Thursday, August 2, 2018

इये स्वर्गाचिये नगरी!

या लेखाच्या पार्श्वभूमीसाठी वाचा:  'वादळ'

पहाटेच्या अंधुक प्रकाशात रस्त्यावर पडलेला गुंड्या उठला. त्याला त्याची रमोना थोड्या अंतरावर आडवी झालेली दिसली.. तिची चाकं अजून फिरत होती. इकडे तिकडे पाहिल्यावर बैलावर बसलेला व  पांढरे स्वच्छ कपडे परिधान केलेला एक माणूस दिसला.. तो साक्षात यमदूत होता.. पण बिचार्‍या गुंड्याला तो अंधुक प्रकाशात, कंदील न घेता बैल घेऊन जाणारा एक सामान्य माणूस वाटला. याच्या बैलाला धडकून आपण पडलो असं समजून गुंड्या भांडण्याच्या पवित्र्यात त्याच्यापाशी गेला. पण त्याचा तेजःपुंज चेहरा आणि चेहर्‍यावरचे सौम्य भाव पाहून थबकला. गुंड्याच्या मनातला गोंधळ जाणून यमदूत उद्गारला "भो वेंकट! तुझा या भूतलावरील कार्यभाग उरकला आहे. तस्मात् तू माझ्यासह प्रस्थान ठेव.".. संस्कृतप्रचुर भाषेची सवय नसल्यामुळे गुंड्याची बंद खोलीत सापडलेल्या चिमणीसारखी अवस्था झाली. 

"अँ! कौनसी भाषा में बोला तू? तू जो भी बोला ना, सब बंपर गया! मेरेसे मराठीमे नहीं तो हिंदीमे बात कर!"..भंजाळलेला गुंड्या बरळला.

"भो वेंकट! ..."

"अरे यार! तू बार बार भो भो मत कर! कुत्ते जैसा लगता है! और पहिले ये बता तू है कौन!"

यमदूताने 'भो'काड पसरण्यासाठी केलेला ओठांचा चंबू मुश्किलीने बंद केला व म्हणाला "मी यमदूत आहे."

"हा हा हा! सुभे सुभे पीके आया क्या रे? एक तो मेरेको ढुश्शी मारके गिराया, उपरसे खुदको यमदूत बोलता है?".. गुंड्याची जाम चिडचिड झाली. यमदूताला या सगळ्या शिव्याशापांची अर्थातच प्रचंड सवय असणार. स्थितप्रज्ञपणे त्याच्या रमोनाकडे आणि नंतर निश्चेष्ट शरीराकडे बोट दाखवत तो वदला "तू या चमत्कारिक वाहनावरून मार्ग क्रमित असताना एका दुर्घटनेमुळे गतप्राण झालास. हा बघ तुझा निश्चेष्ट देह!".

गुंड्याला एकीकडे आपला मृत्यू झाला आहे हे पटत होतं तर दुसरीकडे आपण जिवंत आहोत असं पण वाटत होतं. त्याच्या डोक्याची पार सापशिडी झाली होती! शेवटी बाजूला जमलेल्यांपैकी कुणालाच ते दोघे दिसत नाहीयेत याची नोंद होऊन गुंड्या वरमला - "यानेके तू सचमुचका यमदूत है क्या? हां! बचपनमें कहानीमें सुना था! माफ करना यमदूतभाय! पहचाननेमे गलती हो गई!".. त्याला यमदूतभाय संबोधून गुंड्यानं त्याचा पार टपोरी गुंड केला.

यमदूत असला म्हणून काय झालं? गाडीवरची टीका गुंड्या खपवून घेणं शक्य नव्हतं. खुद्द यमाला आपल्या रेड्याबद्दल एवढा अभिमान नसेल तेवढा गुंड्याला त्याच्या गाडीबद्दल होता - "अबे ए! इसको चमत्कारिक क्यूं बोला तुम? बैठ मेरे पीछे और मै तेरेको असली चमत्कार दिखाता है!" सामान्य लोकांना विख्यात व्यक्तिंच्या सर्व गोष्टींबद्दल जसं फालतू कुतुहल असतं तसलं कुतुहल यमदूताला त्या चिमुकल्या यंत्राबद्दल निर्माण झालं होतं.. त्याच्या आडदांड बैलापुढे एव्हढस्सं दिसणारं ते यंत्र दोन माणसांना सोडा पण स्वतःचं वजन तरी ओढेल की नाही ही शंका त्याला होती. पण कुतुहलाला मोल नसतं! तो त्याच्या मागे जेमतेम वीतभर जागेवर कसाबसा बसलाच. गुंड्यानं त्याच्या नेहमीच्या ष्टाईलीत एक-दोन जीवघेणे लॅप मारताच मृत्युगोलात मोटरसायकल हाणणार्‍या एखाद्या बेडर माणसाच्या मागे बसलेल्या सामान्य माणसासारखी त्या यमदूताची अवस्था झाली.. त्याला जणू स्वर्गच दिसला! घाईघाईने यमदूताने ते भयंकर लॅप आवरते घेण्याची विनंती केली.."भो वेंकट! तुझे या अजब वाहनावरचे नैपुण्य पाहून मी स्तिमित झालो आहे. कृपया प्रवास खंडित कर." गुंड्याने एक झोकदार वळण घेऊन बैलाशेजारी भसकन गाडी थांबवली.. बैलाने बावचळून त्यांच्यावर शिंगं रोखली. यमदूताने त्याला चुचकारून शांत करताच ते बैलावर आरूढ झाले. नंतर यमदूताने सुपरमॅनच्या थाटात पुढे झुकून एक हात वर केला.. आणि ते सुसाट स्वर्गाकडे निघाले.

स्वर्गातील एका घरासमोर गुंड्याला उतरवून यमदूताने त्याला घरात जायला सांगीतलं आणि तो बैल पार्क करायला गेला. घरावर 'यमसदन' अशी पाटी होती. दार खटखटवल्यावर एक अतिसुंदर स्त्री बाहेर आली.. समोर गुंड्याला बघून ती चित्कारली - "तू रे कोण मेल्या?". गुंड्या उत्तराची जुळवाजुळव करेपर्यंत आतून हातात लेखणी, पुस्तक तसेच कोंबडा व दंड धारण केलेला, काळ्याकुट्ट वर्णाचा चार हात असलेला एक इसम बाहेर आला. तो खुद्द यम होता. गुंड्याकडे एक नजर टाकून त्यानं शून्यात नजर लावली. तो बहुतेक एका वहीतील पाने चाळत असावा. कारण वही अदृश्य होती फक्त यमाचे हात व बोटं वही चाळण्यासारखे फिरत होते. मग त्याने खुलासा केला - "हा वेंकट असणार! हा नुकताच मेला आहे".. मग गुंड्याला म्हणाला - "भो वेंकट! मी यम! आणि ही यमी". यमानेही भो केल्यामुळे स्वर्गातले समस्त लोक 'भो'चक आहेत अशी गुंड्याची खात्री झाली. "तुम लोगोंसे मिलकर बहुत खुशी हुई!".. गुंड्याने असं म्हणताच यम आणि यमी दोघांनाही धक्का बसला कारण त्यांना भेटल्यावर खुशी होणारा पहिलाच मानव त्यांना भेटला होता. मग गुंड्या पुढे झुकून यमाच्या कानात कुजबुजला.. 'तुम्हारी पत्नी बहुतही सुंदर है!"... "भो वेंकट! ही माझी भार्या नाही भगिनी आहे".. यमाने अगतिकपणे सांगितलं. आपलं काहीतरी सॉलिड चुकलंय इतपत गुंड्याला समजलं पण नक्की काय चुकलंय ते नाही कारण त्याला भार्या आणि भगिनी हे दोन्ही शब्द त्याच्या डोक्यावरून गेले.

नंतर स्वर्गाच्या रितीप्रमाणे गुंड्याला प्रथम प्राथमिक आगमन केंद्रात हजर होऊन स्वर्गात आल्याची नोंद करायची होती. तिथे त्याची प्राथमिक चौकशी होऊन एक टोकन मिळणार होतं. त्यावरून त्यानं कधी चित्रगुप्तापुढे पापपुण्याच्या हिशेबासाठी हजर व्हायचं ते ठरणार होतं. तिथे गुंड्यानं स्वर्गात रहायचं की नरकात सडायचं त्याचा निर्णय होणार होता. यमाने सांगीतल्याप्रमाणे गुंड्या त्या केंद्राच्या आवारात दाखल झाला. पण केंद्रात खूप बॅकलॉग असल्यामुळे तिथे हीSS गर्दी होती.. पृथ्वीवरील लोकसंख्या वाढल्यामुळे मरणारेही वाढले होते.. त्याचा परिणाम स्वर्गातल्या प्रत्येक डिपार्टमेंटवरील ताण वाढण्यात झाला होता. पूर्वी व्हिसाच्या कार्यालयात काम केलेल्यांना हाताशी धरून यम कसंबसं भागवत होता. आता सरकारी कामांच्या पद्धती आयुष्यभर कोळून प्यायलेली मंडळी स्वर्गात आल्यामुळे सुधारू शकतात का? छे! त्यांनी त्यांच्या सरावाच्या पद्धती चोखपणे राबविल्या होत्या. त्यामुळे आधी एक अ‍ॅप्लिकेशन फॉर्म भरणं आवश्यक होतं. त्यात नाव गाव पत्ता, जन्म/मृत्यू तारखा, तुम्ही केलेल्या पापपुण्यांची यादी इ. गोष्टी होत्या! फॉर्म सोबत ३ फोटो मागे सही करून लावायचे, जन्म व मृत्यूची ओरिजिनल सर्टिफिकिटं व एकेक झेरॉक्स कॉपी आणि मागील ३ वर्षांचे इन्कम टॅक्स रिटर्न्स जोडायचे होते! कळस म्हणजे सगळ्या व्हिसा फॉर्म वर शेवटी असतो तसा एक ष्ट्यांडर्ड प्रश्न पण होता.. या पूर्वी कधी अ‍ॅप्लिकेशन केला होता का? तेव्हा व्हिसा मिळाला होता की नव्हता?

महत्प्रयासाने रांगेचा शेवट शोधून गुंड्या उभा राहीला. रांगेत कित्येक एजंट आत्मे जवळ येऊन 'टोकन लवकर हवंय का? अ‍ॅफेडेविट करायचं आहे का?' अशी चौकशी करून जात होते. बराच वेळ होऊनही रांग फारशी सरकली नव्हती कारण पुढे आत्मे घुसत होते आणि वादावादी चालू होती. उद्विग्न चेहर्‍याने परत जाणार्‍या काही आत्म्यांना विचारल्यावर एकंदर प्रकरण गंभीर आहे असं गुंड्याच्या लक्षात आलं. ते आत्मे रांगेतल्या लोकांना वैतागून सांगत होते.. 'काही उपयोग नाही उभं राहून! ही माझी चौथी खेप आहे. दर वेळेला सांगतात दोन दिवसांनी या म्हणून! हरामखोर साले!'. शेवटी गुंड्याने कंटाळून एका एजंटाला हात केला. त्याचं नाव राजू पण तो स्वतःला राजू गाईड म्हणायचा. तो देवानंदचा फॅन होता. त्याची मान तिरकी ठेऊन बोलण्याची लकब तर हुबेहूब देवानंदसारखी होती!.. मनुष्य जन्मात आर्टीओपाशी एजंटगिरी करायचा आणि फावल्या वेळात गाईडचं काम! स्वर्गात नवीन नवीन आलेल्या आत्म्यांना त्यांच्या निवासाचा ठोस निर्णय होईपर्यंत अमृताचे पेग फुकट असतात. त्यातले दोन पेग हा राजू गाईडचा मोबदला ठरला. राजू गाईड त्याला बाजूच्या एका गल्लीतून घेऊन निघाला असताना रस्त्यात काहीजण रथांची दुरुस्ती करताना दिसले. राजू गाईडच्या माहितीनुसार ते रथ पाताळात हकालपट्टी होणार्‍या लोकांसाठी होते. त्यांची दुरुस्ती करणार्‍यांना पाताळयंत्री म्हणायचे!'. एवढ्यात बाजूने एक लावण्यवती, पायातल्या पैंजणांचा मंजुळ नाद करीत विहरत गेली. त्यावर गुंड्याचा लगेच - 'ये छम्मकछल्लो कौन है?' असा प्रश्न आला. अस्थायी बोलणं हा त्याचा स्थायीभाव होताच म्हणा! राजू गाईडने विव्हळून उद्गारला.."अबे ये छम्मकछल्लो नही है! ये मेनका है, मेनका!". गुंड्याने प्रत्यक्ष मेनकेला एक सामान्य आयटम गर्ल केल्यानं मधुबालेला राखी सावंत म्हंटल्या इतकं दु:ख झालं त्याला!

राजू गाईडनं ज्या कारकुनाच्या ऑफिसापाशी आणलं होतं तिथे इतर एजंटांनी आणलेल्या आत्म्यांमुळे बर्‍यापैकी रांग होती. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर त्याचा नंबर लागला. गुंड्या त्या कारकुनापुढे हाजिर होताच त्याचं पूर्ण नाव विचारण्यात आलं. गुंड्यानं "वेंकट रामन" सांगताच कारकून दचकला.
"आँ! तू कसा काय मेलास?".. कारकून त्याच्या वहीची पानं उलटसुलट करीत पुसता झाला.
"अ‍ॅक्सिडेंट हो गया, साब!"
"तसं नाही. तुझं नाव आमच्या यादीत नाहीये.".. कारकून वहीत शोधता शोधता म्हणाला.
"नाहीये? कोई लिखनेको भूल गया होगा! अभी लिख डालो!" गुंड्याचं अण्णालिसिस सुरू झालं.
"अरे बाबा! तू मरायलाच नको होतं. वेंकट प्रभाकर या नावाचा माणूस येणं अपेक्षित होतं.".. कारकुनाने दिलगिरी दाखविली.
"अच्छा! अच्छा! तो तुम लोग भलतेच आदमीको उठा लाये क्या? ठीक है! कोई वांधा नही! अब मुझे वापिस भेज दो!"
"अरे बाबा! आम्हाला तशी पावर नाय! तुला आता सुप्रीम कोर्टात जावं लागेल, तिथं निर्णय होईल! नेक्स्ट!". . गुंड्याकडे दुर्लक्ष करून कारकून ओरडला.

सुप्रीम कोर्टात म्हणजे खुद्द चित्रगुप्तापुढे उभं रहायचं होतं. त्याच्या कोर्टात भारतातल्या न्यायालयातलीच माणसं भरली होती. साहजिकच कुठलाही निकाल लवकर लागत नव्हता. नुसत्या पुढच्या तारखा मिळायच्या.. 'कोर्टाची पायरी चढू नये' असा इशारा स्वर्गात सुध्दा दिला जायचा तो त्यामुळेच! पण राजू गाईडच्या कॉन्टॅक्ट्समुळे आणखी दोन अमृत पेगांच्या मोबदल्यात गुंड्याची सुनावणी काही महिन्यातच झाली. निकालाच्या वकीली भाषेचा साधा अर्थ असा होता की त्याला परत पाठवणं शक्य नव्हतं कारण गुंड्याच्या वस्त्राचं म्हणजे शरीराचं तोपर्यंत दहन झालेलं होतं. स्वर्गात येऊन थोडाच वेळ झाल्यासारखं जरी वाटलं तरी पृथ्वीवर बरीच वर्षं उलटून गेलेली असतात. जर चूक लगेच लक्षात आली असती तर ताबडतोब शरीरात प्राण फुंकता आले असते. आणि त्या व्यक्तिला नुसता मृत्यू सदृश अनुभव येऊन गेल्यासारखं वाटलं असतं. तरीही ८४ लक्ष योनीतून न फिरविता लगेच मनुष्य जन्मात पाठवण्याचं आश्वासन मिळालं. पण अशाच पद्धतीने असंख्य चुकीची माणसं स्वर्गात आलेली असल्यामुळे परत जायची रांगही मोठ्ठी होती. नंबर लागायला वेळ लागणार होता. तो पर्यंत त्याला ट्रॅन्झिट व्हिसावर स्वर्गामधे निर्वासित छावणीत रहायची परवानगी उदार मनाने दिली गेली.

आता गुंड्याला काय वेळच वेळ होता. त्यानं व राजू गाईडनं जवळच्या अमृत पबकडे मोर्चा वळविला. जाता जाता नारदाची भेट झाली. नारदानं "नारायण! नारायण!" म्हणत तंबोरा वर करीत अभिवादन केलं. गुंड्याला असल्या अभिवादनाची सवय नव्हती, तो गोंधळला. गुंड्यानं प्रश्नार्थक मुद्रेने त्याच्याकडे पाहीलं. नारदानं परत "नारायण! नारायण!" चा जप केला. मग मात्र न राहवून गुंड्या त्याला म्हणाला "अरे यार! एक बार नाम बोलनेसे समझता है मेरेको! दो दो बार क्यूं बोलता है?". "ही कुठली यवनी भाषा?".. नारद संभ्रमात पडला. शिवाय त्याच्या तंबोर्‍यात बसवलेल्या गुगल ट्रान्सलेटरने 'एकदा माझ्या नावाचा अर्थ समजला की! आपण दोनदा बोलता का?' अशा केलेल्या भयाण भाषांतरामुळे त्याच्या मेंदूचा चाप निघाला. शेवटी राजू गाईडच्या मदतीमुळे त्याला खरा प्रश्न समजल्यावर तो उत्तरला.. 'वत्सा! तुजप्रत कल्याण असो! नारायण माझं नाव नाही. ते तर प्रत्यक्ष भगवंताचं नाव! माझं नाव नारद! तू कोण? नवीन दिसतोस". मग गुंड्याची सविस्तर कहाणी राजू गाईडच्या मदतीने पबमधे ऐकल्यावर नारदाने काही आतल्या गोटातल्या गोष्टी सांगितल्या. त्याचा सारांश असा:

नारदाला गुंड्यासारख्या केसेस खूप होऊन गेल्या आहेत हे माहीती होतं. त्यानं त्या संबंधात पूर्वी एकदा सरळ ब्रह्माला काडी लावली होती. समस्येचं गांभीर्य लक्षात येताच ब्रह्माला ब्रह्मांड आठवलं होतं म्हणे. त्यानं ताबडतोब इंद्राला योग्य ती कार्यवाही करायला सांगीतलं. इतर सिनिअर देवांबरोबर चर्चा करून इंद्राने सभा बोलावून असं भाषण ठोकलं.. "सर्व स्वर्गवासी देवदेवतांनो! नुकत्याच ज्या काही घटना उजेडात आल्या आहेत त्या सर्व देवसमाजाला मान खाली घालायला लावणार्‍या आहेत. कित्येक चुकीची माणसं स्वर्गात आणली गेली आणि भलभलते आत्मे पृथ्वीवर जन्म घेण्यासाठी पाठवण्यात आले. हे असंच चालू राहिलं तर आपल्यात आणि माणसात काय फरक राहिला? देवांचं देवपण शिल्लक रहाणार नाही. आपली विश्वासार्हता कमी होईल! देव आणि आत्मे बरोबरीने काम करतात. कारण कामाचा ताण वाढायला लागल्यामुळे आपण आत्म्यांची मदत घेऊ लागलो. पण त्याचबरोबर कामातली सुसूत्रता कमी झाली आहे. टीमवर्कचा अभाव दिसायला लागला आहे. टु अर इज स्पिरिट हे जरी असलं तरी या चुका कमी करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. पृथ्वीवर देखील अशा प्रकारच्या समस्या झाल्या तेव्हा त्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीत आमुलाग्र बदल केला. एच आर व क्वालिटी प्रणाली असलेली सर्वसमावेशक नवीन कार्यपद्धती अवलंबिली. आपणही तोच मार्ग चोखाळणार आहोत. लवकरच आपण हे सगळं मूळ पदाला आणू असा मला दृढ विश्वास आहे. त्याचबरोबर इतकी युगं मानवांना ज्ञान देणार्‍या आपल्यासारख्यांना हे मानवांकडून शिकावं लागतं आहे याची खंत पण वाटते आहे."

या भाषणानंतर अनेक कन्सल्टटांच्या मदतीने काम सुरू झालं. प्रथम जन्ममरणाच्या फेर्‍यांची प्रोसेस लिहीली ती अशी :- एखाद्याचा काळ आणि वेळ दोन्ही आले की त्याच्या मृत्यूचं चित्रगुप्ताच्या सहीचं फर्मान सुटतं. ते फर्मान यमाकडे जातं. यम त्याच्या टीमपैकी एकाला त्याचं पालन करायला सांगतो. तो त्या माणसाचा आत्मा घेऊन स्वर्गात येतो व यमाकडे आत्मा आणि फर्मान सुपूर्त करतो. नंतर चित्रगुप्ताच्या दरबारी त्या आत्म्याच्या पापपुण्याचा हिशेब होऊन तो स्वर्गात रहाणार की नरकात याचा निर्णय होतो. तो आत्मा जिकडे जाणार असेल तिथे त्याचं इंडक्शन होतं. पुनर्जन्माची वेळ येईपर्यंत ते आत्मे दिलेल्या जागी रहातात. ज्यांना मोक्ष मिळतो त्यांना स्वर्गाचं ग्रीनकार्ड मिळतं. या चक्रामधे आत्मा अमर असल्यामुळे प्रत्येक आत्म्याला एक युनिक नंबर देण्याची कल्पना आली. आणि आत्म्यांच्या ट्रॅकिंगसाठी डेडझिला नामक प्रणाली उभी करायचं ठरलं. त्यात आत्म्याचं लाईफ सायकल असं असणार होतं.. आत्मा एका शरीरात फुंकला की 'जन्म' होतो. लाईफ सायकल मधील जन्म ही एक स्थिती आहे. मृत्यू ही स्थिती नाही तर आत्म्याला शरीर विरहीत करायची प्रक्रिया आहे. आत्म्याचा युनिक नंबर आत्म्यावर बारकोडमधे गोंदवला तर नुसत्या बारकोड स्कॅनरने नक्की कोणता आत्मा स्वर्गात यायला हवा ते समजणं सहज शक्य होतं. अर्थात हा प्रकल्प एका झटक्यात पूर्ण होण्यासारखा नव्हता. जसजसे आत्मे स्वर्गात येतील तसतसं गोंदवण्याचं काम करायला लागणार होतं. पण आत्म्यावर गोंदवायचं कसं यावर मतभेद झाल्यामुळे तो बोंबलला.

दुसरीकडे चुकीचे आत्मे येण्याची काय कारणं असतील ती शोधण्यासाठी आत्म्याला स्वर्गात आणल्यावरती लगेच एक फॉर्म भरायचं ठरलं. त्यात माणूस मारताना आलेल्या अडचणी नोंदवायचं ठरवलं. त्याचं अ‍ॅनॅलिसिस केल्यावर जी कारणं समजली ती सगळ्यांना आधीपासूनच माहिती होती.
1. भारतातले पत्ते सापडत नाहीत.
2. काहींची खरी नावं वेगळी असतात. उदा. किशोरकुमार किंवा मधुबाला. पण चित्रगुप्ताच्या चोपडीत पाळण्यातल्या नावानं एंट्र्या असतात.
3. जुनी घरं/वाडे पाडून तिथे टोलेजंग इमारती झालेल्या असतात. पण चित्रगुप्ताच्या चोपडीत जुनेच पत्ते असतात.
४. यमदूत नीट नावं वाचत नाहीत.

सर्व कारणांवर सखोल चर्चा होऊन काही मार्ग सुचविण्यात आले. पहिल्या कारणासाठी पोस्टमनांच्या आत्म्यांची मदत घेण्याचा प्रयत्न झाला. पण त्यांना देखील त्यांच्या नेहमीच्या भागातले पत्ते सोडता इतर पत्ते सापडत नाहीत असं निष्पन्न झालं. बाकी कारणांसाठी सगळ्यांना काही ट्रेनिंग कोर्सेस करायचं ठरलं पण अखिल स्वर्गीय देवदेवता कामगार संघटनेनं 'कामाचा ताण वाढतो' अशा सबबी खाली संप करून ते हाणून पाडलं. या सगळ्या प्रकारातून नेहमी पृथ्वीवर होतं तेच स्वर्गात झालं. धेडगुजरी प्रणाल्या वापरणं सुरू झालं.

असे अनेक दिवस सरले. दरम्यान स्वर्गविहार ट्रॅव्हल कंपनीच्या तर्फे गुंड्याचा सर्व स्वर्ग फिरून झाला आणि त्याचा परतीचा नंबर लागला. ते ऐकताच गुंड्या ओरडला..'चिमण! मै आ रहा हूं!' ती आरोळी ऐकताच मी खाडकन उठून बसलो. मग लक्षात आलं की तो आल्याच्या अनंत स्वप्नांपैकी ते एक होतं. पहाटेचं नसल्यामुळे खरं पण होणार नव्हतं.

-- समाप्त --