Tuesday, December 16, 2008

सोबती

पहाटेचे ६ वाजलेले असतात. मी कामावर जाण्यासाठी म्हणून गाडीपाशी येतो. उशीरा निघालो तर ऑफिसला जायला २ तासांच्यावर वेळ लागतो म्हणून लवकर निघण्याचा खटाटोप! गाडीवर भरपूर फ्रॉस्ट जमलेले असते. एकंदरीत थंडीचे दिवस उदासवाणेच असतात.. छोटा दिवस, जास्त अंधार, येताजाता धुकं व बर्फ, दणकट थंडी आणि भेसूर दिसणारे निष्पर्ण वृक्ष! शिव्या घालत घालत निरुत्साहाने बर्फ काढतो आणि गाडी घेऊन निघतो. हाताला लागेल ती सिडी सरकवून गाणी लावतो.

"आखोंमें तुम दिलमें तुम हो".. हाफ टिकट मधलं किशोर व गीता दत्तचं गाणं लागतं. पिक्चरमधले प्रसंग डोळ्यासमोर तरळू लागतात आणि हळूच ओठांच्या कोपर्‍यातून हसू फुटतं. मन प्रफुल्लित होतं. आपोआप मी गुणगुणायला लागतो. डोळ्यावरची झोप उडून जाते. मघाचा वैताग कुठल्याकुठे पळून जातो. परक्या देशात अचानक जुना जवळचा मित्र भेटल्याचा आनंद होतो. कधी एकदाचा संपतोय हा प्रवास असं वाटायच्या ऐवजी आता संपूच नये असं वाटतं!

हाफ टिकट मधे किशोरनं काय अशक्य अभिनय केलाय! कधी कधी असं वाटतं की दिग्दर्शक त्याला फारसं काही सांगायच्या फंदात पडला नसावा.. 'सेटवर जा आणि पाहीजे तो गोंधळ घाल!' एवढंच सांगीतलं असणार. हाफ टिकट म्हणजे किशोरच्या सर्किटपणाचा कळस आहे. एवढा भंपकपणा, वेडेपणा एखादा माणूस इतक्या सहजतेने कसा करू शकतो? त्यात भर म्हणजे त्याची गाणी आणि नाच! एका प्रसंगातील शम्मी बरोबरचा त्याचा नाच आयुष्यभर लक्षात रहातो. एकही संवाद नसताना किशोर नुसत्या नाचण्यानं कमालीचा हसवतो. हा पिक्चर पाहील्यावर मेहमूद, आसरानी सारखे नट त्याला सर्वश्रेष्ठ विनोदी नट का म्हणायचे ते मात्र कळतं!

किशोर पहिल्यांदा मला भेटला तेंव्हा मला असच एकटं एकटं वाटत होतं. आम्ही पुण्यात ६९ साली प्रथम आल्यानंतर मला सगळंच परकं होतं, ओळखी अजून व्हायच्या होत्या. त्याच वेळेला 'आराधना' आला आणि किशोर माझा पहीला मित्र झाला. गाता गाता माझ्या सारख्या अनेकांना त्यानं खिशात टाकलं. नंतरही कामानिमित्त वेगवेगळ्या देशात एकटं रहायची वेळ आली तेंव्हा किशोरच सोबतीला होता.

एखाद्या झर्‍यासारखा खळाळता आवाज.. मोकळा ताजा टवटवीत आणि नैसर्गिक.. तालीम करून घोटलेला नाही. तो गाणं शिकलेला नव्हता कदाचित त्यामुळे संगीताच्या बारीक सारीक नियमांपासून मुक्त होता. पण तो गाण्याचा मूड व प्रसंगाला योग्य असे निरनिराळे आवाज, चित्कार व शब्द असं काहीही घुसडून रंगत मात्र वाढवायचा. "एक चतुर नार" मधे "उम ब्रुम उम ब्रुम" पासून "किचिपुडताय" पर्यंत कुठल्याही भाषेत नसलेले विचित्र शब्द तो गाण्याला कसलीही बाधा न आणता सहजगत्या घालतो. परीणामी गाणं एका वेगळ्याच पातळीवर जातं. वास्तविक मन्नाडेनं हे गाणं कर्नाटकी ढंगात उत्कृष्टपणे म्हंटल आहे पण शेवटी लक्षात रहातो तो किशोर!

आपल्याला गाणं येत नाही हे तोही प्रामाणिकपणे कबूल करायचा. फार पूर्वी लतानं घेतलेल्या त्याच्या मुलाखतीत बोलता बोलता तो मधेच म्हणाला "तुम तो जानती हो लता! मुझे ये सा, रे, गा कुछ नहीं समझता". जर धुन काही दिवस आधी ऐकवली आणि तीवर किशोरला शांतपणे विचार करू दिला तर तो तिचं सोनं करतो हे स. दे. बर्मनच्या लक्षात आलं होतं. पुढे टेपरेकॉर्डर आल्यावर तो नवीन गाणं टेप करून ७-८ दिवस अगोदर त्याला ऐकायला द्यायचा. हीच पध्दत आर. डी. नं पण पुढे चालू ठेवली. मात्र "मेरे नयना सावन भादो" ची धुन ऐकल्यावर किशोरनं "ये मुझसे नहीं होगा" असं म्हणत ते गाणं गायला साफ नकार दिला. हे गाणं लता पण गाणार आहे हे कळल्यावर किशोरनं आरडीला "तू ते गाणं आधी लताच्या आवाजात रेकॉर्ड करून मला दे. मग मी ते पाठ करून जसच्या तसं म्हणतो" असं सुचवलं. टेप घेऊन किशोर गेला ते ८ दिवसानंतर उगवला. नंतर खुद्द आरडीनं "गाना सुननेके बाद ऐसा नहीं लग रहा था की वो पढकर या सीखकर गा रहे हैं! ऐसा लग रहा था की वो अपने मनसेही गा रहे हैं!" अशी पावती दिली. किशोर काम करत असलेल्या नौकरी पिक्चरला सलील चौधरीचं संगीत होतं. किशोरला शास्त्रिय संगीत येत नाही म्हंटल्यावर सलीलनं त्याला "छोटासा घर होगा बादलोंकी छावमें" हे गाणं द्यायचं नाकारलं. नंतर किशोरनं त्याला आपलं एक गाणं ऐकवून कसंबसं पटवलं. ते गाणं छान झालं, नंतर पुढे हाफ टिकट मधलीही गाणी सलीलनं त्याला दिली पण तरीही तो किशोरला गायक मानायचा नाही. तब्बल १८ वर्षांनंतर 'मेरे अपने' साठी सलीलनं किशोरचं "कोई होता जिसको अपना" हे गाणं केल्यावर त्याचं मत बदललं. "जी गोष्ट सचिनदाला समजली होती ती कळायला मला १८ वर्ष लागली" असं तो खेदाने म्हणाला.




त्याचं सगळच जगावेगळं व नाविन्यपूर्ण होतं. मूळचं आभासकुमार नाव सोडून किशोरकुमार हे नाव घेऊन त्याने चित्रपट सृष्टीत प्रवेश केला. त्याच्या भावाची, अशोककुमारची, त्यानं अभिनेता व्हाव अशी इच्छा होती. पण गाण्यातलं सारेगम पण माहीत नसलेल्या किशोरला गायक व्हायचं होतं. तो सैगलला गुरू मानायचा. एकदा स.दे. बर्मन अशोककुमारकडे आला असताना त्यानं किशोरला सैगलची नक्कल करताना ऐकलं. स.दे. नं त्याला स्वतःची शैली विकसीत करण्याचा सल्ला दिला. तो त्यानं ऐकला. किशोरची शैली त्याच्यावेळच्या व त्याच्यानंतरच्या पार्श्वगायकांपेक्षा फारच वेगळी आहे म्हणूनच त्याच्या दर्जाचा एकही गायक अजून झालेला नाही. स.दे. नं किशोरला घडवला. तोही त्याला आपला गुरू म्हणायचा. त्याच्या कुठल्याही कार्यक्रमाची सुरूवात स.दे. नं दिलेल्या गाण्यानं व्हायची. स.दे. गेल्यानंतर रेडिओ सिलोन वर किशोरनं त्याला श्रध्दांजली अर्पण केली. एक तासाचा कार्यक्रम किशोरनं केला. स. दे. च्या बर्‍याच गमतीजमती त्यानं स. दे. च्या बोलण्याची नक्कल करीत सांगीतल्या. जेंव्हा किशोरला अभिनयातून गाणी म्हणायला वेळ मिळत नव्हता त्या वेळची एक गोष्ट त्यानं सांगीतली. तेंव्हा तो कुठल्याच संगीतकाराला अगदी स.दे.ला सुद्धा तारखा देऊ शकत नव्हता. त्या काळात स.दे. नं त्याला रात्री घरी जेवायला बोलावलं. आग्रह करकरून त्याला प्रचंड खायला घातलं. शेवटी तो म्हणाला 'आता बास झालं सचिनदा! मला आता चालवणार पण नाही!'. ताबडतोब स. दे. नं नोकरांना सांगून घराच्या दार-खिडक्या बंद करवल्या आणि म्हणाला 'आता कुठे जाशील. चल, गाण्याची प्रॅक्टीस करू या!'. मिली चित्रपटाचे रेकॉर्डिंग चालू असतानाच स.दे. आजारी पडला. हॉस्पीटलमधे किशोर त्याला भेटायला गेल्यावर स.दे. नं त्याला नुकतच रेकॉर्ड झालेलं मिली मधलं 'बडी सूनी सूनी है' हे गाणं म्हणायला लावलं.

भावाच्या आग्रहाखातर तो अभिनेता झाला खरा पण त्यात त्याचं मन लागत नव्हतं. चलती का नाम गाडी, पडोसन, नई दिल्ली असे त्याचे काही पिक्चर फार गाजले पण गाण्यासाठी त्यानं अभिनय सोडून दिला. सेटवर किशोर लोकांना काहीतरी येडपटपणा करून सतत हसवत असे. दिल्ली का ठग च्या सेटवर त्यानं नूतनला विचारलं 'मैं तुम्हे पागल लगता हूँ ना?'. त्यावर नूतननं 'लगते हो? मुझे तो यकीन है!' असं सांगून त्याला खलास केला.




त्याच्या कार्यक्रमांच्या वेळी सूत्रसंचालन तो स्वतःच करत असे. पुण्यात झालेल्या कार्यक्रमात तो म्हणाला की डॉक्टरनं मला गाणी म्हणताना नाच न करण्याचा सल्ला दिला आहे. 'पर गाना और नाचना तो साथ मे होता है!" असं म्हणून त्यानं डॉक्टरचा सल्ला धाब्यावर बसवला आणि 'खैके पान बनारसवाला' हे गाणं जोरदार नाच करत सादर केलं. त्याचं बोलणं उत्स्फूर्त होतं व बोलता बोलता मधेच कुठल्या तरी गाण्याची गंमत सांगायचा आणि प्रॅक्टीस केलेली नसली तरी गायचा!

आणीबाणीच्या काळात संजय गांधीच्या कार्यक्रमात त्यानं गाणी म्हणायला स्वच्छ नकार दिला. त्याबद्दल त्याची गाणी रेडीओवर वाजवणं बंद झालं पण हा पठ्ठ्या शेवट पर्यंत माफी मागायला काही गेला नाही. शेवटी इतर लोकांनीच रदबदली केल्यावर त्याची गाणी परत सुरू झाली.

किशोरच्या सोबतीमुळं आज फार पटकन मी ऑफिसला पोचतो. सूरमयी व आनंदी दुनियेतून रूक्ष जगात प्रवेश करतो... किशोर काळाच्या पडद्याआड गेला असला तरी माझ्या कानाच्या पडद्याआड अजून शाबूत असल्याच्या आनंदाने!

-- समाप्त --

वयम् मोठ्ठम्? खोट्टम्!

कॉलेजात असताना मी भरपूर लांब केस ठेवले होते. रस्त्यात पोरी देखील वळून वळून बघत असत. त्या नजरा मत्सराच्या होत्या की 'काय ध्यान आहे' अशा अर्थाच्या होत्या यावर विचार करून मी त्रास करून घेत नसे. मला फार अभिमान होता केसांचा, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं! लांब केस ठेवण्याचं माझं ध्येय माझ्या बापाने न्हाव्याकरवी खुंटवलं. आपल्या पोटावर पाय आणणार्‍या लोकांचा कट उधळलाच पाहीजे या विचाराने पेटून त्या दिवशी न्हाव्याने एकदम मिलीटरी कटच मारला आणि दुप्पट पैसे लावले. हाय! हाय! मेरे बालोंके टुकडे हजार हुए कोई इधर गिरा कोई उधर!

कॉलेज संपून नोकरी लागेपर्यंत मी 'पांढरकेशी' झालो होतो. चार वर्षं नोकरी केल्यावर माझ्या कंपनीनं मला कंप्युटर शिकायला परत कॉलेजात पाठवलं. पहील्या दिवशी मी वर्गात पाऊल ठेवताच सगळी जन्ता मीच मास्तर आहे असं समजून खाडकन् उभी राहीली. मला असं वाटलं की जन्तेला माझ्या मागं मास्तर दिसला म्हणून मी वळून पाहीलं. मागं अर्थातच कुणी नव्हतं. खरा प्रकार लक्षात येताच 'काय मठ्ठ पोरं आहेत' अशी नजर टा़कून मी हसलो. पण ते हसण्यावारी नेण्याचं प्रकरण नव्हतं. हळूहळू माझ्या लक्षात यायला लागलं की इतर माणसं म्हणजे दुकानदार, रिक्षावाले इ.इ. माझ्याशी बोलताना मला 'काका' किंवा 'अंकल' म्हणायला लागलेत.

दोन वर्षांनी शिक्षण संपताच कंपनीनं मला अमेरीकेला पाठवलं. राहण्याची सोय आमच्या कंपनीतल्याच एका मुलाकडे केली होती. तिकडे गेल्यावर एके दिवशी तो मला त्याच्या नेहमीच्या भारतीय दुकानदाराकडे घेऊन गेला. आम्हाला बघताच दुकानदारानं त्याला विचारलं - "काय? आज बाबांना घेऊन आलास वाटतं?". केवळ केसांच्या रंगबदलामुळे मी एका पीढीची उंच उडी मारल्याची एक अस्वस्थ जाणीव झाली. आपल्याला मनातून अजून तरुण वाटतंय ना मग लोकांच्या बोलण्याला कशाला भीक घालायची असा सूज्ञ विचार करून मी त्याला माफ केलं. कधीतरी 'काय भुललासी वरलिया रंगा' याचा साक्षात्कार होऊन लोक माझे पांढरे केस बाजूला सारतील व त्याखाली उचंबळणारं माझं तरूण मन पाहतील असा मला दृढ विश्वास होता.

अमेरिकेतून परत आल्यावर घरच्यांनी माझ्या लग्नाचा घाट घातला. दणादण मुली पहायला सुरुवात झाली आणि नकारही तेवढ्याच दणादण यायला लागले. रस्त्यात पोरी ढुंकून सुध्दा बघत नव्हत्या. चुकून नजरानजर झालीच तर 'म्हातारचळ लागलाय मेल्याला!' असे भाव दाखवून नजर फिरविली जायची. नकार फक्त मुलींनाच येतात हा माझा भ्रम निघाला. 'नकारांचं कारण तुझ्या केसात आहे' माझ्या मित्रानं एकदा छातीठोकपणे सांगीतलं. कमाल आहे! लहानपणी दुष्ट जादुगारांचे जीव त्यांच्या केसात असल्याचं ऐकलं होतं. पण तिर्‍हाईत मुलींचा नकार माझ्या केसात अडकण्याची संकल्पना पचवणं जड गेलं. 'अरे तसं नाही! तू पांढर्‍या केसांचा आहेस म्हणून नकार येतायत. यापुढे मुलगी बघायला जाताना तरी कलप लावून जा. अरे! केस सलामत तो मुली पचास!' मित्रानं स्पष्टीकरण व उपाय दोन्ही एकदम दिलं. मुलीच्या घरात शिरता शिरता अचानक आलेल्या पावसामुळे कलप ओघळून चेहर्‍यावर पसरलाय असं केविलवाणं दृष्य माझ्या डोळ्यासमोर तरळलं. तरीही धीराने कलप लावून मी मुलगी बघायला गेलो आणि काय आश्चर्य! पहील्याच मुलीनं होकार दिला.

लग्नानंतर माझं कलप कारस्थान तिला कळल्यावर हा आनंद टिकला नाही. 'केसानं गळा कापलास तू माझा' असा जळजळीत आरोप झाला. संघर्षपूर्ण लग्न आणि असले हीन आरोप यामुळे केसांनी माझा त्याग केला. मूळचं माझं अरुंद कपाळ अती भव्य झालं. आरशात बघितल्यावर उगिचच्या उगीच "भाळी चंद्र असे धरिला" हेच गाणं सुचायचं. दु:खात सुख एवढच होतं की आता मी केसानं कुणाचा गळा कापणं शक्य नव्हतं आणि माझ्या केसाला धक्का लावायची कोणाची प्राज्ञा नव्हती. डोक्यावरून केस उतरले खरे पण मी पीढीची आणखी एक पायरी अलगदपणे वर चढलो.

एकदा मुलाला शाळेत सोडायला गेलो होतो. "आज आजोबा सोडायला आलेत का?" त्याच्या मित्राचा निरागस प्रश्न मला चमकवून गेला. शेंबड्या पोराला काय कळतंय असा विचार करून मी ते कुणालाच सांगीतलं नाही. पुढे एकदा भाड्यावरून रिक्षावाल्याशी भांडण झालं. भांडता भांडता "तुमच्या वयाकडे बघून मी जास्त काय बोलत नाय" असं म्हणून त्यानं माझ्या दुखर्‍या भागावर बोट ठेवलं. मुकाटपणे पैसे देऊन मी काढता पाय घेतला. असंच एकदा पैसे काढायला बँकेत गेलो होतो. तिथे नेहमीपेक्षा जास्त गर्दी दिसली म्हणून काय करावं याचा विचार करत क्षणभर थबकलो. तेवढ्यात तिथला एक क्लार्क माझ्याकडे बघून खेकसला - "अजून पेंशन आलेली नाहीये". हरामखोर लेकाचा! मी याच्या पगाराचे पैसे भरतो आणि मलाच अशी वागणूक!

एकदा मात्र कहरच झाला. माझी बायको आणि मी मॉलमधे गेलो होतो. बायको कपडे बघत होती. मी हताशपणे इकडे तिकडे बघत होतो. अचानक मोठ्या भावाचा एक मित्र खूप वर्षांनी भेटला आणि आमच्या गप्पा सुरू झाल्या. बोलणं चालू असताना बायको "मी वरच्या सेक्शन मधे चाललेय" असं सांगून पटकन निघून गेली. ती गेल्यावर मित्राला काहीतरी सुचले.

तो: "बरं झालं तू भेटलास! माझा मुलगा लग्नाचा आहे, स्थळं बघतोय सध्या!"
मी: "असं का? अरे वा! कोणी असलं तर जरूर सांगीन तुला!"
तो: "तसं नव्हे! तुझी मुलगी लग्नाची आहे का विचारणार होतो! ओळखीत जमलं म्हणजे कसं बरं असतं!"
मी: "मला कुठली मुलगी? मला एक मुलगा आहे लहान! अजून शाळेत आहे तो." याला अचानक माझ्या मुलीचा कसा शोध लागला या आश्चर्यानं मी म्हंटलं.
तो: "मग आत्ता जी गेली ती कोण होती?"
मी: "तीsss? ती माझी बायको!"

यावर काहीतरी गुळमुळीत बोलून तो सटकला पण त्याच्या डोक्यातले विचार मला स्पष्ट दिसले - "एवढ्यात लग्न करायचं नसेल तर तसं सांग! सरळ मुलीला बायको का म्हणतोस?"

नाईलाजाने मी मित्राचा सल्ला घ्यायचं ठरवलं. सगळं ऐकल्यावर तो म्हणाला -
तो: "लोकांना वाटतं ते खरं आहे. तू आणि तुझे वडील एकत्र दिसलात ना की कोण कोणाचा बाप आहे ते कळत नाही".
मी: "मीss? मी माझ्या बापाचा बाप? हे फार होतंय! तुझ्याकडे मी सल्ला घ्यायला आलोय, आणखी मानहानी करून घ्यायला नाही."
तो: "त्यावर उपाय म्हणजे टकलावर केस उगवायचे. शनवारपेठेतल्या एका वैद्यांकडे याचा आयुर्वेदिक उपाय आहे. ते माणसाला उताणे झोपवून त्याच्या नाकात दुर्वांचा रस घालतात. असं एक आठवडाभर केलं की केस परत उगवायला लागतात."
मी: "बाप रे! फारच जालीम उपाय दिसतोय! पण मला एक सांग.. दुर्वांचा रस घालून केस कसे येतील? दुर्वा येतील फारतर. म्हणजे दुर्वा समजा जमिनीत पेरल्या तर दुर्वाच येणार ना? शेपू कसा येईल?".
तो: "हा प्रश्न तू वैद्यालाच विचार!" माझ्या बिनतोड लॉजिकचा त्याच्यावर अपेक्षित परीणाम न झाल्याने मी खट्टू झालो खरा पण तरीही मी हा उपाय करायचं ठरवलं. परिस्थितीने माणुस चहुकडून चेपला गेला की त्यातून बाहेर पडण्यासाठी काहीही करायला तयार होतो तसंच काहीसं.

वरकरणी निरुपद्रवी दिसणारा दुर्वांचा रस नाकात गेल्यावर नाक कान घसा चांगला जाळत जातो. रोज मी भिंग घेऊन केसाचं एखादं सूक्ष्म रोपटं दिसतंय का ते बघत होतो. पण कशाचाच पत्ता नव्हता. तरी मी नेटाने महीनाभर त्या जळजळीत द्रव्याचा आस्वाद (!) घेतला. परीणामी नाकातले सगळे केस गेले आणि नवीन येणंही बंद झालं. टकलावरचे केस पुढच्या जन्मी येतील बहुतेक. मीही एक मूर्खच! त्या वैद्याला टक्कल आहे हे आधीच माझ्या लक्षात यायला पाहीजे होते! मधे कुणी तरी विग घालायचा सल्ला दिला पण मी तो नाकारला कारण मनातनं मला ते बाळाला टोपडं घातल्यासारखं वाटतं!

नुकताच मी परदेशात आलो आहे. अशा गावात जिथे भारतीय माणूस औषधाला सुद्धा सापडत नाही असं गावकरी म्हणतात. पण माझं नशीब एवढं चांगलं असतं तर मी हे सगळं लिहीलं असतं का? पहीले काही दिवस छान गेले. एक दिवस एका सुपरस्टोअर मधे जात असताना दोन माणसं चक्क मराठीतून बोलतांना दिसली. मीही न राहवून बोलायला सुरुवात केली. बोलता बोलता त्यातला एक माणूस मला सहज म्हणाला "काय इथे मुलाकडे आलात का?".

आत्ताशी कुठे मला 'जया अंगी मोठेपण तया यातना कठीण!' याचा अर्थ उमगायला लागलाय. मोठेपणाचे काही अनपेक्षित फायदेही असतात म्हणा! भरलेल्या बसमधे लोक मला केविलवाणी नजर टाकून बसायला जागा देतात हा त्यातलाच एक!

सध्या लोकांनी मला पणजोबा बनवायची वाट बघतोय!!

-- समाप्त --