Posts

यू कान्ट बी सीरियस!

"अरे वा चिमण! काय योगायोग आहे! बरं झालं तू दिसलास, मी तुझ्याकडेच यायला निघाले होते. " .. मी टीरुम मधे चहा करीत असताना आमच्या एचार बाईनं, रेचेलनं, माझी तंद्री भंग केली! ती नक्कीच जवळपास मी येण्याची वाट पहात दबा धरून बसली असणार. कारण, तिच्या ऑफिसकडून माझ्या ऑफिसकडे येण्याच्या कुठल्याही सोयिस्कर वाटेवर टीरुम नाही हे ओळखायला शेरलॉक होम्स असण्याची गरज नव्हती. मी या एचारी धूर्त कोल्ह्यांना चांगला ओळखून आहे. योगायोग कसला डोंबलाचा? ती तिथेच दबा धरून बसली असणार सावज पकडायला! सहज भेटल्यासारखं दाखवून कामाचं बोलायचं हे इतक्या वर्षांच्या माझ्या कारकीर्दीत अनेक एचारांशी पंगा घेतलेल्याला लगेच समजतं.  "तू या कंपनीचा आधारस्तंभ आहेस. तू इथला एक सर्वोत्तम टीम मेंबर आहेस." असं हरभर्‍याच्या झाडावर चढवून नंतर "पण....." म्हणून काही तरी कामातली खोडी दाखवून जमिनीवर आणायचं तंत्र मला नवीन नाही. बाकी, इतकी वर्षं केलेल्या खर्डेघाशीला कारकीर्द म्हणणं हातभट्टीला स्कॉच म्हणण्यासारखं आहे थोडं!  "तुझ्या कामाचं खूप कौतुक ऐकलं परवा मिटिंगमधे".. तिनं अपेक्षित सूतोवाच केलं. "हो ...

क्रिकेटचे पाळणाघर

Image
 लॉर्ड्स क्रिकेट मैदान ही क्रिकेटची पंढरी आहे हे सर्वश्रुतच आहे. दर वर्षी हजारो पर्यटक भक्तिभावाने फक्त हे मैदान बघायला येतात. त्यात भारतीय लोकांची संख्या सगळ्यात जास्त आहे हे तिथे काम करणार्‍या माणसानेच मला सांगितलं. अर्थात भारतीयांचे एकूण क्रिकेट वेड बघता यात नवल वाटण्यासारखं काही नाही म्हणा! मी पण त्यातलाच एक! पण क्रिकेटचं अति वेड असलं तरी क्रिकेटच्या एकूण इतिहासाबद्दल मी तरी अनभिज्ञ आहे.  उदाहरणार्थ, क्रिकेटचा जन्म कुठे झाला? मी याचं उत्तर बेधडकपणे लॉर्ड्स असं दिलं असतं. हा प्रश्न मला कधीही पडला नाही आणि मला ही कधी कुणी विचारला नाही. याचा अर्थ इतरांना पण तो पडला असण्याची शक्यता नाही. कुठलेही नस्ते प्रश्न न पडणं आणि पडले तरी त्यावर खोलात जाऊन विचार न करणं हा माझा स्थायीभाव आहे. तर, क्रिकेटचा जन्म कुठे झाला हे नक्की कुणालाच माहिती नाही. पण इतकं माहिती आहे की क्रिकेट शेकडो वर्षांपासून दक्षिण इंग्लंडमधे खेळलं जात होतं. तेथे सोळाव्या शतकामधे क्रिकेट खेळलं गेल्याचे संदर्भ आहेत.  क्रिकेटचा जन्म कुठे झाला हे नक्की माहिती नसलं तरी क्रिकेटचं पाळणाघर कुठे होतं ते नक्की माहिती आह...

अतिक्रमण

 कधी कधी अकस्मात काय घडेल काही सांगता येत नाही. मी एकदा रात्री साडे अकराच्या सुमारास मित्राकडून परत येत होतो. तो रहातो ऑक्सफर्ड पासून सुमारे 100 मैल लांब! निम्मा अधिक रस्त्ता कापून झाला होता आणि शेवटी एका हायवेला लागायचं होतं. हायवेची एक खासियत आहे. चुकून भलत्याच बाजूकडे जाणारा रस्ता पकडला की 10/15 मैलांचा फटका बसू शकतो कारण मधेच कुठे यू-टर्न घ्यायची सोय नसते. पुढचा एक्झिट घेऊन तिथे हायवे ओलांडून उलट्या बाजूचा रस्ता घ्यावा लागतो. त्या रात्री मी नेमका चुकीच्या बाजूचा हायवे धरला. अशा चुका मला नवीन नाही म्हणा! आत्तापर्यंत पुष्कळ वेळा ते करून बसलोय. पण आता घरी पोचायला आणखी उशीर होणार म्हणून स्वत:ला शिव्या देत देत पुढचा एक्झिट घेतला, फिरून उलट्या दिशेने हायवेकडे जाणारा रस्ता (स्लिप रोड) पकडला. आता फक्त वेग वाढवून हायवेच्या गर्दीत घुसणं बाकी होतं. इथल्या हायवेंची कमाल वेगमर्यादा 70 मैल आहे. त्यामुळे गाडी सुमारे 60 मैलाच्या वेगाने मारली तर हायवेच्या प्रवाहात मिसळायला सोप्पं जातं. वेग वाढवायला सुरुवात केली तोच डाव्या बाजूच्या झाडीत थोडीशी हालचाल झालेली डोळ्याच्या कोपर्‍यानं टिपली.  म्...

एक 'नोट'वर्दी अनुभव

 "त्या नोटा बाद झाल्यात आता!".. अद्वैतनं, माझ्या भाचीच्या नवर्‍यानं, मी माझ्या पाकीटातले पैसे मोजताना पाहून सुनावलं. कोव्हिडमुळे यावेळी तब्बल 4 वर्षानंतर भारत भेटीला आलो होतो. खूप पूर्वीपासून, जेव्हा एटीम नव्हते तेव्हापासून, भारतातून परत जाताना थोडे फार भारतीय चलन घेऊन जायची सवय लागली होती. कारण, परत भारतात आल्यावर विमानतळावरून घरी जाण्यासाठी ते कामाला यायचं. त्या सवयीचा दणका असा अचानक बसला. "कुठल्या नोटा बाद झाल्या?".. नोटा पण आता फलंदाजांसारख्या बाद व्हायला लागल्या की काय या शंकेला प्रयत्नपूर्वक बाद करून मी संभ्रमित चेहर्‍यानं पृच्छा केली.  "अहो त्या 2000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द झाल्या आहेत मागच्या वर्षी.".. त्यानं खुलासा केल्यावर वेगाने चाललेल्या बसने अचानक ब्रेक मारल्यासारखा धक्का मला बसला. आयला, दर वेळेला काय हे नोटा बाद करण्याचं झंझट? मागच्या वेळेला  भारतातून परत जायच्या वेळेला 500 रुपयाच्या नोटा बाद केल्याच्या बातमीनं मला विमानतळावर सरकारी  हिसका दाखवला होता. सरकार आयटी कंपन्यांसारखं नोटांच्या नवीन आवृत्त्या काढून मागच्या बाद करायला शिकलं की का...

वय की आकडा - एक प्रौढ चिंतन

 काही लोक 'वय काय? नुसता एक आकडा तर आहे' असं एखाद्या तत्वज्ञान्याचा आव आणून म्हणतात.. किंबहुना, असं म्हणायची एक फॅशनच झाली आहे. याच लोकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आल्या की त्यांचा आकडा वाढल्याची जाणीव अस्वस्थ करून जाते. लग्न जमवायच्या वेळेला या तर आकड्याला अअसामान्य महत्व येतं. वयाला एक आकडा म्हणणं म्हणजे सजीवाला एक हाडाचा सापळा किंवा अणुंचा ढिगारा म्हणण्याइतकं अरसिकपणाचं आहे. वय एक आकडा असला तरी तो आपल्याला लावता येत नाही. खरं म्हटलं तर वयाला एका आकड्यापेक्षा इतरही काही वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म आहेत. वय एक प्रवाही आकडा आहे. एकदा जन्म घेण्याचा नळ सुटला की वयाचा प्रवाह सुरू होतो. हा प्रवाह डायोड मधून जाणार्‍या विद्युतप्रवाहा प्रमाणे फक्त एकाच दिशेने जाऊ शकतो.. त्याला मागे जाणं माहिती नाही आणि निर्धारित वेगापेक्षा जास्त वेगाने पुढे पण जाता येत नाही. प्रवाहाला अनेक अडथळे येतात पण त्याचा वेग कधीही कमी होत नाही. कुठेही विचार करीत थांबायला त्याला वेळ नसतो. कुठल्याही भोवर्‍यात सापडून गोल गोल फिरणं त्याच्या नशिबात नसतं. इतर प्रवाह याला येऊन मिळत नाहीत किंवा हा दुसर्‍या प्रवाहाला मिळत नाही...

माझा लेखन प्रपंच!

 माझे वडील सरकारी B.Ed. कॉलेजचे प्राचार्य असल्यामुळे दर एक-दोन वर्षांनी बदली व्हायची. त्यामुळे महाराष्ट्रातील काही खेडेगाव-वजा-शहरात माझं बालपण जास्त गेलं. मी बारा भानगडी केलेल्या नसल्या तरी बारा गावचं पाणी जरूर प्यालेला माणूस आहे! पुण्याच्या बाहेरच्या शाळा विशेषत: मराठवाड्यातल्या प्रचंड विनोदी होत्या. मराठवाडा तेव्हा मागासलेला होता त्यामुळे त्यांचा दर्जा पुण्यातल्या शाळांच्या खूप खाली आणि अभ्यासक्रम सुद्धा एक वर्ष अलिकडचा होता. नववी मधे पुण्यातल्या शाळेत आल्यावर मला समजलं की मला कुठल्याच विषयातलं काहीच समजत नाही आहे. पुण्यात आठवीतच संस्कृत विषय सुरू झाला होता आणि रामरक्षेतल्या थोड्या फार श्लोकांपलीकडे काही माहीत नव्हतं. गणितात सगळे प्रमेय व रायडर्स नामक अगम्य भाषा बोलायचे. आयुष्यात तेव्हा पहिल्यांदा मी खचलो. मला कुठलीच शाळा कधीच न आवडायला ते एक कारण झालं. कुठल्याही विषयाची गोडी लागली नाही, मराठीची देखील! माझा एक नंबरचा शत्रू म्हणजे कुठल्याही भाषेचं व्याकरण! 'हत्ती मेला आहे'.. व्याकरणाने चालवून दाखवा सारखे प्रश्न डोक्यात तिडिक आणायचे. निबंध झेपले नाहीत. त्यामुळे मला कुठल्याही भ...

फुकटचे सल्ले!

शाळा कॉलेजात असताना अनेकांनी येता-जाता मला "सरळ" वळण लावण्याच्या नावाखाली केलेल्या फुकटच्या उपदेशांनी माझं पित्तं फार खवळायचं! कधी (म्हणजे बर्‍याचवेळेला) मी मारलेल्या बंडला उघडकीस आल्या तर 'खोटं बोलू नकोस, खोटं बोलल्यानं पाप लागतं'. कधी रविवारी सकाळी जरा उशीरा पर्यंत लोळलो तर लगेच 'उठा आता, नुस्ते लोळत पडू नका. लवकर निजे लवकर उठे तया ज्ञान, संपत्ती आरोग्य लाभे! समजलेत काय चिमणराव?' अशी हजामत! असलं काही सतत ऐकल्यावर कुठल्याही कुणाचंही डोकं फिरेल, मग माझ्यासारख्या टीनेजराची काय कथा? बरं, याबद्दल कुणाकडे तणतण केली तर 'तू मोठ्यांचा आदर करायला पाहिजेस, त्यांच्या सल्ल्याप्रमाणे वागायला शिकलं पाहिजेस' हे वरती!   पण जसजसं माझं वय वाढत गेलं आणि आयुष्य अनेक अनुभवांनी समृद्ध होत गेलं तसतसं त्यातलं बरचसं तितकंस बरोबर नव्हतं हेही लक्षात आलं. आणि आता वयाची साठी ओलांडल्यावर कुठल्याही मोठ्या माणसाची तमा न बाळगता मी इतकं नक्की म्हणू शकतो की .. कधीही खोटं न बोललेली व्यक्ती अस्तित्वात नाही. थोडं फार खोटं बोलल्याशिवाय या जगात कुणीही कसं काय जगू शकेल? प्रत्येकावर काहीना ...