या बायका आलेल्या होत्या.. कधी नव्हे ते तिघींना टीव्हीवर कुठलीही मालिका बघायची नव्हती.. कुठेही नवीन सेल लागलेला नसल्यामुळे आणि चालू सेलना भेटी देऊन झालेल्या असल्यामुळे शॉपिंगला जायचं नव्हतं.. 'हसून हसून पोट दुखायला लागेल' अशी जाहिरात केलेलं कुठलंही विनोदी नाटक कम सर्कस बघायची नव्हती... आणि कुठल्याही गोssड हिरोचा पिक्चर लागलेला नव्हता.

मी: 'माया! तू ह्याला तुझ्या जडीबुटीतलं काय उगाळून दिलंस?'.. मी मायाच्या आयुर्वेदिक पदवीवर थोडे शिंतोडे उडवून वातावरणात जान आणायचा प्रयत्न केला.

माया: 'माझी कुठलिही मात्रा त्याच्यावर चालत नाही!'

मक्या: 'अरे बाबा! आम्ही एक नवीन पॅकेज तयार केलंय.. डॉक्टरांसाठी. छोट्या मोठ्या दवाखान्यातनं जे पेशंट येतात ना.. त्यांच्या अपॉइंटमेंटच्या नोंदी.. त्यांची मेडिकल हिस्टरी.. त्यांच्या टेस्टचे निकाल.. त्यांना वेळोवेळी लावलेले पैसे.. त्यांना दिलेली प्रिस्क्रिप्शन्स.. असं सगळं त्यात ठेवता येतं. ते त्या डॉक्टरांना उपयोगी पडेल खूप!'

दिल्या: 'हो पडेल ना! मग त्यात तू विचार करण्यासारखं काय आहे? मायाला दवाखाना घेऊन देतो आहेस काय?'

मक्या: 'अरे बॉस मलाच त्याचं मार्केटिंग बघायला सांगतोय'

मी: "त्यात काय विशेष आहे? एक हातगाडी घे, त्यावर तुझ्या पॅकेजच्या सीड्या टाक आणि भंगारवाल्यासारखं गल्लीबोळातून ओरडत फिर 'एss! पॅकेजवालेssय!'".. माझ्या ओरडण्यामुळं बाजुच्या लोकांना खरच भंगारवाला आल्याचा संशय आला.

दिल्या: 'तू मार्केटिंग बघायचं हे कुणाचं मेंदुबालक?'.. मेंदुबालक म्हणजे ब्रेनचाईल्ड हे कळायला मला जरासा वेळच लागला.. आम्ही पूर्वी केलेल्या मराठवळण्याच्या रेट्याचे दणके असे अधून मधून आम्हालाच बसतात.

मक्या: 'आरे! आमचा मार्केटिंग मॅनेजर सोडून गेला.. आता नवीन शोधतोय.. पण जाता जाता त्यानं बॉसच्या डोक्यात 'तोपर्यंत मी मार्केटिंग करू शकेन' असं घुसवलं. त्याच्या मते ते माझ्या रक्तात आहे.'

माया: 'काही रक्तात वगैरे नाहीय्ये हां! तो मार्केट मधून भाजी आणण्याला मार्केटिंग म्हणायचा'.. मायाला सात्विक का कसला तरी संताप आलेला दिसला.. बहुतेक कौटुंबिक असावा.

सरिता: 'ए! पण ते भंगारवाल्यासारखं ओरडत फिरणं हे त्याच्या प्रतिष्ठेला शोभणारं नाही हां!'

माया: 'प्रतिष्ठा?'.. मायाच्या सूचक नजरेत त्यांच्यातल्या ताज्या भांडणाचे पडसाद असावेत असं मला वाटून गेलं.

दिल्या: 'रिक्षातून ओरडत फिरणं जास्त प्रतिष्ठेचं वाटेल का? हे चित्र कसं वाटतंय?.. रिक्षाच्या दोन्ही बाजुला पोस्टरं लावलेली आहेत.. आणि एक लाउडस्पीकर.. मक्या ड्रायव्हर शेजारी अंग चोरून बसलेला आहे.. रिक्षाच्या मागनं दोन चार उघडी नागडी पोरं नाचत चाल्लीयत.. आणि मक्या ओरडतोय
ऐका हो ऐका!
समस्त डाक्टरान्नो ऐका!
तुमच्यासाठी आणलंय हे
खास पॅकेज बर्का!'.

दिल्याच्या सचित्र वर्णनामुळे मक्या सैल झाला, त्याचा डोक्यावरचा हात निघाला, मिशीतल्या मिशीत हसत तो म्हणाला -

मक्या: 'आयला! काय धमाल येईल ना? सुरुवात माझ्या बॉसच्या घरापासनंच करतो.'

मी: 'म्हणजे तुझ्या रक्तातलं मार्केटिंग बघून रक्तदाब वाढायचा त्याचा!'

माया: 'नको. नको. त्याच गल्लीत माझं माहेर आहे. मक्याच्या डोक्यावर परिणाम झाला म्हणून आईचा रक्तदाब वाढेल नक्की.'

सरिता: 'म्हणजे? अजून कल्पना नाही त्यांना?'

दिल्या: 'कल्पना...... मला आहे.'.. आम्हाला गरीब विनोद कळत नाहीत असं दिल्याला वाटलं की काय कुणास ठाऊक! पण त्यानं आपल्या बायकोकडे, कल्पनाकडे, बोट दाखवलं.

मक्या: 'पण मला या टीव्हीवरच्या जाहिराती लोकांवर नक्की कशा परिणाम करतात त्याची खरच माहिती काढायचीय. एखादी जाहिरात द्यावी असा विचार चाल्लाय माझा.'

कल्पना: 'ते मी सांगू शकेन. मी अभ्यास केलाय त्याचा.'.. कल्पनेला एकदाच तोंड फुटलं.

मक्या: 'मग सांग ना!'

कल्पना: 'जाहिरातींची बरीच तंत्र आहेत. काही जाहिरातीत अतिशयोक्तीचं तंत्र वापरतात. तुम्हाला काय सांगायचंय त्याचीच अतिशयोक्ती करायची'.

सरिता: 'म्हणजे?'

कल्पना: 'म्हणजे असं बघ.. एखादी वॉशिंग पावडरची जाहिरात घे.. चिखलाचे डाग पडलेले पोरांचे कपडे हातात घेऊन एक सुबक गृहिणी हे डाग कसे जाणार अशी चिंता करीत उभी असते..'

दिल्या: 'ती सुबक गृहिणी असते. जाहिरातीतल्या गृहिणी सुबकच असाव्या लागतात'.

सरिता: 'ही अतिशयोक्ती आहे?'

कल्पना: 'तू त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस!'

मी: 'आयुष्यात तिला तेवढी एकच चिंता असते.. ती मिटली की तिचं जीवन सुखासमाधानाने कसं फुलून जाणार असतं.. मुलं आनंदातिरेकाने तिला 'मम्मीsss!' म्हणून मिठी मारणार असतात.. बॉसने केलेली धुलाई विसरून नवरा तिच्या धुलाईची(!) प्रशंसा करणार असतो.. सासूच्या पांढर्‍या साडीला ट्यूबच्या प्रकाशाची झळाळी मिळणार असते.. इ.इ.'

दिल्या: 'पण डाग घालवणार कोण? धोब्याला तर कपडे देता येत नाहीत, कारण तो असं गाणं म्हणण्याची शक्यता जास्त...
दाग जो तूने दिया, हमसे मिटाया न गया
हमसे धोया न गया, तुमसे धुलाया न गया'.. दिल्यानं ते 'हमसे आया न गया' च्या चालीवर म्हंटल्यावर आम्ही ओशाळून आजुबाजुला पाहिलं. नेमके सगळे आमच्याचकडे दयार्द्र नजरेने बघत होते.

मी: 'नशीब त्या तलतच! तो हयात असताना ही गाणी म्हंटली असतीस तर उगीच त्या बिचार्‍याच्या पोटावर पाय आला असता.'

सरिता: 'ए! गपा रे! हं! तू सांग गं कल्पना!'

कल्पना: 'अशा सुबक संभ्रमात ती सुबक गृहिणी पडलेली असतानाच अजून एक सुबक उपटसुंभीण कुठलीशी वॉशिंग पावडर घेऊन उपटते आणि बजावते.. बाई गं! तुझ्या सर्व समस्यांच मूळ तू वापरतेस त्या यःकश्चित पावडरमधे आहे. ही पावडर वापर की लगेच डाग साफ'.

दिल्या: 'पावडरवालीच्या साडीतून फुले पडत असतात.. ते पाहून आपण 'फुले का पडती शेजारी?' या विचारात पडतो.. जरा जास्त पैसे मोजले असते तर फुलं न पडणारी चांगली साडी मिळाली असती असही वाटून जातं.. अर्थात् असे प्रश्न फक्त पुरुषांनाच पडतात.. स्त्रियांकडे त्याचं, त्यांच्यामते, अगदी तर्कशुद्ध स्प्ष्टीकरण असतं.'

कल्पना: 'फिरत्या विक्रेत्यांना हाडहुड करून दारातून घालवून देणार्‍या त्या बाईला ती पावडरवाली आपल्या घरात अशी कशी घुसली हा प्रश्न अजिबात पडत नाही.. तरी पण पडत्या फुलाची आज्ञा घेऊन ती त्या पावडरचा वापर अखेर करतेच. मग कपड्यांच्या बोळ्यातून, फसफसणार्‍या सोड्यासारखा, भसभस माती सुटताना दाखवण्याचा सीन हमखास येतोच. वास्तविक, बचकभर चिखलात माखलेले कपडे साध्या पाण्यात घातले तरी माती बाहेर पडतेच याकडे सोयिस्करपणे दुर्लक्ष केलं जातं. प्रेक्षक पहिल्या सुबकिणीच्या चेहर्‍यावरच्या परमोच्च आनंदात विरघळून जातात.'

मी: 'या नंतरचा एक महत्वाचा सीन मुद्दामच कापलेला असतो.. मी म्हणून तुम्हाला सांगतो.. त्या धुण्यात सासरेबुवांचा निळा शर्ट पूर्णपणे पांढरा होतो.. ते पाहिल्याबरोबर त्यांचे डोळेही पांढरे होतात! त्यावर सासुबाई 'निळा काय? पहिल्या पासून पांढराच होता तो' असं ठणकावतात.. त्यामुळे त्यांची कवळीखीळही बसते.'.. ऐनवेळेला दातखीळीला खीळ घालून त्याची कवळीखीळ केल्याचा मलाच आनंद झाला.

माया: 'जाहिरातवाल्यांच एक बरं असतं.. त्यांना त्यांच्या कर्माची फळं भोगायला लागत नाहीत. जाहिरात करणं हे त्यांच कर्म पण फळं गिर्‍हाईकं भोगतात.. त्यांच्या सांगण्याच्या आविर्भावावरून असं वाटतं की ती पावडर वापरून कुठलेही डाग जातील मग ते कपड्यावरचे असोत किंवा चारित्र्यावरचे असोत नाही तर सामानाचे!... नंतर खिसा साफ होण्याचं फळ आणि कळ गिर्‍हाईकं भोगतात.'

कल्पना: 'तर याच्यात त्या पावडरने कुठलाही डाग जातो याची अतिशयोक्ती केली आहे हे तुमच्या सारख्या सुजाण लोकांच्या लक्षात आलेच असेल.'

सरिता: 'हे तू सांगेपर्यंत नव्हतं आलं हं लक्षात!'.. तिच्या खरंच लक्षात आलं नव्हतं की ती गंमत करत होती ते काही कळालं नाही मला.. बायकांच्या बोलण्यावरून नक्की त्यांच्या मनात काय आहे ते फक्त इतर बायकांच जाणे!

मी: 'मला टूथपेस्टच्या जाहिरातीची एक आयडीया आलीये. युवराजसिंग बॅटिंग करतोय.. शोएब बोलिंगला उभा आहे. पहिला बॉल टाकतो तो उसळून धाडकन युवराजच्या थोबाडावर बसतो.. तो हेल्मेटमुळे वाचतो.. पण चिडून युवराज हेल्मेट काढतो आणि परत पाठवून देतो. पुढचा बॉल पण जोरात उसळतो आणि त्याच्या दातावर आपटून फाइनलेगला चौकार बसतो. अंपायर दाताला हात लावून चौकाराची खूण करतो.. बस्स! यानंतर काही बोलायचं नाही.. नुसता कॅमेरा त्या टूथपेस्ट वर मारायचा.'

सरिता: 'म्हणजे काय? माझ्या काही नाही आलं हं लक्षात!'.. दिल्यानं कपाळावर हात मारला. नेहमी तिची बाजू घेणारा तो, पण आज त्याचाही कपाळमोक्ष झाला. मी डोकं आपटायला योग्य भिंतीचा शोध घेऊ लागलो.. त्या हॉटेलात भिंतींना सगळीकडे अणुकुचीदार बांबूचं डिझाईन होतं त्यामुळे घाई घाईने शोध थांबवला. सगळ्याच बायकांचे प्रश्नार्थक चेहेरे बघून शेवटी मक्यानं 'टूथ बाईज' असं सांगीतलं.. तरीही काही सुधरेना म्हंटल्यावर 'लेग बाईज' पासून सुरुवात करून ते गूढ उकलून दिलं.. मग सर्व महिलांनी फार महत्वाची गोष्ट समजल्यासारखा चेहरा केला.

माझ्या आयडीयाची अशी तुफानी वादळात सापडलेल्या डासासारखी झालेली वाताहात बघून मी ती टूथपेस्ट कंपनीला विकायचे बेत रद्द केले. बरोबरच आहे.. कारण, ती जाहिरात कमितकमी ५०% जनतेच्या डोक्यावरून शोएबच्या बंपरसारखी जाणार असेल तर काय उपयोग? आणि दुर्दैवाने नेमकी तीच जनता घरात कुठली वस्तू विकत आणायची याचा निर्णय घेते हो!

कल्पना: 'एखाद्या लोकप्रसिद्ध माणसाला त्या वस्तूबद्दलची स्लोगन बोलायला लावणे, लोकांना एखाद्या गोष्टीची भीति घालून मग विक्रीची वस्तू कशी त्यांना वाचवेल हे ठसवणे अशी पण तंत्रं आहेत.'

दिल्या: 'ए! तंत्रं खूप झाली आता! मक्या आपण तुझी जाहिरातच तयार करू ना त्यापेक्षा!'

माया: 'हां चालेल! पण स्लोगन काय करू या?'

कल्पना: 'पॅकेजचं नाव काय आहे रे?'

मक्या: 'अजून ठरलेलं नाही!'

दिल्या: 'असे कसे रे तुम्ही नाव न ठेवता पॅकेज विकायला काढता? बारसं व्हायच्या आधीच लग्न झाल्यासारखं वाटतं.'

सरिता: 'चला आपण नाव पण ठरवू या.'

माया: 'क्लिनीसॉफ्ट कसंय?'

मक्या: 'श्या! ते नॅपीचं नाव वाटतं अगदी! त्यापेक्षा मेड-एड बरं आहे. सध्या तेच घेऊन चालू.'

कल्पना: 'हे कसं वाटतंय? दवाखान्यातल्या एका रिसेप्शनिस्ट भोवती १७६० पेशंट गोळा झालेत. एक अपॉइन्टमेन्ट मागतोय, एक बिल मागतोय, एक टेस्ट रिझल्ट मागतोय... असा सगळा सावळा गोंधळ आहे. तिकडे ती रिसेप्शनिस्ट प्रचंड बावरली आहे. ती एकाची रिसीट दुसर्‍याला, दुसर्‍याचा रिझल्ट तिसर्‍याला असं करून अजून भर घालतेय.. पेशंटांच्या चेहर्‍यांवर वैताग स्पष्ट दिसतो आहे.. त्यामुळे तिच्या डोक्यातून धूरच यायचा बाकी आहे फक्त! शेवटी, पुढचा पेशंट बराच वेळ आत नाही आला म्हणून डॉक्टर बाहेर येतात आणि समोरचं दृश्य पाहून हतबुद्ध होतात.'

दिल्या: 'रिसेप्शनिस्ट सुबक पाहीजे. बाहेर येणारा डॉक्टर नको. ती डॉक्टरीण पाहीजे.. आणि सुबक पण.'

कल्पना: 'अरे हो रे! तू आधी तुझी सुबक सुबक ही बकबक थांबव बरं जरा! हां! तर तो डॉक्टर बधीर होऊन स्वतःच अपॉइन्टमेन्टची वही घेऊन पुढचा पेशंट कोण आहे ते बघायला लागतो.. पण ते त्याला नीट समजत नाही.. कारण काही नाव खोडलेली असतात, तर काही नावांच्या पुढे वर खाली जाणारे बाण असतात.. शिवाय तिचं अक्षर त्याला समजत नाही.'

माया: 'हा हा! खुद्द डॉक्टरला दुसर्‍याचं अक्षर समजत नाही हे मस्त वाटेल बघायला.'

सरिता: 'तेव्हढ्यात त्याचा दुसरा डॉक्टर मित्र येतो. आणि त्याला मेडएड वापरायला सांगतो. लगेच पुढच्या सीनमधे एकदम आमूलाग्र बदल दाखवायचा. तीच खोली पेशंटांनी गच्च भरलेली आहे.. पण सारं कसं शिस्तीत चाललं आहे.. कुठेही गडबड गोंधळ नाही.. एक भयाण शांतता आहे.. स्मशानात असावी इतकी.. '

मी: 'मघाची ती धूर उडवणारी रिसेप्शनिस्ट आता स्मितहास्य फेकताना दाखवायची. तिला आता भरपूर वेळ आहे.. तिला एका छोट्या आरशात बघून मेकप करताना दाखवलं की झालं.'

सरिता: 'मग डॉक्टरच्या खोलीत कॅमेरा.. तो कंप्यूटरवर काही तरी टायपतोय. ते अर्थातच मेडएड पॅकेज असतं. मग डॉक्टर अत्यंत आनंदी चेहर्‍यानं म्हणतो 'मेडएडने होत आहे रे आधी मेडएडची पाहीजे'. ही स्लोगन कशी आहे?'

मक्या: 'किंवा.. तो डॉक्टर आणि त्याची बायको मस्त बीचवर फिरताहेत.. त्याची बायको म्हणते मेडएड ब्रिंग्ज पीपल टुगेदर'.

दिल्या: 'आता पेशंटांच्या चेहर्‍यांवर पराकोटीचं समाधान नांदतय.. जसे काही ते सदेह वैकुंठाला चालले आहेत... त्यातला एक म्हणतो.. उरलो उपचारापुरता'.

माया: 'ही मस्त आहे रे दिल्या!'

मक्या: 'ठीक आहे! मला चांगल्या आयडिया मिळाल्या आहेत सध्या पुरत्या! पुढचा महीनाभर ते पॅकेज खूप डॉक्टरांना दाखवायचं आहे. मग त्यांच मत कळेल. त्यानंतर जाहिरातीचं फायनल करणार आहोत. तर आता एकदम महीन्या नंतर भेटू'.

नेहमी प्रमाणे बराच उशीर झाला होता. सगळे ताबडतोब जे पांगले ते एकदम महीन्यानंतर मक्या आल्यावर भेटले. मक्याचा चेहरा आजही विचारमग्न दिसत होता. आजही कोरम फुल्ल होता.. आजही कुठली मालिका, सेल, नाटक सिनेमा असलं काही आड आलं नव्हतं. दिल्यानं तोंड फोडलं..

दिल्या: 'आज काय झालं रे? नवीन मार्केटिंग मॅनेजर घेतला का?'

मक्या: 'नाही रे! ते पॅकेज इतक्या डॉक्टरांना दाखवलं पण कुणालाच आवडलं नाही'

सगळे: 'व्हॉsssट?'

मक्या: 'अरे त्यात सगळं अकाउटिंग पण आहे ना, ते नकोय कुणालाच.'

दिल्या: 'आयला! खरंच की रे! त्यांचा सगळा कॅशचा व्यवहार असतो नाही का! हम्म्म! ते सोडून बाकीचं वापरा म्हणावं'.

मक्या: 'अकाउटिंग काढलं तर फार मोठा फायदा होणार नाही ते वापरून. आता माझ्यावरच 'उरलो उपचारापुरता' म्हणायची वेळ आलीय.'

मी: 'आता नक्कीच तुला त्या सीड्या हातगाडीवर टाकून 'एss! पॅकेजवालेssय!' ओरडत फिरायला पाहीजे.'


== समाप्त ==

Monday, August 23, 2010

रिचर्ड फाइनमन

"मी घरी जातोय!" आपल्या ऑफिसमधून बाहेर डोकावून फाइनमनने आपल्या सेक्रेटरीला, हेलन टक ला, सांगीतलं. पण घरी जाण्यासाठी ऑफिसातून बाहेर पडायच्या ऐवजी शर्ट काढत काढत स्वारी परत ऑफिसात गेली. हेलन चक्रावली. थोड्या वेळाने दबकत दबकत तिनं त्याच्या ऑफिसात डोकावलं तर स्वारी शांतपणे कोचावर पहुडली होती. गेले काही दिवस त्याचं हे असं वेड्यासारखं चाललं होतं.. कधी तो लेक्चरला जायचं विसरायचा, तर कधी त्याला आपली पार्किंगमधे ठेवलेली गाडी सापडायची नाही!

हे सगळं तो एकदा घरा शेजारच्या फुटपाथला अडखळून डोक्यावर पडल्यामुळे आणि त्याने त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे झालं होतं. डोक्याच्या आत थोडा रक्तस्त्राव झाल्यामुळे त्याला आजुबाजुची किंवा स्थलकालाची जाणीव राहिली नव्हती आणि आपण काय करतोय हेही त्याला उमगत नव्हतं. शेवटी त्याला डॉक्टरकडे नेल्यावर हे सगळं बाहेर आलं आणि त्याच्यासकट इतरांनाही समजलं.

"मला का नाही कुणी सांगीतलं?".. फाइनमनने त्याच्या एका जवळच्या मित्राकडे त्याबद्दल विचारणा केली. मित्र म्हणाला - "ओ कमॉन! तुला कोण सांगणार? तू बर्‍याच वेळेला असं वेड्यासारखं करतोस! तसं बघायला गेलं तर अफाट बुध्दिमत्ता आणि वेड यातला फरक जरा सूक्ष्मच असतो."

"हे बघ! पुढच्या वेळेला मी असलं काही करायला लागलो तर ताबडतोब मला सांगायचं".. फाइनमनने त्याला खडसावून प्रकरण तिथे संपवलं.

बाकी अत्यंत बुद्धिमान शास्त्रज्ञांबद्दल आपला असा समज असतो की ते आपल्याच तंद्रीत असतात.. त्यांना आजुबाजूला काय चाललंय याची जाणीव नसते.. ते स्वतःशीच बोलतात.. अत्यंत विसराळू असतात.. काहीही कपडे घालतात.. इ. इ. मात्र, वरचा किस्सा वगळता, फाइनमन यातल्या बर्‍याच गोष्टींना अपवाद होता.

फाइनमनला १९६५ सालचा पदार्थविज्ञान शास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार मिळालेला होता. त्यावेळचा पुरस्कार टोमोनागा, श्विंगर आणि फाइनमन या ३ शास्त्रज्ञांमधे विभागला होता. तिघांनीही वेगवेगळ्या पद्धतीने इलेक्ट्रॉन, प्रोटॉन असे विद्युत भारित कण आणि फोटॉन हे एकमेकांच्या संपर्कात आल्यावर काय काय होऊ शकेल ही एकच मूलभूत समस्या (क्वांटम इलेक्ट्रोडायनॅमिक्स) सोडविण्याचं शास्त्र निर्माण केलं होतं. अशा समस्या अनेक ठिकाणी निर्माण होतात. उदा. एखाद्या वायूवर एक्स-रेज पडले तर काय काय होईल? अशी एखादी विशिष्ट समस्या तिघांच्या पद्धतीने हाताळली तरीही एकच उत्तर येतं म्हणून तर तो पुरस्कार तिघांना विभागून मिळाला. यात अत्यंत क्लिष्ट आणि गुंतागुंतीची अनेक इंटिग्रल्स येतात. पण फाइनमनचे वैशिष्ट्य असं की त्याने, प्रत्येक इंटिग्रल प्रत्यक्षात कणांची काय घडामोड दाखवतेय हे आकृतीने कसे दर्शविता येईल हे सुचवले. किचकट इंटिग्रल्सपेक्षा त्या आकृत्या काढणं, त्यावर चर्चा करणं आणि नंतर त्यावरून गरज पडेल तेव्हा प्रत्यक्ष इंटिग्रल लिहीणं हे फार सोप्प झालं.. त्यामुळेच त्या आकृत्यांना सगळ्यांनी डोक्यावर घेतलं. त्या आकृत्या फाइनमन डायग्रॅम्स म्हणून प्रसिद्ध आहेत.. इतक्या की नंतर जेव्हा फाइनमनच्या सन्मानार्थ पोस्टाचं तिकीट काढलं तेव्हा पोस्टाला सुद्धा ते त्या आकृत्यां शिवाय अपूर्ण वाटलं.

ज्यांना फाइनमन ऐकूनही माहीत नाही ते म्हणतील फाइनमनमधे विशेष असं काय आहे? इतर अनेक नोबेल विजेत्यांसारखा हा अजून एक! हे खरं असलं तरी त्याचं कर्तृत्व इथेच संपत नाही. तो प्रथम एक प्रामाणिक, निर्भीड, हसतमुख, आनंदी, कलंदर, मिष्कील, विद्यार्थ्यांवर प्रेम करणारा, दुसर्‍यांना मदत करणारा, चतुरस्त्र, गप्पिष्ट आणि चौकस असा एक दुर्मिळ माणूस होता.. आणि या सगळ्या नंतर एक नोबेल विजेता होता. त्याच कारणामुळे त्याच्यावर लोकांनी प्रचंड प्रेम केलं, अजूनही करतात.. त्याला वाहिलेली साईट पाहिली तर ते लगेच पटेल (साईटचा दुवा लेखाच्या शेवटी दिला आहे(४)).

त्याच्या अनौपचारिक गप्पांच्या ध्वनीफितीवरून 'शुअर्ली यू आर जोकिंग, मि. फाइनमन' आणि 'व्हॉट डू यू केअर व्हॉट अदर पीपल थिंक?' ही पुस्तकं लिहीली गेली. त्यातलं 'शुअर्ली..' हे पुस्तक खूप गाजलं आणि आत्तापर्यंत त्याच्या ५ लाखांवर प्रती खपल्या आहेत. त्या पुस्तकाच्या पीडीएफचा दुवा लेखाच्या शेवटी दिला आहे(३). दुर्देवाने या पीडीएफ मधे काही टायपो आहेत.. बर्‍याच ठिकाणी 'b' ऐवजी 'h' पडलं आहे त्याचा वाचताना फार त्रास होतो. पण एक साधासुधा मध्यमवर्गीय माणूस आपल्याशी हास्यविनोद करत गप्पा मारतोय असं वाटावं इतकी सहज आणि अनौपचारिक शैली या पुस्तकाची आहे. काही प्रकरणांमधे थोडी फार पदार्थविज्ञानासंबंधी चर्चा येते, ती काही जणांना समजणार नाही कदाचित! पण तो भाग सोडून पुढे वाचत राहीलं तरी मजा कमी होत नाही.

फाइनमनचा जन्म १९१८ मधे झाला. १९३५ ते १९३९ एम आय टी मधे शिकल्यावर तो प्रिन्स्टन मधे १९४३ पर्यंत पुढील शिक्षणासाठी प्रो. व्हीलर बरोबर काम करत होता. एक दिवस व्हीलरने फाइनमनला त्या कामाबद्दल सेमिनार घ्यायला सांगीतलं. ते त्याचं पहिलं वहिलं सेमिनार! जाहीर झाल्यावर खुद्द आइन्स्टाईनने ते ऐकायला येणार असल्याचं कळवलं. ते ऐकल्यावर मात्र त्याचं जे धाबं दणाणायला सुरूवात झाली ते सेमिनार संपेपर्यंत कसं दणाणत राहीलं त्याचं एक मस्त वर्णन 'शुअर्ली..' मधे आहे. त्यानंतर १९४६ पर्यंत तो अ‍ॅटमबाँब बनविण्याच्या कामात गुंतला. बाँब बनविल्यानंतर तो कॉर्नेल मधे प्रोफेसर म्हणून रुजू झाला. मग १९५१ पासून तो कॅल्टेकमधे त्याच्या मृत्युपर्यंत, १९८८ पर्यंत, राहीला! २८ जानेवारी १९८६ ला चॅलेंजर हे अवकाश यान उड्डाणाच्या वेळेस जळून भस्मसात झाले.. आतल्या सर्व अंतराळवीरांसकट! प्रेसिडेंटने नेमलेल्या या अपघाताच्या चौकशी समितीत फाइनमन होता. सत्यपरिस्थिती समजण्यासाठी तो सरळ ज्यांचा यान बांधण्यात प्रत्यक्ष हात होता त्यांच्याकडे गेला.. तसे न करण्याबद्दल दिलेले नासाचे सर्व संकेत धुडकावून! शेवटी तो नासाने यानाच्या सुरक्षिततेमधे केलेली तडजोड कशी अपघातास कारणीभूत झाली ते सिद्ध करण्यात यशस्वी झाला.

त्यानं अनेक पुस्तकं लिहीली आणि त्याच्यावरही अनेक पुस्तकं लिहीली गेली. कितीही किचकट विषय अगदी सोप्पा करून शिकविण्यात त्याचा हातखंडा होता. १९६० च्या सुमारास, कॅल्टेक मधे, पदार्थविज्ञानाचा अभ्यासक्रम बदलायला हवा असा एक विचार प्रवाह सुरू झाला.. पदवी परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम मागासलेला आहे.. त्यात नवीन संशोधनाबद्दल काहीच माहिती नाही.. असं सर्वसामान्य मत होतं. नवीन अभ्यासक्रम तयार करणे आणि त्याप्रमाणे शिकविणे ही जबाबदारी फाइनमन वर सोपविण्यात आली. त्याच्या मदतीला दिलेल्या कॅल्टेकच्या शिक्षकांनी त्याची सर्व लेक्चर्स रेकॉर्ड करून नंतर 'फाइनमन लेक्चर्स ऑन फिजिक्स' या नावाचे ३ ग्रंथ छापले. ते प्रचंड गाजले. अजूनही ते छापले जातात. आत्तापर्यंत त्या ग्रंथांच्या फक्त इंग्रजीतल्या १० लाखांवर प्रती खपल्या आहेत. त्यांची इतर भाषातही भाषांतरे झाली आहेत.

प्रथम अभ्यासक्रमात मूलभूत सुधारणा हवी आहे असं वाटणं आणि नंतर फाइनमन सारख्या एका ख्यातनाम शास्त्रज्ञाकडून नुसता अभ्यासक्रमच नाही तर लेक्चर्ससुद्धा घेण्याची कल्पना येणं हे फक्त शिक्षणाबद्दल प्रचंड तळमळ असणार्‍यांनाच सुचू शकतं. हे सगळं वाचल्यावर, निदान मला तरी, त्या विद्यार्थ्यांचा हेवा वाटतो आणि मग प्रश्न पडतो की.. भारतातली विद्यापीठं कधी जागी होणार?

त्याला शिकविण्यात विलक्षण रस होता. ब्राझिलमधेही त्यानं एक वर्ष शिकवलं. तिथे शिकविताना त्याला जाणवलं की त्या पोरांकडे फक्त पुस्तकी ज्ञान आहे.. ते त्यांना व्यवहारातले प्रश्न सोडवायला वापरता येत नाहीये.. अगदी भारतातल्या शिक्षणासारखंच! पोरं वर्गात प्रश्न विचारत नसत.. इतर पोरं नाव ठेवतील म्हणून. या सगळ्या अडचणीतून मार्ग काढत फाइनमनने अभ्यासक्रम पूर्ण केला. वर्षाच्या शेवटी पोरांनी फाइनमनला त्याला तिथे आलेल्या अनुभवाबद्दल भाषण देण्याची विनंती केली. त्या भाषणाला ब्राझिलच्या सरकारातले शिक्षण तज्ज्ञ आणि कॉलेज मधले शिक्षक पण हजर होते.. अगदी टेक्स्टबुकं लिहीणारे देखील. त्या भाषणात त्यानं ब्राझिलमधल्या अभ्यासक्रमात शास्त्र विषयाचा कसा अभाव आहे हे सोदाहरण स्पष्ट केलं.

त्याच्यापेक्षा सुमारे ९ वर्षांनी लहान असलेली त्याची बहीण जोअ‍ॅन ही पुढे नासाच्या जेट प्रपल्शन लॅबमधे शास्त्रज्ञ झाली. तिच्या आठवणीतली एक गोष्ट फार मजेशीर आहे.. 'रिचर्ड माझा पहिला शिक्षक होता आणि मी त्याची पहिली विद्यार्थिनी! आमच्या घरी एक कुत्रा होता. त्याला आम्ही काही गमती जमती करायला शिकवीत असू. त्याचं शिकणं बघून रिचर्डला वाटलं की मीही काही तरी शिकवायच्या लायकीची आहे. तेव्हा मी तीन एक वर्षांची असेन. तो मला अगदी सोप्प्या बेरजा वजाबाक्या करायला शिकवायचा.. आणि बरोबर उत्तर आलं की बक्षीस म्हणून मला त्याचे केस ओढू द्यायचा.'

लॉस अ‍ॅलामॉस मधे ज्या ठिकाणी बाँब बनविण्याचं काम चालू होतं त्याच्या आजुबाजूला काहीच नव्हतं.. ते मनुष्य वस्तीपासून शक्य तितकं लांब होतं.. ते लोकांपासून गुप्त तर ठेवलं होतंच शिवाय तिथली सुरक्षा व्यवस्थाही अत्यंत कडक होती. तिथे करमणुकीची साधनं फारशी नव्हती. त्या काळात फाइनमनच्या हातात एक बोंगो पडला आणि मग तो बडविण्यात त्याला अपार आनंद मिळायला लागला. हळूहळू त्याला त्याची चटक लागली आणि पुढे लॉस अ‍ॅलामॉस सुटल्यावर देखील त्याचा तो छंद चालू राहीला. ब्राझिल मधे त्यानं त्यांच वाद्य(टँबोरिन) शिकण्यासाठी अपार मेहनतही केली. त्या नंतर, आपल्याकडे कशा गणपती विसर्जनाच्या मिरवणुकी असतात तशा प्रकारच्या, ब्राझिल मधल्या जत्रेमधे त्यानं ते वाजवलं.


वेगवेगळ्या प्रकारची कुलुपं उघडण्याची कलाही त्यानं लॉस अ‍ॅलामॉस मधे असतानाच आत्मसात केली. त्याचा उपयोग मुख्यत्वेकरून लोकांची मदत करण्यासाठी तो करायचा. पण एखाद्या कडक इस्त्रीतल्या जनरलला, तिथल्या सुरक्षेला काही अर्थ कसा नाहीये ते पटविण्यासाठी, त्याच्यासमोर त्याचीच तिजोरी उघडून त्याची झोप उडविण्यासाठीही करायचा.

त्याची चौकस बुद्धी त्याला कधी स्वस्थ बसू द्यायची नाही. प्रिन्स्टनला असताना त्याला मुंग्याबद्दल कुतुहल निर्माण झालं.. त्यांचं अन्न त्या कशा शोधतात? त्यांना अन्नासाठी कुठे जायला पाहीजे हे कसं समजतं? इ. इ. त्यासाठी मग त्याचे त्याच्या खोलीत येणार्‍या मुंग्यांवर प्रयोग सुरू झाले. त्यातून त्याने काही निष्कर्ष काढले.. मुंग्या चालताना रस्त्यात एक प्रकारचा द्रव सोडतात ज्याचा वास मुंग्यांना येतो आणि त्यामुळे इतर मुंग्यांना तोच रस्ता चोखाळता येतो. हा द्रव वाळायला सुमारे अर्धा तास लागतो.. त्यानंतर मुंग्यांना तो रस्ता परत पकडता येत नाही. खाद्याकडून आपण वारुळाकडे चाललो आहोत की वारुळाकडून खाद्याकडे हे मुंग्यांना कळतं का? याच्या उत्तरासाठी फाइनमननं एक मस्त प्रयोग केला. तो चालणार्‍या मुंगीला कागदात उचलून गोल गोल फिरवून, ती ज्या दिशेला चालली असेल, त्याच्या बरोबर विरुद्ध दिशेला किंवा कधी त्याच दिशेला ठेवायचा.. मग ती मुंगी कुठे जातेय ते बघायचा.. ती मुंगी सरळ तिचं तोंड ज्या बाजूला असेल तिकडे चालती व्हायची. पुढे ब्राझिलमधे दिसलेल्या मुंग्यावर त्यानं हाच प्रयोग केला तर त्याच्या लक्षात आलं की त्या मुंग्यांना दोन चार पावलं टाकताच कळतंय की आपण विरुद्ध दिशेला चाललो आहोत.

तो एक द्रष्टाही होता.. १९५९ साली "देअर इज प्लेन्टी ऑफ रूम अ‍ॅट द बॉटम" या भाषणात त्यानं भविष्यात एकेक अणू आपल्याला पाहीजे तिथे ठेऊन काय काय होतं ते पहाणं शक्य होईल असं विधान केलं. पुढे १९८० च्या दशकात ते शक्य झालं आणि त्या तंत्रज्ञानाला नॅनोटेक्नॉलॉजी हे नाव मिळालं.

इतकी अफाट बुद्धिमत्ता आणि भरपूर सारासार विवेक बुद्धी असलेल्या माणसाला देखील एकदा नैराश्याने ग्रासले होते. हे ऐकल्यावर तो एक दैवी चमत्कार नसून आपल्यासारखाच एक साधासुधा माणूस आहे हे जाणवतं.. मग तो जवळचा वाटायला लागतो.. सामान्य माणसांसारखाच ताणतणावामुळे कोलमडू शकणारा, असा! बाँबचं काम संपल्यावर तो कॉर्नेल मधे प्रोफेसर म्हणून लागला. पण त्याची अशी एक भावना झाली होती की तो बौद्धिक दृष्ट्या संपला आहे.. त्याच्यात काही करायची कुवत राहिलेली नाही.. हे विद्यापीठ आपल्यावर इतके पैसे खर्च करतंय खरं पण त्यांना माहित नाहीये की आपल्याला काही जमणं शक्य नाहीये.. इ. इ. तो चक्क पदार्थविज्ञान सोडून अरेबियन नाईट्स सारखी पुस्तकं वाचायला लागला. इतरांच्या आपल्याकडून प्रचंड अपेक्षा आहेत अशी कल्पना करून घेऊन त्या दबावाने तो पार नैराश्याच्या खाईत बुडाला. पण मग हळूहळू तो स्वतःशी विचार करायला लागला की.. 'जरी हल्ली पदार्थविज्ञानाचा मला तिटकारा वाटत असला तरी एके काळी मला ते आवडायचं. का बरं आवडायचं? कारण मी त्याच्याशी खेळत असे. तेव्हा असा विचार करत नसे की हे जे काही मी करतोय त्याने काही नवीन संशोधन होणार आहे की नाही ते! मला ते करायला आवडतंय इतकं कारण मला पुरेसं होतं.' त्यानंतर त्यानं हाच दृष्टीकोन ठेवायला सुरुवात केली.. जे आवडतंय ते करायचं, बस्स! मग एक दिवस कॉर्नेलच्या कँटिनमधे एकाने एक थाळी वर फेकली. वर जाताना ती डचमळत होती आणि त्यावरचं पदकाचं चित्र फिरत होतं. फाइनमनच्या मनात विचार आला की त्या पदकाची हालचाल सांगणारं सूत्र काय असेल? मग तो त्याच्या मागे लागला. ते सूत्र शोधून काढता काढता त्याला पदार्थविज्ञानाची गोडी परत कशी लागली ते कळलं नाही. आणि मग एक दिवस त्याला नोबेल मिळवून देणारं संशोधन त्याच्या हातून झालं.

त्याच्या वडिलांमुळेच त्याला शास्त्राची गोडी लागली. त्याच्या वडिलांनी त्याला कधी तू शास्त्रज्ञ हो म्हणून सांगीतलं नाही आणि स्वतः त्याचे वडीलही शास्त्रज्ञ नव्हते.. ते एक सेल्स मॅनेजर होते. मग हे कसं घडलं? याचं उत्तर फाइनमनने स्वतःच नॅशनल सायन्स टीचर्स असोसिएशन समोर केलेल्या भाषणात दिलं आहे (खाली ५ क्रमांकाचा दुवा पहा). त्यातलं मला आवडलेलं एक उदाहरण देतो.

त्याचे वडील त्याला दर सप्ताहाच्या शेवटी जंगलात फिरायला घेऊन जात असत. एकदा त्यांनी त्याला एक पक्षी दाखवून सांगीतलं - 'तो पक्षी बघितलास? त्याचं नाव ब्राऊन-थ्रोटेड थ्रश. त्याला जर्मनीत हाल्सेनफ्लुगेल आणि चिनी भाषेत चुंग लिंग म्हणतात. पण जरी तू त्याची वेगवेगळ्या भाषेतली नावं लक्षात ठेवलीस तरी तुला त्या पक्षाबद्दल काहीच माहिती नसणार आहे. त्यामुळे तुला फक्त वेगवेगळ्या देशातले लोक त्याला काय म्हणतात एव्हढेच कळेल. तो गातो कसा? त्याच्या पिल्लांना उडायला कसा शिकवतो? उन्हाळ्यात किती तरी मैल प्रवास करून कुठे जातो आणि तिथून परतीचा रस्ता कसा शोधतो इ. इ. ही खरी त्या पक्षाबद्दलची माहिती. ती मिळवण्याच्या प्रयत्नात रहा!'

मला तरी मुलातून एक नोबेल पारितोषिक विजेता निर्माण करणार्‍या त्याच्या वडिलांचं जास्त कौतुक वाटतं!

====== समाप्त======

छायाचित्रांचे आणि इतर माहितीचे स्त्रोत ::

१. पोस्टाचं तिकीट - http://shallwemeanderon.blogspot.com/2009/05/forever-meandering.html
२. बोंगो वाजविताना - http://kempton.wordpress.com/2006/11/26/richard-feynman-great-minds-of-our-time/
३. शुअर्ली यू आर जोकिंग, मि. फाइनमन(पीडीएफ)- http://tenniselbow.org/scott/feyn_surely.pdf
४. फाइनमनला वाहिलेली साईट -- http://www.feynman.com
५. नॅशनल सायन्स टीचर्स असोसिएशन समोर केलेले भाषण, व्हॉट इज सायन्स - http://www.fotuva.org/feynman/what_is_science.html